पणजी – महाराष्ट्रात आगामी मंत्रिमंडळ विस्ताराच्यावेळी एक तरी मंत्रिपद रिपब्लिकन पक्षाला (RPI) मिळायला हवे, अशी मागणी पक्षाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी केली. गोवा भेटीवर आलेले आठवले यांनी येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी वरील भाष्य केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मंत्रिमंडळ विस्तारात आरपीआयला स्थान दिले जाईल, असे आश्वासन यापूर्वी दिलेले आहे, असे ते म्हणाले. पाचही राज्यांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आघाडीची सत्ता येईल तसेच लोकसभा निवडणुकीतही एनडीएला 330 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा ठाम विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.
तसेच आठवले यांनी यावेळी, कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधींना भारत जोडो यात्रा काढण्याची वेळ का आली? सत्तर वर्षे कॉंग्रेस झोपा काढत होती का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. राहुल गांधींना भारत जोडो यात्रा काढण्याचा कुठलाच अधिकार नाही, अशा शब्दांत आठवलेंनी सुनावले आहे.
आठवले पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून भारताला जोडण्याचे काम केले आहे. हिंदू-मुस्लीम, हिंदू-दलित वाद होत असले, तरी बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवले की, जात-धर्म-भाषेपेक्षा देश महत्वाचा आहे. देशावर संकट आल्यानंतर सर्वांनी लढले पाहिजे.
आरपीआयला महामंडळ द्या
आठवले यांनी राज्य विधानसभेत अनुसूचित जमातींना (एसटी) आरक्षण शक्य नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, राज्यात एसटींची संख्या अगदीच कमी आहे. याआधीही जनगणनेतून ते स्पष्ट झालेले आहे. तसेच आठवले यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेऊन गोव्यात अनुसूचित जातींना 5 टक्के आरक्षण व आरपीआयला महामंडळ द्यावे, अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना आठवले म्हणाले की, गोव्यात रिपब्लिकन पार्टी सरकारच्या पाठीशी आहे. आम्हाला एखादे महामंडळ दिले जावे तसेच गोव्यात अनुसूचित जातींच्या लोकांची संख्या 2 टक्के असली तरी किमान 5 टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी आम्ही केली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यावर सहानुभूतीपूर्वक विचार करु, अशी ग्वाही दिलेली आहे.