रॉयल चॅलेंजर बेंगळुरू संघाची आयपीएल स्पर्धेतील कामगिरी कधीही विजेतेपदापर्यंत जाऊ शकलेली नाही. मात्र, तरीही त्यांच्या संघातून खेळलेल्या अनेक खेळाडूंनी भारतीय संघात स्थान मिळवले आहे. आता याच यादीत आणखी एक नावाचा समावेश होण्याच्या उंबरठ्यावर आहे. हे नाव म्हणजे रजत पाटीदार. नावात जरी रजत असले तरी यंदाच्या स्पर्धेतील त्याची महत्त्वाच्या लढतींमधील कामगिरी सुवर्णयशाचीच आहे, यात शंका नाही.
यंदाच्या स्पर्धेत सुरुवातीच्या अनेक सामन्यांत त्याला संधीच मिळाली नव्हती. अर्जुन रावतला स्थान देत बेंगळुरुच्या संघ व्यवस्थापनाने आपली बौद्धिक दिवाळखोरी दाखवून दिली होती. त्यापूर्वी बेंगळुरुच्या बलाढ्य फलंदाजीला सुरुंगही लागला होता व त्यांचा डाव सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात अवघ्या 68 धावांवर संपला होता. अखेर रावतकडून अपेक्षाभंग झाल्याने पाटीदारला संघात स्थान दिले व त्याचा पायगुण म्हणणे अवघड आहे, पण तो संघात आल्यावर विराट कोलहीलाही सूर गवसला व पाटीदारनेही आपली गुणवत्ता सिद्ध केली.
बेंगळुरुच्या संघाने रडत खडत का होईना व अन्य संघाच्या निकालांचा लाभ मिळाल्यामुळे म्हणा यंदाच्या स्पर्धेत प्लेऑफमध्ये स्थान मिळवले. त्यानंतर मात्र, त्यांनी गांभीर्याने खेळ केला. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या एलिमिनेटर लढतीत त्यांनी विजय मिळवला व क्वालिफायर -2 लढतीत प्रवेश केला. त्या सामन्यात पाटीदारने धडाकेबाज नाबाद 112 धावांची शतकी खेळी करत कर्णधार फाफ डुप्लेसी, कोहली व संघ व्यवस्थापनाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला.
तसेच क्वालिफायर -2 सामन्यातही तोच डाव पुढे सुरू केल्याप्रमाणे 58 धावांची खेळी करत पुन्हा एकदा आपली निवड सार्थ ठरवली. त्याच्या फलंदाजीत कॉपीबूक शॉट तर आहेतच पण इंम्प्रोवायझेशनची क्षमताही त्याने सिद्ध केली आहे. ऑफ साईडला जास्त सरस असला तरीही मनगटी कौशल्याच्या जोरावर तो लेगसाईडलाही दाद देत असल्याचे दिसते. त्याच्याकडे आक्रमकता, तंत्र, शॉट सिलेक्शनची नजर व सर्वात महत्त्वाचे म्हणजे खराब चेंडूंची वाट पाहण्यासाठीचा मोठा संयमही आहे. हीच त्याच्या मोठा खेळाडू बनण्याची लक्षणे आहेत.
1993 साली मध्यप्रदेशातील इंदूर येथे जन्मलेला पाटीदार आज 28 वर्षांचा असला तरीही त्याच्यासमोर किमान 7 ते 8 वर्षांची कारकीर्द आहे. यंदाच्या स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर त्याने भारतीय संघाच्या निवड समितीला निश्चितच प्रभावित केले आहे. देशांतर्गत स्पर्धेत मध्य प्रदेशकडून खेळताना प्रथम दर्जाच्या 39 सामन्यांतून त्याने 7 शतके व 14 अर्धशतके यांच्यासह 2 हजार 588 धावा केल्या आहेत. तर लीस्ट अ दर्जाच्या 43 सामन्यांत 4 शतके व 10 अर्धशतकेही साकारली आहेत. 38 टी-20 सामन्यांत त्याने 1 शतक व 8 अर्धशतके फटकावली आहेत. ही त्याची आजवरची चमकदार कामगिरी आहे. याच जोरावर तो भविष्यात रजत नव्हे तर सुवर्णयश मिळवताना दिसेल असा विश्वास आहे.