शेवगाव-पावसाअभावी परिसरातील पीके जळून चालली आहेत. सध्या पन्नास टक्क्यांच्यावर भरलेल्या मुळा धरणातून आव्हाणे परिसरातील टेलच्या गावांना किमान पिण्यासाठी एकतरी आवर्तन सुटावे अन्यथा हेच हक्काचे पाणी नंतर मराठवाड्यात निघून जाईल. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी वेळीच जागे होण्याची गरज आहे, पाण्यासाठी तरी राजकारण व्हायला नको असे प्रतिपादन माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी केले.
तालुक्यातील आव्हाणे बु. येथे ग्रामपंचायतीच्या अंतर्गत विविध विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्ञानेश्वरचे संचालक काका नरवडे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, जि.प. सदस्य रामभाऊ साळवे, पं. स. सदस्या मनिषा कोळगे, सरपंच संगीता कोळगे, अंबादास कळमकर, बबनराव भुसारी, ऍड. विनायक आहेर, डॉ. सुधाकर लांडे, नारायण बैरागी, रघुवीर उगले, वसंत भालेराव, उपसरपंच सुधाकर चोथे, शिवाजी आहेर आदी प्रमुख उपस्थित होते.
घुले म्हणाले, केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असतांना सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधी असतानासुद्धा तालुक्यातील शेतकऱ्यांना तुर, मुग या खरीप पिकांचा विमा मिळाला नाही. शेजारचा नेवासा तालुका कमांड एरियात असुनही विम्याची दुप्पट रक्कम मिळाली. लोकप्रतिनिधी व सरकार शेतकऱ्यांना कोटी- कोटीच्या रकमा आल्याचे सांगतात. या फक्त आकड्यांच्या घोषणा आहेत. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना काहीही मिळालेले नाही. तालुक्यातील पाणीयोजना बंद असताना लोकप्रतिनिधींना महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवता आलेला नाही.
अधिकाऱ्यांवर अंकुश नसल्याने ते सर्वसामान्य नागरिकांना जुमानत नाहीत. लाचलुचपत खात्याच्या सर्वाधिक कारवाया या तालुक्यात झाल्या आहेत हे दुर्दैवी आहे. हक्काचा लोकप्रतिनिधी नसेल तर तालुक्याचे काय हाल होतात हे आपण पाहिले आहे. किमान आता तरी तालुका एकसंध होण्याची गरज आहे. यावेळी नरवडे, साळवे, भरत वांढेकर, राजेंद्र देशमुख, सुभाष वाणी, ऍड. गोरक्ष जमधडे,बाळासाहेब दिंडे आदींनी मनोगत व्यक्त केले. संजय कोळगे यांनी प्रास्ताविक व सुत्रसंचालन केले. साईनाथ झाडे यांनी आभार मानले.