भंडारदरात 9.5, निळवंडेत सव्वाचार टीएमसी पाणी ः अनेक धरणे भरण्याच्या मार्गावर
अकोले – अकोले, संगमनेर व सिन्नर या तालुक्यांना सिंचनदृष्ट्या महत्त्वाचे असणारे भोजापूर धरण आज सकाळी पूर्ण क्षमतेने भरले.त्यामुळे या तीनही तालुक्यांतील लाभार्थी क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. भंडारदरा 9.5 व निळवंडे सव्वाचार टीएमसी झाले असून, आढळा 70 टक्के भरले आहे.
ही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान भोजापूर धरणातील ओव्हर फ्लोचे पाणी पाटात न सोडता, ते नदीपात्रातून संगमनेर तालुक्यातील राजापूर पर्यंत पोहचू द्यावे व त्यानंतर पाटात सोडावे, अशी मागणी लाभार्थी गावांनी केली आहे. तसे न घडल्यास आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. भोजापूर धरणाची साठवण क्षमता 483 दशलक्ष घनफूट इतकी असून, आज सकाळी दहा वाजता हे धरण पूर्ण क्षमतेने भरले. या धरणाच्या सांडव्यावरून 250 क्यूसेकचा विसर्ग म्हाळुंगी नदीपात्रात पडत आहे.
भंडारदरा धरणात आज सायंकाळी नऊ हजार 563 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला होता. या धरणात आणखी दीड टीएमसी पाणीसाठा वाढल्यानंतर हे धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे जाहीर केले जाईल. या धरणाची साठवण क्षमता 11.39 टीएमसी इतकी आहे. धरण दहा हजार 600 दशलक्ष घनफूट झाल्यावर तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे घोषित केले जाते. त्यानंतर अधिक जमा होणारे धरणातील पाणी प्रवरा नदीपात्रात सोडले जाते. त्यामुळे हे सर्व पाणी खाली असणाऱ्या निळवंडे धरणात जमा होणार आहे. मात्र समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या बडग्यामुळे हे धरण पूर्ण क्षमतेने भरून दिले जाणार नाही, हे मात्र नक्की.
आज दुपारी दोन वाजता या धरणाच्या टनेलवाटे म्हणजेच विद्युत गृह क्रमांक एकमधून 830 क्यूसेकचा विसर्ग सोडण्यास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे वीजनिर्मिती सुरू झाली आहे.
8 हजार 320 दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असणाऱ्या निळवंडे धरणात सायंकाळी चार हजार 223 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला होता.त्यात टनेलवाटे येणारा व वाकीचा ओव्हर फ्लो मिळत असल्याने हे धरणही लवकरच भरेल.
तालुक्यातील महत्त्वाचे आणखी एक धरण म्हणजे आढळा. हे धरणही भरण्याच्या मार्गावर आहे. या धरणात आज सायंकाळी 765 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा झाला होता. या धरणाची साठवण क्षमता 1060 दलघफू इतकी आहे. त्यामुळे हे धरण लवकरच भरेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर आढळा खोऱ्यामध्ये जोगदरा तलाव पूर्ण क्षमतेने भरला असल्याचे सांगण्यात आले.