“अरे काल काकांनी एक कोडं घातलं होतं. फार भारी होते बरं का.’ सानवी सांगत होती. सगळ्या मित्रांचे प्रश्नार्थक चेहरे होते.
“अरे असे नका बघू माझ्याकडे. त्यांनी काही आकडेमोड करायला सांगितली आणि आलेल्या उत्तरावरून त्यांनी बहीण भावांची संख्या किती, हे सांगितले.’
“असे कसे काय होईल?’ सानवी जरा नीट सांग ना. “सानवी तुला काय भारी वाटलं? उत्तरावरून बहीण भाऊ किती हे ओळखलं त्याचे? का त्यांनी कसे ओळखलं याचे?’ प्रणवच्या आईने विचारले.
“दोन्हीचा अर्थ एकच ना?’ सानवीने विचारले.
“अजिबात नाही. कसे ओळखले म्हणजे विचार करणे. उत्तर कसे शोधले याचा विचार करणे. आणि तो तू केला नसेल तर सगळे मिळून करा’, प्रणवच्या आईने सुचवले.
“खरंच की. मला तर फक्त काका किती ग्रेट आहेत असे वाटत होते; पण त्यांनी उत्तराचा आणि बहीण भावांचा संख्येचा कसा संबंध लावला असेल, हा विचारच मी केला नाही.’
“आता कोडं काय होतं ते सांग म्हणजे बघू कसं काय सोडवलं ते.’
“बरं बरं, तर कोडं असं होतं की, काकांनी भावांच्या संख्येला दोनने गुणून त्यात पाच मिळवायला सांगितले. आलेल्या उत्तराला परत पाचने गुणायला सांगितले आणि त्यात नंतर बहिणींची संख्या मिळवायला सांगितली. आता आलेल्या उत्तरामधून पंचवीस वजा करायचे. हो आणि हे सगळं मनातल्या मनात करायचे आणि उत्तर सांगायचे. सांगितलेल्या उत्तरावरून काकांनी किती बहीण भाऊ आहेत, हे ओळखले.’
सानवीने कोडे सांगितले अन् सगळी “कसे काय’ या विचारात गुंतली. पहिल्यांदा मुलांनी बहीण भावांची वेगवेगळी संख्या मनात धरून सांगितलेल्या कोड्याप्रमाणे करून पाहिले, तर उत्तर बरोबर येत होते. पण अजून “कसे काय’ याचे कारण सापडत नव्हते.
अचानक प्रणवने समीकरण मांडून सोडवले तर असे सुचवले. मग काय भावांच्या संख्येसाठी “अ’ आणि बहिणींसाठी “ब’ अक्षर घेऊन सुरुवात केली. सगळ्यात शेवटी त्यातून पंचवीस वजा केले अन् काय. मुलांचा तर तो “युरेका’ क्षण होता.
येणाऱ्या उत्तराच्या एकक स्थानचा अंक म्हणजे बहिणींची संख्या तर दशक स्थानचा अंक म्हणजे भावांची संख्या येत होती. असे का म्हणून काय विचारता? तुम्ही करून पाहा. म्हणजे तुम्हालाही तो “युरेका’ क्षण म्हणजे काय तो समजेल. आधी तुमची बहीण भावांची संख्या काकांनी सांगितल्याप्रमाणे बरोबर काढता येते का ते बघा आणि नंतर मग असे कसे हे शोधण्यासाठी समीकरण मांडून करून पाहा. हां! पण समीकरण नीट मांडा बर. आणि “कंचेभागुबेव’ हा नियम मनात असू द्या, बरं का.
आणि आता “कंचेभागुबेव’ म्हणजे काय? तर आधी कंस सोडवा नंतर भागाकार किंवा गुणाकार ज्या क्रमाने आले आहे ते क्रमाने करा. आणि मग बेरीज किंवा वजाबाकी क्रमानुसार सोडवा. आठवला ना “कंचेभागुबेव’चा नियम. लागा तर मग कामाला.
– विशाखा गंधे