साठी-सत्तरीच्या दशकामध्ये बॉलीवूड चित्रपटांमधून झळकणारा मनमोहक, हसरा आणि लोभसवाणा चेहरा म्हणजे आशा पारेख. निसर्गतः लाभलेल्या सौंदर्याला आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि दिलखेचक नृत्यअदाकारीने चार चॉंद लावणाऱ्या आशा पारेख यांनी बॉलीवूडच्या सिनेरसिकांवर मोहिनी घालत स्वतःचा ठसा उमटवला. आशा पारेख यांची सिनेसृष्टीसह सर्वांनाच ओळख एक जिंदादिल अभिनेत्री म्हणून आहे. अभिनयाच्या क्षेत्रात यश, प्रसिद्धी आणि पैसा मिळाल्यानंतर त्यांनी समाजाप्रती असणाऱ्या आपल्या संवेदना व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर समाजकार्यही केले. अशा अभिनेत्रीला दादासाहेब फाळके हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, ही निश्चितच आनंददायी बाब आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार यंदा बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना जाहीर झाला आहे. यापूर्वी 1992 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हिंदी चित्रपटसृष्टीत साठच्या दशकामध्ये आघाडीवर असलेल्या अभिनेत्रींमध्ये आशा पारेख यांचा उल्लेख अग्रक्रमाने केला जायचा.
याचे कारण हिंदी चित्रपटामध्ये झळकण्यासाठी आवश्यक असणारे सौंदर्य तर त्यांना निसर्गतःच लाभले होते. पण त्याहून अधिक सरस होता तो त्यांचा सहजसुंदर अभिनय. जन्मतःच लाभलेल्या विलक्षण बोलक्या काळ्या भोर डोळ्यांमधील भाव असोत किंवा हास्यातील मोहकपणा असो; त्यांच्या अभिनयाने रसिकप्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले. अभिनयातील भावविष्कारांच्या असंख्य छटा त्यांच्यात दिसून आल्या. त्याकाळातील समाजव्यवस्थेमध्ये आजच्याइतका मोकळेपणा नव्हता.
पडद्यावरील नायिकेने कसे दिसावे याबाबतही समाजात एक विचारसरणी होती. त्यामध्ये एकाच वेळी नायिकेने शालीनही दिसले पाहिजे आणि तिच्यातून मॉडर्नपणाही सादर झाला पाहिजे अशा विचारांची संमिश्रता होती. या दोन्हींना अचूकपणाने न्याय देण्यामध्ये आशा पारेख सर्वार्थाने यशस्वी ठरल्या. याजोडीला नृत्यांमधील त्यांची नजाकतही रसिक प्रेक्षकांना मनापासून भावली.
आशा पारेख यांचे नृत्यावर विलक्षण प्रेम आहे. कारा भवन नावाची एक डान्स अकादमी त्या चालवतात. आशा यांनी उत्तम डान्सर बनावे अशी त्यांच्या आईची मनापासून इच्छा होती. त्यामुळे लहानवयापासूनच त्यांना आई नृत्याचे धडे गिरवण्यासाठी विविध डान्स क्लासेसमध्ये सहभागी होण्यास भाग पाडायची. पंडित बन्सीलाल भारती हे त्याकाळातले एक नृत्यप्रशिक्षक म्हणून ओळखले जात असत. त्यांच्याकडेही आशांनी प्रशिक्षण घेतले.
आशा पारेख यांची सिनेसृष्टीसह सर्वांनाच ओळख एक जिंदादिल अभिनेत्री म्हणून आहे. अत्यंत उदार अंतःकरणाचे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. अभिनयाच्या क्षेत्रात यश, प्रसिद्धी आणि पैसा मिळाल्यानंतर त्यांनी समाजाप्रती असणाऱ्या आपल्या संवेदना व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर समाजकार्यही केले. मुंबईतील एका रुग्णालयाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. आशा पारेख या भारतीय सिने आर्टिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षाही राहिल्या आहेत. तसेच 1994 ते 2000 या काळात भारतीय सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षा म्हणूनही त्यांनी पदभार सांभाळला आहे. सेन्सॉर बोर्डाच्या त्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या.
आशाजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1942 रोजी एका गुजराती कुटुंबात झाला. 1952 मध्ये आलेल्या “आसमान’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. एका स्टेज शोमध्ये नृत्य करत असताना दिग्दर्शक विमल रॉय यांनी त्यांना पाहिले आणि त्यांनी चित्रपटात काम करशील का, अशी विचारणा केली. आशाजींनी तात्काळ त्याला तयारी दर्शवली. त्यावेळी दहावीत शिकत होत्या. हा चित्रपट फारसा न चालल्यामुळे आशाजींना निराशा आली. वयाच्या 17 व्या वर्षी अभिनयाच्या क्षेत्रात उतरण्याच्या उद्देशाने शोध सुरू असताना त्यांना “गूंज उठी शहनाई’ या चित्रपटाचे व्यासपीठ मिळाले.या चित्रपटासाठी दोन दिवसांचे चित्रिकरणही पार पडले. परंतु विजय भट्ट यांनी नंतर त्यांना काढून टाकले. इतकेच नव्हे तर ही मुलगी कधीही नायिका बनू शकत नाही, अशी टिप्पणीही केली.
अर्थात यामुळे प्रचंड वाईट वाटले असले तरी त्यांनी आपला शोध कायम ठेवला. पुढील काळात शशधर मुखर्जी यांनी त्यांना “दिल देके देखो’ या चित्रपटातून त्यांना खऱ्या अर्थाने ब्रेक दिला. शशधर हे दिलीप कुमार यांचे मित्र होते. शशधर यांनी जेव्हा नायिका म्हणून आशा यांची ओळख करुन दिली तेव्हा दिलीपकुमार यांना त्या खूप आवडल्या. आकाशातून पृथ्वीवर अवतरलेल्या एखाद्या परीसारखी ही आशा परी आहे, असे म्हणून दिलीप कुमार यांनी आशा यांचे कौतुक केले होते.
आशा पारखे यांनी यानंतर “तिसरी मंजिल’, “कारवां’ अशा सात चित्रपटांमध्ये काम केले. 1959 ते 1973 या काळात आशा पारेख या सर्वश्रेष्ठ अभिनेत्रींपैकी एक होत्या. जवळपास 95 चित्रपटांमध्ये त्यांनी आतापर्यंत काम केले आहे. यामध्ये “जब प्यार किसी से होता है’, “घराना’, “छाया’, “भरोसा’, “फिर वही दिल लाया हू’, “साजन’, “महल’, “चिराग’, “आया सावन झूम के’, “फिर आई कारवा’ “लव इन टोकियो’, “दो बदन’, “नया रास्ता’, “आन मिलो सजना’, “लावा’, “बटवारा’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
1971 मध्ये आलेल्या “कटी पतंग’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठीचा फिल्मफेअर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. शम्मी कपूर हेदेखील आशाजींचे आवडते नायक होते. या दोघांनी चार रोमॅंटिक चित्रपटात एकत्रित अभिनय केला. गंमत म्हणजे शम्मी कपूर त्यांना मस्करी करताना भाची असे संबोधायचे; तर आशाजी त्यांना चाचा म्हणून बोलावत असत! अभिनयाबरोबरच निर्मिती आणि दिग्दर्शनाच्या प्रांतातही त्यांनी मुशाफिरी केली.
सिनेअभिनयाच्या क्षेत्रात असा प्रदीर्घ प्रवास करणाऱ्या या कसदार अभिनेत्रीची दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी झालेली निवड ही जुन्या पिढीतील असंख्य सिनेरसिकांसाठी निश्चितच आनंदवार्ता आहे. मध्यंतरी, आशाजींच्या बायोग्राफीचे प्रकाशन अभिनेता सलमान खान याच्या हस्ते करण्यात आले. याचे नाव होते “द हिट गर्ल’. बॉलीवूडच्या अप्सरेचे वर्णन करण्यासाठी हे शीर्षक अत्यंत चपखल आहे.
नवोदित कलाकारांना संदेश
अभिनेत्री आशा पारेख यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यावेळी त्यांचे बोल अनेकांच्या मनाचा ठाव घेणारे होते. आशा पारेख पुरस्कार स्वीकारत म्हणाल्या- राष्ट्रपतींच्या हस्ते मला “दादासाहेब फाळके पुरस्कार’ वयाच्या 88 व्या वर्षी मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. माझ्या सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल मला हा पुरस्कार दिल्याबद्दल आभार. नवोदित कलाकारांना चांगलं काम करण्याचा, शिस्तीत राहण्याचा आणि कितीही गगनभरारी घेतली तरी जमिनीवर राहण्याचा मी सल्ला देत आहे.
– सोनम परब