भारतीय क्रिकेट म्हणजे महेंद्रसिंह धोनी असेच चित्र आयसीसीच्या स्पर्धांमध्ये दिसायचे. आता तो संघात नसल्याने संघाची जी ससेहोलपट होत आहे ती पाहवत नाही. धोनीने सगळे विश्वकरंडक जिंकून दिले असे नाही; पण जे जिंकले त्यात त्याच्या खेळाचा व नेतृत्वाचा वाटा खूपच महत्त्वाचा होता. आताचा कर्णधार स्वतःच गोंधळलेला दिसतो. यंदाच्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत आपण नामुष्कीचा सामना केला. आता त्याचे खापर ज्या कोणावर फोडायचे आहे ते फुटेल परंतु त्याने मूळ प्रश्न सुटणार नाही.
धोनीच्या निवृत्तीनंतर विराट कोहलीकडे संघाचे नेतृत्व आले. त्याला आयसीसीच्या स्पर्धांमध्ये सातत्याने विजेतेपदाने हुलकावणी दिली. तेच कारण पुढे करत रोहित शर्माच्या गळ्यात नेतृत्वाची माळ पडली पण ती देखिल वैजयंती माला ठरली नाही. वैजयंती माला म्हणजे अभिनेत्री नव्हे तर विजयाची माळ. यंदाच्या स्पर्धेतील महत्त्वाचे काही भाग आहेत ते आधी समजून घ्यायला हवे. एकतर धोनी कर्णधार असताना त्याच्याकडे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर होता. रोहित, विराटसारखे अफलातून फलंदाजी होते. त्यापूर्वीचे चित्र पाहिले तर राहुल द्रविड व अनिल कुंबळेच्या पूर्वी सौरव गांगुली कर्णधार असताना आपण सातत्याने सरस कामगिरी करत होतो. याला कारण कर्णधाराकडे देशातील सर्वोत्तम खेळाडू होते व त्यांना कसे हाताळायचे याचे कसबही होते. रोहितकडे नेमके तेच नसल्याने आज बलाढ्य फलंदाजी बाळगूनही आपण पराभूत झालो. केवळ सुमार खेळ केला म्हणून हरलो असे नाही तर या स्पर्धेतील पहिल्या सामन्यापासूनच आपली देहबोली जिंकण्याची नव्हती. प्रख्यात समालोचक हर्षा भोगलेही तेच म्हणाले होते की, हा पहिलाच विश्वकरंडक आहे की ज्यात भारतीय संघाला कोणीही संभाव्य विजेते मानले नव्हते.
रोहितकडे खरेच कौशल्य आहे का?
कोहलीच्या जागी रोहितला कर्णधार बनवताना निवड समितीने नक्की कोणता विचार केला होता, असा प्रश्न पडतो. केवळ आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सला विक्रमी संख्येने विजेतेपद मिळवून दिले म्हणजे त्याचे नेतृत्व आंतरराष्ट्रीय स्तरावरही यशस्वी ठरेल हा फाजील आत्मविश्वास कोणाला होता. मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना रोहितला काय वेगळे करावे लागले. त्याच्याकडे तर जगभरातील सर्वात सरस खेळाडू होते. त्याला केवळ त्यांच्याकडून उत्तम कामगिरी करून घ्यायची होती. बरं या स्पर्धेतील पराभवानंतर त्याच्या कारकिर्दीवर कोणताही परिणाम होणार नव्हता म्हणजेच नेतृत्वाचे त्याच्यावर कोणतेही दडपण नव्हते. हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या बाबतीत लागू पडत नाही हे त्याला विश्वकरंडक स्पर्धेच्या पहिल्याच लढतीत कळून चुकले असेल. नेतृत्व हाती आल्यावर वैयक्तिक खेळ खालावतो हे आपण काही पहिल्यांदा अनुभवलेले नाही. महंमद अझरुद्दीनपासून गांगुलीपर्यंत आणि सचिन तेंडुलकरपासून विराट कोहली व आता रोहितबाबतही अनुभवत आहोत. दडपण न घेता संघाचे नेतृत्व यशस्वी करणे व त्याचबरोबर वैयक्तिक कामगिरीही अफलातून हेणे हे स्टिव्ह वॉ व रिकी पॉन्टिंग यांनीच केवळ दाखवून दिले. 1980 साली कपिल देव यांनीही दाखवले. अर्थात त्यांची तुलना होऊ शकत नाही मात्र, अनुकरण करायला काय हरकत होती.
आता येत्या काळात आपण न्यूझीलंड, बांगलादेश असे दौरे करणार आहोत व तिथे वासरात लंगडी गाय शहाणी या उक्तीप्रमाणे हे सगळे अपयशी खेळाडू यशस्वी ठरतील व देभरात विश्वकरंडक स्पर्धेतील पराभवानंतर उसळलेला संताप कालबाह्य ठरेल व माहनतेच्या गप्पा सुरू होतील. प्रमुख खेळाडूंना संघाबाहेर ठेवून या मालिका जरी आपण खेळणार असलो तरीही त्यातील कामगिरी निवड समिती ध्यानात घेईल याची कोणतीही खात्री नाही. त्यामुळे नवोदितांना संधी कधी मिळणार हा प्रश्न भारत महासत्ता कधी होणार इतकाच जटील आहे. असो, रोहितचे आयपीएलमधील यश पाहून नेतृत्व देण्याच्या विचारावर आता तरी निवड समितीने विचार करावा.
दीड फलंदाज घेऊन खेळलो
ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वकरंडक स्पर्धेबाबत व भारताच्या अपयशावर बोलायचे झाले तर या स्पर्धेत आपण केवळ दीड फलंदाज घेऊन खेळलो हे आधी मान्य करावे लागेल. पूर्ण विराट कोहली व अर्धा सूर्यकुमार यादव ही आपली दीड फलंदाजी या स्पर्धेत होती मग यशाची अपेक्षाच का ठेवावी. सलामीला लोकेश राहुल व कर्णधार रोहित शर्मा सातत्याने अपयशी ठरले तरीही त्यांच्या फलंदाजी क्रमवारीत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी कोणताही हस्तक्षेप का केला नाही. संघाकडे सलामीवीरासाठी अन्य पर्यायही का निवडला गेला नाही. निवड समितीला हेच दोघे यशस्वी ठरतील, असा आत्मविश्वास होता का.
तिसऱ्या क्रमांकावर कोहलीने फलंदाजीला येत भारतीय संघाचा डाव जवळपास प्रत्येक सामन्यात सावरला. त्याने अर्धशतकांची माळ लावली व सूर्यकुमार यादवसह संघाला उपांत्य फेरीपर्यंत पोहोचवले. संघाच्या फलंदाजीची धूरा या दीड फलंदाजांनीच सांभाळावी असा होरा द्रविड यांचा होता का. राहुल काय किंवा रोहित काय त्यांनी अर्धशतकी खेळी केल्या मात्र, त्या कोणत्या संघाविरुद्ध ते पाहिले पाहिजे. उलट कोहली व सूर्यकुमारने बलाढ्य संघांविरुद्ध अफलातून खेळी करत विजयात मोलाचा वाटा घेतला. परंतु सूर्यकुमारचा अनुभव कमी पडला व कुठे संयम ठेवून फलंदाजी करायची असते हे त्याला उमगले नाही व उपांत्य सामन्यात इंग्लंडविरुद्ध तो अपयशी ठरला. कोहलीने अर्धशतक फटकावले पण समोरून फलंदाज ठराविक अंतराने बाद होत असल्याने त्याला त्याच्या आक्रमकतेवर वेसण घालावी लागली. संपूर्ण संघाची यादी पाहिली तर कागदावर सिंह असलेले भारतीय खेळाडू उपांत्य लढतीत मॅंऊ करताना दिसले.
दीड गोलंदाजच खेळले
जसे फलंदाजीत आपण दीड फलंदाज घेऊन खेळलो तसेच गोलंदाजीतही आपल्याकडे दीड गोलंदाजच होते. अर्शदीप सिंह पूर्ण तर महंमद शमी अर्धा अशी आपली गोलंदाजी होती. अर्शदीप सिंहकडे वेग आहे, बाउन्स आहे, स्विंग आहे, यॉर्कर आहे पण सध्या अनुभव नाही. त्यामुळेच त्याने उपांत्य लढतीपूर्वी व उपांत्य लढतीत जी गोलंदाजी केली त्यात मोठा फरक होता. त्याने सुरुवातीच्या सामन्यांत बळी घेण्यासाठी जीवाचे रान केले तसेच धावाही रोखल्या. उपांत्य सामन्यात त्याच्या पहिल्या स्पेलमध्ये धावा चोपल्या गेल्यावर तो कोशात गेला. यातून बाहेर काढण्याची कुवत रोहितकडे नव्हती. कोहलीने त्याला सातत्याने सल्ले दिले मात्र, तोपर्यंत सामना हातातून गेला होता. शमी या स्पर्धेत सहभागी झाला पण तो मॅचफिट कधीही वाटला नाही. त्याचा तो सर्वात खतरनाक इनस्विंगर एकाही सामन्यात दिसला नाही.
ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या या वेगासाठी तसेच स्विंगसाठी ओळखल्या जातात पण त्यावर अर्शदीप व काही वेळा भुवनेश्वरने चांगले स्विंग केले पण ते पुरेसे नव्हते. त्यावेळी शमीकडून असलेल्या अपेक्षा साफ फोल ठरल्या. त्यातही जो संघ निवडला होता त्यात हर्षल पटेल असूनही त्याच्यावर विश्वास दाखवला गेला नाही. इतकेच काय महंमद सिराजवर कसोटी गोलंदाज असा जो शिक्का बसला आहे तो आधी काढला पाहिजे. त्याच्याकडे उजव्या हाताने गोलंदाजी करणारा जहीर खान होण्याची कुवत आहे. मात्र, निवड समितीने आता तरी नवोदितांवर विश्वास दाखवण्याची वेळ आली आहे. जर पुढील पाच वर्षांचा आराखडा तयार करायचा असेल तर संघातील या सोकॉल्ड वरिष्ठ खेळाडूंना नारळ देत नवोदितांना खेळवले पाहिजे. काही स्पर्धांमध्ये तसेच सामन्यांमध्ये यश नाही मिळणार; पण त्यांना अनुभव तरी मिळेल व त्याच जोरावर हे खेळाडू याच संघाला विश्वविजेता बनवतील.
बुमराह आयपीएलच खेळणार का?
यंदाच्या मोसमात पाठीच्या दुखण्यामुळे प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्वकरंडक स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. त्याच्यामुळे भारताची गोलंदाजी अत्यंत सामान्य ठरली. पण प्रश्न असा पडतो की हाच बुमराह आयपीएल स्पर्धेत मॅचफिट असतो व नंतर अचानक त्याला दुखापत होते. आपण काही वैद्यकीय तज्ज्ञ नाही पण काही प्रश्न जटील आहेत व त्याची उत्तरे सध्यातरी मिळणार नाहीत. बुमराहला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पाठवले गेले व त्यात तंदुरुस्त ठरल्यावर काही मालिकांमध्ये तो खेळला देखिल पण ज्या स्पर्धेचे महत्त्व सर्वात जास्त आहे त्याच विश्वकतरंडकातून त्याने माघार घेतली हे अद्याप पटत नाही. मग तो त्याच्या कारकिर्दीत केवळ आयपीएलसारख्याच स्पर्धा खेळणार का, असा प्रश्न पडतो.
सर्वंकष विचार केला जावा
आता विश्वकरंडक स्पर्धेतील अपयशावर चर्चा बास झाली मात्र, निवड समितीने 2019 साली जी चूक केली तीच यंदाच्या स्पर्धेत केली. निवडलेला संघ विश्वकरंडक जिंकण्याच्या क्षमतेचा आहे का याचा विचार केला गेला नाही हे तर उघड आहे. निदान यातून बोध घेत पुढील स्पर्धांमध्ये सक्षम खेळाडूंना निवडले जावे. देशात सेकंड बेंच परिपूर्ण आहे असे सातत्याने सांगितले जाते पण त्यांना संधीच दिली गेली नाही तर त्यांची गुणवत्ता जगासमोर येणार कधी. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी रोहितसह प्रयोग जरूर करावेत पण ते कोणत्या स्पर्धेत याचाही विचार करावा. 2014 सालापासून आपण आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्ये अपयशी होत आहोत मात्र दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंडसारखा चोकर्सचा शिक्का बसू नये असे वाटत असेल तर आता जागे होण्याची गरज आहे.
अमित डोंगरे