भारत व पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचा सामना जागतिक क्रिकेटचा मानबिंदू ठरतो. याच परंपरागत प्रतिस्पर्धी संघात आज (रविवार) टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा सामना रंगत आहे. ऑस्ट्रेलियात जरी ही स्पर्धा होत असली तरीही त्याची उत्कंठा संपूर्ण जगभरात पसरलेली आहे. गेल्या वर्षी झालेल्या या स्पर्धेत पाकिस्तानने भारताचा पराभव करत विश्वकरंडक स्पर्धांमध्ये भारताकडून पराभूत होण्याचा नकोसा इतिहास पुसून काढला होता. आता भारतीय संघ या हायव्होल्टेज ड्रामात विजयी होतो का याचीच उत्सुकता लागली आहे.
भारतीय संघाने जागतिक क्रिकेटमध्ये होत असलेल्या विश्वकरंडक स्पर्धांमध्ये गेल्या वर्षीपर्यंत सातत्याने पाकिस्तानचा पराभवच केला आहे. मात्र, ही परंपरा गेल्या वर्षी खंडित झाली व पाकिस्तानने विजय मिळवत आता “हम भी कुछ कम नही’, हेच सिद्ध केले. आजवर ज्या कर्णधारांनी विश्वकरंडक स्पर्धांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. त्यात विराट कोहली हाच एकमेव कमनशिबी ठरला आहे. त्याच्याच नेतृत्वाखालील भारतीय संघाला पाककडून पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर कोहलीचे कर्णधारपद जाणार असेच बोलले जात होते व काही दिवसांतच घडलेही तसेच. आता यंदा टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा ऑस्ट्रेलियात सुरू आहे. याच स्पर्धेत भारत व पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी संघातच लढत होत आहे. याच लढतीद्वारे हे दोन्ही संघ या स्पर्धेतील आपली मोहीम सुरू करत आहेत. गेल्या वर्षी झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भारतीय संघ तर, विजयी सातत्य कायम राखण्यासाठी पाकिस्तानचा संघ सज्ज बनले आहेत.
मानसिकता बदलावी लागणार
1975 साली एकदिवसीय सामन्यांची पहिली वहिली विश्वकरंडक स्पर्धा झाली. 2019 सालापर्यंत या एकदिवसीय स्पर्धेत भारतीय संघाने सातत्याने पाकिस्तानचा पराभव केला. अर्थात पहिल्या दोन स्पर्धेत भारताचे पाकिस्तानशी सामनेच झाले नव्हते. मात्र, ज्यावेळी या दोन संघात सामने झाले त्यात भारतीय संघाने प्रत्येक वेळी पाकिस्तानचा पराभव केला आहे. विश्वकरंडक स्पर्धा आणि पाकिस्तानशी सामना हे गणित कायमच भारताच्या बाजूने लागले होते. या प्रत्येक सामन्यात भारतीय संघ मैदानात उतरतानाच आपण पाकचा पराभव करणार हेच डोक्यात घेत उतरत असे. हीच मानसिकताच भारतासाठी गेल्या वर्षी धोकादायक ठरली व जिंकण्याचाच विश्वास असलेल्या भारतीय संघाची वाताहत झाली व पराभव स्वीकारावा लागला.
आता टी-20 विश्वकरंडक क्रिकेटचाही प्रारंभ 2007 साली झाला व त्यातही भारतीय संघाने साखळीतील सामन्यासह अंतिम सामन्यातही पाकिस्तानला धूळ चारली व विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत 1983 साली तसेच त्यानंतर तब्बल 28 वर्षांनी 2011 साली भारतीय संघाने विजेतेपद पटकावले. टी-20 विश्वकरंडक स्पर्धेच्या पहिल्याच मोसमाचे 2007 साली भारताने विजेतेपद साकार केले. मात्र, त्यालाही आता तब्बल 15 वर्षे झाली असून यंदा भारतीय संघ पाकिस्तानसह सर्व बलाढ्य संघांना पराभूत करत या स्पर्धेचे विजेतेपद मिळवणार का याचीच उत्सुकता लागली आहे. अर्थात त्यासाठी हा एक सामना असून दोन्ही संघांना समान संधी राहणार आहे. केवळ भारतीय संघाने पाकिस्तानला कमी लेखून आपणच जिंकणार या भ्रमात राहून सामन्यात सहभागी होऊ नये.
फलंदाजीत सरस तर गोलंदाजीत कमकुवत
भारत व पाकिस्तान या दोन्ही संघांचा समतोल पाहिला तर काही महत्त्वाचे मुद्दे समोर येतात. भारतीय संघ फलंदाजीत पाकिस्तानपेक्षा काहीसा सरस आहे यात शंका नाही. सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, दीनेश कार्तिक, हार्दिक पंड्या व ऋषभ पंत असे चांगले फलंदाज संघात आहेत. त्यात पंतचे अपयश वगळता त्याची कामगिरी संघासाठी बोनस ठरू शकते. भारतीय संघाकडे प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह नसल्याने त्याची उणीव निश्चितच जाणवणार आहे. मात्र, अर्शदीप सिंग व हर्षल पटेल या नवख्या गोलंदाजांवरच मदार राहणार आहे.
फिरकीची बाजू यजुवेंद्र चहल, अक्सर पटेल व रवीचंद्रन अश्विन यांच्या कामगिरीवरच भारतीय संघाचे यशापयश अवलंबून राहणार आहे. मात्र, ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांचे बदललेले स्वरूप पाहता फिरकी यशस्वी होईल असेच चित्र सध्यातरी दिसत आहे. यंदाच्या मोसमात प्रमुख गोलंदाजांना झालेल्या दुखापतींमुळे संघात नवोदित गोलंदाजांना संधी मिळाली व अर्शदीप सिंगने या संधीचे सोने केले. मात्र, तरीही संघाला अनेक लढतींमध्ये मोठ्या धावसंख्येचा बचावही करता आला नाही ही देखीव वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. खासकरून आशिया करंडक, ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकांमध्ये 180 पेक्षा जास्त धावा उभारल्यावरही भारतीय संघाचा चमत्कारावरच अवलंबून राहावे लागल्याचे अनेकदा दिसून आले आहे.
शमीच्या समावेशाने ताकद वाढली
पाठीच्या दुखापतीने भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह या स्पर्धेला मुकणार आहे. जेव्हा ही बातमी जाहीर झाली तेव्हा भारतीय संघ आता ही स्पर्धाच जिंकू शकत नाही असेच बोलले जाऊ लागले आहे. याला कारणही तसेच आहे. प्रमुख गोलंदाज संघात नसेल तर विकेट काढणार कोण, असाच प्रश्न येतो. मात्र, आता भारतीय संघाला काहीसा दिलासा मिळाला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज महंमद शमी पूर्ण तंदुरुस्त ठरला असल्याने बीसीसीआयच्या निवड समितीने त्याची बुमराहच्या जागी निवड केली व त्याला ऑस्ट्रेलियाला रवाना केले. शमीच्या समावेशाने भारतीय संघाची ताकद वाढली हे मात्र, खरे आहे. ही स्पर्धा एक महिना चालणार असून ऑस्ट्रेलियात सध्या ऑक्टोबरमध्येच थंडी पडलेली आहे. त्यामुळे जवळपास प्रत्येक सामन्यात स्विंग गोलंदाजी करण्याची क्षमता असलेल्या गोलंदाजांना खेळपट्टीपेक्षा वातावरणाचीच जास्त मदत मिळणार आहे.
शमीकडे यॉर्कर तर आहेच परंतु त्याचे रिव्हर्स स्विंग जास्त भेदक असतात. स्पर्धा जरी टी-20 क्रिकेटची असली तरीही त्यातील चार षटके निदान अनुभवी गोलंदाज टाकणार आहे हाच मोठा दिलासा आहे. हर्षल पटेल व अर्शदीप सिंग यांच्यावर विश्वास असला तरीही अत्यंत बिकट स्थितीत त्यांच्याकडून सरस कामगिरी झाली नाही तरीही कर्णधारापासून संघ व्यवस्थापनापर्यंत कोणीही त्याला दोष देऊ शकणार नाहीत. त्यात पटेलच्या गोलंदाजीबाबत न बोललेलेच बरे. कारण सिझनल फळाप्रमाणे त्याची कामगिरी आहे. त्याच्यावर पूर्ण विश्वास टाकणे संघासाठी धोक्याचे ठरू शकते. अर्शदीप मात्र, दर्जेदार आहे. कदाचित धाडसी विधान ठरेल मात्र, जहीर खानचा पर्याय आपल्याला सापडला असे म्हणायला हरकत नाही.
भूवनेश्वरवर विश्वास का?
भारतात क्रिकेट असो किंवा अन्य कोणतेही क्षेत्र आपल्याकडे पूर्वपुण्याईवर जरा जास्तच विश्वास दाखवला जातो. आशिया करंडक तसेच त्यानंतर ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकांमध्ये प्रमुख गोलंदाज उपलब्ध नसल्याने अनुभवी भूवनेश्वर कुमारलाच खेळवले गेले. त्याने आपल्या स्विंगने यापूर्वी अनेकदा संघाच्या विजयात मोठा वाटाही घेतला हे मान्य मात्र, या तीनही स्पर्धांमध्ये त्याने इतकी सुमार कामगिरी केली की त्यावरून प्रचंड रणकंदन माजले होते. त्यातही निर्णायक षटकांत त्याने दिशाहीन गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघांचेच पारडे एकप्रकारे बळकट केले. खासकरून टी-20 सामन्यात 19 वे षटक त्याने जेव्हा जेव्हा टाकले तेव्हा तेव्हा भारतीय संघावर पराभवांची नामुष्की ओढावली हे सत्य कोणीच नाकारणार नाही.
भूवनेश्वर अनुभवी आहे, त्याच्याकडे चांगला स्विंग आहे. तो एकाच ग्रीपवर दोन्ही स्विंग करू शकतो. त्याचा बांधा व त्यामुळे वेगात केलेले बदलही लक्षणीय ठरतात हे सगळे मान्य; पण जर खेळाडू भरात नसेल तर त्याला वगळण्याची ऑस्ट्रेलियासारखी हिंमत आपण का दाखवू शकत नाही. त्याने आधी काय कामगिरी केली आहे ती पाहून त्यालाच सातत्याने संधी का दिली जाते. उमरान मलिक, नवदीप सैनी, आवेश खान, महंमद सिराज या गोलंदाजांना संधी का डावलली जाते. निवड समिती नक्की कोणाच्या तालावर नाचते. या गोलंदाजांना संधी द्यायची नसेल तर मग भारतीय संघाकडे गुणवत्ता असलेला सेकेंड बेंच आहे असा प्रचार का केला जातो, याची उत्तरे कोण देणार.
असो, आज भारत व पाकिस्तान यांच्यात सामना होत आहे. हा हायव्होल्टेज ड्रामा भारतीय संघ जिंकणार का पाकिस्तानचा संघ पुन्हा एकदा धक्का देणार हे पाहणेच महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, विजय कोणत्याही संघाचा होवो एक अत्यंत सर्वोत्तम दर्जाचे क्रिकेट पाहायला मिळणार यात शंका नाही.
अमित डोंगरे