भारतीय महिला क्रिकेटच्या क्षितीजावर जेव्हा झुलन गोस्वामीचा उदय झाला तेव्हापासून आजपर्यंत तिने केवळ आपल्या क्षमतेपेक्षाही जास्त खेळच केला नाही तर प्रतिमाही स्वच्छ ठेवली. त्यावेळी खरेतर भारताच्या क्रिकेटला क्षितीज म्हणावे असे काहीही नव्हते. कारण सर्वात दुर्लक्षित घटक असेच त्याचे वर्णन करावे लागेल. मात्र, झुलन निवृत्त झाली तोपर्यंत भारताच्या महिला क्रिकेटने जगात अढळस्थान मिळवले हे मात्र, कोणीही नाकारणार नाही.
गेल्या आठवड्यात भारत व इंग्लंड यांच्या महिला क्रिकेट संघात जो तिसरा व अखेरचा एकदिवसीय सामना खेळवला गेला तो झुलनच्या कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरला. या सामन्यानंतर ती सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त झाली. मात्र, जेव्हा तिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत क्रिकेटचे धडे गिरवले ते पाहता शून्यातून स्वर्ग निर्माण करणे कशाला म्हणतात याची प्रचिती येते.
एक सानिया मिर्झा यशस्वी ठरली तर देशातील मुलींमध्ये टेनिसची क्रेझ निर्माण झाली. तेच काम झुलनने महिला क्रिकेटमध्ये केले. तिच्याकडूनच प्रेरणा घेत रेणुका ठाकूर, मेघना सिंग यांच्यासारख्या असंख्य महिला खेळाडूंनी वेगवान गोलंदाज होण्याचे व देशाकडून खेळण्याचे स्वप्न पाहिलेच नाही तर ते पूर्णही केले.
कित्येक पिढ्यांना प्रोत्साहन
एक झुलन यशस्वी ठरली तर काय घडले याचा विचार केला तर असे लक्षात येते की कित्येक पिढ्यांमध्ये नवनव्या झुलन तयार होत आहेत. तिच्या कामगिरीद्वारे तिने आपली गुणवत्ताही सिद्ध केली. भारताच्या महिला क्रिकेटला जागतिक ओळख तिनेच मिळवून दिली. अर्थात अंजूम चोप्रा, मिताली राज यांचेही योगदान तोलामोलाचे आहे यात वाद नाही. परंतु एक महिला परिस्थितीशी झगडा देत चक्क वेगवान गोलंदाज बनते व आंतरराष्ट्रीय स्तरावर शेकडो विकेट घेते हीच मुळात फार मोठी गोष्ट आहे.
जवळपास वीस वर्षे तिने भारताच्या महिला क्रिकेटच्या वेगवान गोलंदाजीचा भार वाहिला. तिला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरप्रमाणे गार्ड ऑफ ऑनर दिला गेला हे तर केवळ स्वप्नवत ठरले. भारतात क्रिकेट हा एका धर्माप्रमाणे मानला जातो. मात्र, हा धर्म केवळ पुरुष क्रिकेटपटूंसाठीच होता, तो महिला क्रिकेटला फारसा लाभत नव्हता मात्र, झुलनने हे चित्र बदलले. महिला क्रिकेटलाही प्रेक्षकवर्ग मिळवून दिला व दुर्लक्षित असलेला भारताचा महिला संघही सातासमुद्रापार यश मिळवू शकतो हे देखील सिद्ध केले. तिच्याकडून प्रेरणा घेत महिला खेळाडूंच्या पुढील कित्येक पिढ्या या खेळाकडे वळतील व आपला ठसाही उमटवतील.
स्वप्न पूर्ण झाले
निवृत्तीची घोषणा केल्यावर झुलन ही पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरली की तिच्या कारकिर्दीची अखेर जागतिक क्रिकेटची पंढरी मानली जात असलेल्या लॉर्डस या ऐतिहासिक मैदानावर तिला अखेरचा सामना खेळायला मिळाला. नेहमी सुतकी चेहरे करून सुटा-बुटात टाय लावून बसलेल्या टीपीकल इंग्लिश प्रेक्षकांनीही मनापासून तिच्या कारकिर्दीला दिलेली दादच तिचे मोठेपणे सिद्ध करते. क्रिकेटची गोडी लागली ती महान क्रिकेटपटू कपिल देव यांनी देशाला विश्वकरंडक मिळवून दिला त्या क्षणापासून असे खुद्द झुलन सांगते. या एका विजेतेपदाने जशी भारताच्या पुरुष क्रिकेटमध्ये क्रांती घडली तीच महिला क्रिकेटमध्येही घडली. मात्र, तोपर्यंत भारताचे महिला क्रिकेट फारसे गांभीर्याने घेतलेच जात नव्हते. मात्र, प्रत्येक आव्हानांचा मुकाबला करत ती आंतरराष्ट्रीय स्तरावरही सातत्याने यश मिळवत राहिली व तिच्या कामगिरीच्या जोरावर जगभरातील नावाजलेल्या फलंदाज बाद होत राहिल्या. तिच्या स्वप्नांची पूर्तता देशाकडून खेळण्याने पूर्ण झाली व तिने पाहिलेले स्वप्नही.
बीसीसीआयमुळे सकारात्मक बदल
भारताचे महिला क्रिकेट 2006 सालापर्यंत एका स्वतंत्र अशा भारतीय महिला क्रिकेट संघटनेतर्फे चालायचे. मात्र, बीसीसीआयने महिला क्रिकेटलाही आपल्या छत्रछायेखाली घेतले व पुरुष क्रिकेटपटूंप्रमाणेच महिलांनाही आर्थिक स्थैर्य लाभले. त्यापूर्वी पैसे मिळत नव्हते असे नाही पण ज्या पुरुष क्रिकेटपटूंना कोट्यधीश होण्याचे भाग्य लाभले ते महिलांच्या बाबतीत होत नव्हते. मात्र, अखेर बीसीसीआयच्या ध्वजाखाली आल्यामुळे महिला क्रिकेटला गती मिळाली, पैसा मिळाला, लोकप्रियताही मिळाली आणखी काय हवे होते. आज गेल्या 16 वर्षांत भारताच्या महिला क्रिकेटमध्ये जे काही बदल दिसत आहेत त्याचे श्रेय जितके खेळाडूंना आहे तितकेच बीसीसीआयलाही आहे हे नाकारता येणार नाही. तसे बीसीसीआयमध्ये असलेले राजकारण महिला क्रिकेटमध्येही आहेच परंतु खेळाडूंना जोवर लाभ होत आहे तोवर त्याबाबत बोलण्याची गरज नाही. आता बीसीसीआयमुळे संपूर्ण मोसमात महिलांच्या क्रिकेट स्पर्धेची तसेच विविध मालिकांची संख्याही वाढत आहे. खेळाडूंना जास्तीत जास्त सामने खेळायला मिळत आहेत. सकारात्मक बदल यालाच तर म्हणतात.
चकदा एक्स्प्रेस
पश्चिम बंगालच्या चकदा नावाच्या एका अत्यंत छोट्या गावातून झुलन थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या व्यासपीठावर येते याला केवळ नशीब नव्हे तर आपले ध्येय गाठण्यासाठी केलेली प्रयत्नांची पराकाष्टा व जिद्दही कारणीभूत ठरली आहे यात शंका नाही. झुलन 5 फूट 11 इंच उंच असल्याने एक वेगवान गोलंदाज बनली व त्यातूनच तिने आपली ओळख निर्माण केली जी आज व पुढेही जागतिक क्रिकेटमध्ये कायम राहील. झुलन चकदा गावातून क्रिकेटचा सराव करण्यासाठी रोज तब्बल अडीच तास प्रवाश करत होती. या वाटचालीत लागलेले किलोमीटरचे तसेच टीकेचे दगड तिने या प्रवासात पार केले.
आज नव्या खेळाडू तिचाच पाठलाग करताना दिसत आहेत व पुढेही दिसतील. ऐतिहासिक लॉर्डस मैदानावर गेल्या शनिवारी खेळलेला सामना हा झुलनच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 204 वा सामना होता. तब्बल 20 वर्षे भारतीय महिला संघाची वेगवान गोलंदाजी तिने सांभाळली. कोलकातातील इडन गार्डन्स मैदानावर 1997 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ती बॉलगर्ल होती व या सामन्यात कॅथरीन फिट्झपॅट्रिकचा खेळ पाहून झुलननेही प्रेरणा घेतली. तिच्यासारखीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू बनण्याची तिची वाटचाल सुरू झाली व पुढे पाचच वर्षांत तिने आपल्या कारकिर्दीतील पहिला सामना 2002 साली खेळला.
एक स्वप्न मात्र, अपूर्ण
तब्बल वीस वर्षांच्या कारकिर्दीत झुलनला अनेकदा स्वप्नपूर्तीचा आनंद मिळाला मात्र, एक स्वप्न अपूर्णच राहिले. जसे सचिनच्या 23 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 2011 सालच्या विश्वकरंडक स्पर्धेतील विजयाने एक वर्तुळ पूर्ण झाले ते भाग्य झुलनला मात्र, लाभले नाही, याची खंत आहे. भारतीय संघाने 2005 व 2017 सालच्या महिला एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धांची अंतिम फेरीही गाठली होती, मात्र त्यांना विजेतेपदापासून लांब राहावे लागले. संपूर्ण कारकिर्दीत विश्वकरंडक उंचावता आला नाही याचे शल्य आता तिला आयुष्यभर राहणार आहे.
काही महिन्यांपूर्वी मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, आता झुलनही निवृत्त झाली आहे. त्यामुळे ज्या दोन खेळाडूंनी भारतीय महिला क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला, नवोदितांना प्रेरणा दिली त्यांची उणीव भारताच्या महिला संघाला सतत भासत राहणार हे निश्चित. तसे पाहिले तर आता भारताच्या संघात अनेक नवोदित महिला क्रिकेटपटू पुढे येत आहेत पण अनुभवाला पर्याय नसतो असे म्हणतात याची प्रचिती सध्याची कर्णधार हरमनप्रीत कौरलाही येईल. सामन्यातील कठीण परिस्थितीत काय करावे याचा सल्ला झुलनसारख्या अनुभवी खेळाडूच देऊ शकतात म्हणूनच तिच्या निवृत्तीचा परिणाम महिला क्रिकेट संघावर पडणारच आहे.
सेकंड इनिंग काय असेल?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर आता झुलन काय करणार, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. गेली वीस वर्षे केवळ सामने खेळणे हे एकच काम होते. आता निवृत्तीनंतर सेकंड इनिंग कोणती असेल हा तिढा झुलनसमोरही निर्माण झाला आहे. ती बोलायला खूपच शांत; पण प्रभावी असल्यामुळे समालोचक म्हणूनही ती यशस्वी होऊ शकते.
मात्र, जिला प्रॅक्टिकलची सवय आहे ती बोलण्याचे काम करण्यापेक्षा एक प्रशिक्षक म्हणून कार्यरत होईल अशी अपेक्षा आहे. आता येत्या काळात महिलांची परिपूर्ण व बहुप्रतिक्षित आयपीएल स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून त्यातील एका संघाची प्रशिक्षक म्हणून ती पुन्हा एकदा मैदानावर दिसेल अशी अपेक्षा आहे. एक गोष्ट निश्चित की ती एकमेवाद्वितीय आहे यात शंका नाही.
अमित डोंगरे