आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने ।
शब्दांचीच यत्ने शस्त्रे करू ।।
शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन ।
शब्द वाटू धन जनलोका ।।
तुका म्हणे पहा शब्दची हा देव ।
शब्देची गौरव पूजा करू ।।
संत तुकाराम यांचा हा अभंग भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी गायला असून संगीत श्रीनिवास खळे यांचे आहे. हा अभंग संत तुकारामांचा असल्यामुळे तो तुकारामांना तंतोतंत लागू पडतो. त्याच प्रमाणे हा अभंग आचार्य अत्रे यांना देखील लागू पडतो. मराठी शब्दसंपदा म्हणजे शब्दाची रास हीच धनांची रास आचार्य अत्रे यांनी मानली.
मराठीतला हा एकमेव नाटककार असा आहे की, ज्याच्या नाटकातील सुभाषिते पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालेली आहेत. हे सगळं अद्वितीय,असाधारण, अघटित होय. त्यातील काही उदाहरणे आपणाला देतो. स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता आहे. हे त्रिकालाबाधित सत्य आचार्य अत्रे यांनी आपल्या “घराबाहेर’ नाटकामध्ये सांगितलेले आहे. त्यात स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय या देशाची सर्वांगीण प्रगती होणार नाही, असे भविष्य आचार्य अत्रे यांनी वर्तवलेले आहे. मंगलसूत्र हे पतिव्रत्य निशाणी नसून नवऱ्याच्या दास्यत्वाची निशाणी होय म्हणून स्त्रीवादी चळवळीचा पाया घातला.
जीवन पारदर्शक आहे! वाङ्मय माझा व्यवसाय नसून, जीवनच माझा व्यवसाय आहे. आई जिवंत असेपर्यंत आईची किंमत कळत नाही आणि आई गेल्यावर कशातच किंमत उरत नाही. त्यांच्या वाङ्मयावरील प्रभुत्वाबद्दल काही दाखले आपल्याला देता येतील. प्रा. ना. सी. फडके यांच्याशी 30 वर्षे वाद घातल्यानंतर त्यांच्यात समेट झाला. आचार्य अत्र्यांच्या 70व्या वाढदिवसाला प्रा. ना. सी. फडके यांनी आचार्य अत्रे यांच्या गुणगौरवार्थ लेख लिहला. नंतर ना. सी. फडके यांच्या शुभ हस्ते आचार्य अत्रे यांचा वाढदिवस- सत्कार पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना आचार्य अत्रे म्हणाले, “काय गंमत आहे बघा! काल मुंबईमध्ये, साहित्य संघ मंदिरात पुराण पुरुष दत्तो वामन पोतदार यांच्या शुभहस्ते सत्कार झाला. आज पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात प्रणय पुरुष : प्रा. नारायण सीताराम फडके यांच्या शुभहस्ते माझा सत्कार होत आहे.’
एकदा साहित्य सम्राट आचार्य बाबुराव अत्रे आणि नटश्रेष्ठ बाबुराव पेंढारकर बसने प्रवास करीत होते. या दोघांचीही आर्थिक स्थिती काही फारशी चांगली नव्हती. ते शिवाजी पार्कवरून बसमध्ये चढले. कट कट कट तिकीट तिकीट असं विचारल्यावर आचार्य अत्र्यांनी पाठीमागे खूण करून दाखवले. दोघंही आडदांड असल्यामुळे शेजारी शेजारी बसणे शक्य नसल्याने एकापाठोपाठ एक ते बसले होते. कंडक्टर नटश्रेष्ठ बाबुराव पेंढारकर यांच्याकडे गेल्यावर त्यांनी खिशावर हात ठेवत “आहेत-आहेत’ असे सुचवले. कंडक्टरला वाटले एक साहित्य सम्राट आणि एक नट सम्राट एवढे मोठे माणसे कशाला खोटं बोलतील? म्हणून पुढे गेला. नंतर हे दोघेही केनेडी ब्रीजला उतरले. त्या ठिकाणी नवयुगचे ऑफिस होते. ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांच्या कॅशियरने “लग्नाची बेडी’ नाटकाच्या रॉयल्टीच्या चार मनी ऑर्डर आलेल्या आहेत, असे सांगितले. त्याबरोबर आचार्य अत्रे पैसे घेऊन निघाले. ते असं म्हणाले, “चला बाबुराव आता एकदम ताज महाल हॉटेल!’ ते पुढे म्हणतात- भरल्या खिशाने आणि रिकाम्या पोटाने आम्ही ताजमहालमध्ये गेलो अन् भरल्या पोटाने आणि रिकाम्या खिशाने आम्ही परत आलो.
आणखी एक उदाहरण सांगतो- आचार्य अत्रे यांची आई कोकिळा व्रत करत असे. कोकिळा आरवल्याशिवाय उपवास सोडत नसे. एकदा कोकिळा अरवलीच नाही. आचार्य अत्रे कोणालाही न कळवता घराबाहेरील पिंपळाच्या झाडाच्या ढोलीत चढून बसले आणि तेथूनच कोकीळचा कू ज न केले. आईने उपवास सोडला. अन् माझे पोट भरले. म्हणजे भाषा वापरण्याची आचार्य अत्र्यांची गंमत आणि कौशल्य!
आपली भाषा साधी, सोपी, सहज पटेल अशी लिहीत. मराठी भाषा वापरण्याची आचार्य अत्रे यांची खासियत होती. मराठी भाषेवर हुकूमत -वर्चस्व-प्रभुत्व होते, ते इतरांना जमले नाही. आचार्य अत्रे यांच्या भाषेचा जनतेवर परीणाम होत असे. इतकी ती जिवंत आपलीशी भाषा वाटत असे! “आता शब्दही धन’ झालं आहे हे वरील सर्व उदाहरणावरून आपल्या लक्षात आले असेलच.
आता “शब्द शस्त्र’ कसे आहेत हे संयुक्त महाराष्ट्राच्या महासंग्रामातून कळते. आचार्य अत्रे यांची भाषा तळपत्या तलवारीसारखी होती. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये वंशभेद, जातीभेद, लिंग भेद, सगळ्या भेदांना गाढून जनतेची वज्रमूठ झाली होती. तशीच अभेद्य-अभंग एकजूट वज्रमूठ महाराष्ट्राच्या महासंग्राम काळामध्ये आचार्य अत्रे यांनी व समितीच्या अतिरथी-महारथींनी केली होती. कारण आचार्यांच्या भाषेला तेज आणि ओज प्राप्त झालेलं होतं.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात, थोरले बाजीरावांच्या काळामध्ये त्यांच्याजवळच घोडदळ, पायदळ, तोफा, बंदुका, होत्या. आचार्य अत्रे यांच्या जवळ फक्त वाणी, लेखणी, विनोद, व्यंगचित्र या अहिंसात्मक शस्त्रास्त्रांचा मारा करून शत्रूची दाणादाण करून सोडली. त्यांनी भाषिक महाराष्ट्र मिळवला. मराठी भाषेतून आचार्य अत्रे निर्माण झाले. आचार्य अत्र्यांनी सोपी, साधी, सरळ, भाषेतून मराठी वाङ्मय समृद्ध, संपन्न केले. एवढेच नव्हे तर मराठी भाषेचा प्रांत निर्माण केला! हे जगाच्या इतिहासात आचार्य अत्रेंच्या शिवाय दुसरे उदाहरण आपल्याला दाखविता येणार नाही. आचार्य अत्रे नसते तर मुंबई महाराष्ट्रामध्ये समाविष्ट झाली नसती ही काळ्या दगडावरची रेघ होय.
आज मुंबईमधून 90 हजार कोटी ते 1 लाख कोटी हे आपण लिहू शकणार नाही एवढा महसूल महाराष्ट्राला मिळतो. त्यामुळे महाराष्ट्राचे वाळवंट झाले नाही. नाही तर महाराष्ट्राचा बिहार झाला असता! हे जाणकारांना लक्षात येतंय कां? काहींवर प्रहार केले, काही लोकांना हार घातले! काही लोकांना डोक्यावर घेतले! काही लोकांना पायी चिरडले! काहींना दूषणे दिली! काहींना आभूषणे चढविली! काही लोकांना अभिष्टचिंतनाचा जय जयकार केला तर काही लोकांच्या दुःखद निधनानंतर भावांजलीची फुले उधळली. सर्व सामान्य मराठी जनतेच्या हृदय सिंहासनावर विराजमान झालेला मराठी सारस्वत म्हणजे साहित्यसम्राट आचार्य अत्रे होत. 13 जून रोजी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन.
ऍड. बाबुराव कानडे