भर उन्हात चालताना मध्येच शिराळ पडावं आणि आभाळाकडं पाहताना मन आणि शरीराला क्षणात सुखावल्यासारखं वाटावं… कितीसं बरं ते सुख? अवघ्या काही क्षणापुरतं. सावलीचा पाठलाग करणारी पावलं दमतातच आणि उन्हाची झळ सोसत सोसत रस्ता कापतातच..!
आपलं आयुष्य तरी यापेक्षा वेगळं का आहे? चढ-उताराच्या जीवनप्रवासात, सुख-दुःखाचे बांधलेले गाठोडे वाहून नेणाऱ्या मनाला आठवणींचं शिराळ सुखावतं. मनाला दुःखाचे कितीही चटके बसलेले असू देत; पण गोड आठवणींची ती झुळूक मनावर हळुवार फुंकर घालते आणि क्षणात ते शहारतं. मन पाखरू होऊन उडायला लागतं. आठवणींच्या कधी या गावी तर कधी त्या गावी..!
माझ्या मनालाही अशीच पावलं फुटतात. आणि कधी मी बप्पांच्या पुढे जाऊन उभा राहतो कळतच नाही. बप्पा; आमचे आजोबा. “बप्पा…’ म्हणून आवाज देताच, मोठमोठाल्या ओंडक्यांना ढकलताना दमछाक झालेल्या बप्पांच्या चेहऱ्यावर आम्हाला पाहून नेहमीसारखं हसू यायचं. “…थांब तिथंच. आलो मी.’ हातवारे करून बप्पा मोठ्याने आवाज द्यायचे. बप्पा लाकडी मशीनवर काम करायचे. काहीवेळाने बप्पा आपल्या चश्म्यावरचं आणि अंगावरचं भुसकट साफ करत यायचे आणि मला जवळ घ्यायचे. कामावरचे कपडे काढून अंगात नेहरू शर्ट घालायचे आणि धोतराला काष्टा मारून सायकल हातात घ्यायचे. सायकलवर सामानाच्या पिशव्या ठेवून आमची पावलं सुतार नेटावरच्या वाड्याकडं पडायची. आमची आजी म्हणजे ताई; आम्हा नातवंडांना जवळ घेत मुके घ्यायची. त्यावेळी वाड्यात बप्पांचे धाकटे भाऊ नाना आणि तात्या व त्यांची मुले राहायची. त्यावेळी वाडा कसा भरल्यासारखा वाटायचा!
उन्हाळी सुट्टी आणि दिवाळीत आजोळी जामखेडला जायचा योग यायचा. माडीवर आम्ही झोपेत असतानाच, सवयीप्रमाणे बप्पांनी भल्या पहाटे उठून रेडिओवर लावलेल्या भूपाळ्यांचा; तर कधी टेपरेकॉर्डमधील अभंगांचा आवाज कानी पडायचा. आजही माझ्या घरी पहाटे भीमसेन जोशींचे नाहीतर किशोरी ताईचे अभंग ऐकू येतात. कानाला झालेली सवय की बप्पांचे संस्कार? संस्कारच!
“आज आमरस करू. तुम्हाला आंबे घेऊन देतो.’ म्हणून बप्पा सकाळी आम्हाला सोबत घेऊन जायचे. घरापासून बाजारपेठेत जाईपर्यंत कितीतरी लोक त्यांना भेटायचे. “जय हरी बप्पा… राम कृष्ण हरी…’ म्हणताना कुणी बप्पांच्या पाया पडत; तर कधी बप्पा समोरच्या वयस्क व्यक्तीचे पाय धरत. बप्पांच्या अंगी एक विनम्रता होती. इतकी; की ते आपल्या मुलांनादेखील आवंजावं करायचे. त्यांच्या आत दुसऱ्यांप्रती सद्भावना असायची. ते कधी कोणावर रागावले किंवा चिडलेले मला आठवत नाही. तिरस्कार काय असतो, हे त्यांना माहीत नव्हतं.
बप्पांचं शिक्षण तसं कमीच. परंतु कमी वयात खांद्यावर पडलेल्या जिम्मेदारीने त्यांना खूप काही शिकवलं. ताई सांगते; की पहाटे उठून सरपण फोडण्यापासून ते कावडीने दुसऱ्याच्या घरी पाणी वाहून न्यायचे काम त्यांनी केले. ते घरकामात त्यांच्या आईलाही मदत करायचे. पाच भावंडांच मोठं कुटुंब; पण हलाखीच्या परिस्थितीतही एकमेकांना आधार देत जगण्याचं सूत्र त्यांना गवसलं होत. बप्पा आणि त्यांच्या सर्व भावंडांची लग्न झाली. हळूहळू काळ पालटत गेला. कालांतराने सगळी भावंडं विभक्त राहू लागली. चुली वेगवेगळ्या झाल्या तरी एकमेकांच्या मदतीसाठी सगळेजण धावून यायचे.
कारखान्यावरचा व्याप वाढला. बप्पांच्या हाताखाली 7-8 कामगार होते. आणि विशेष म्हणजे ते स्वतःच्याच कारखान्यात कामगारासारखे काम करायचे आणि 60-70 रुपयांप्रमाणे पगार घ्यायचे. वेगळं राहायला लागल्यापासून बप्पा सतत चिंतेत असायचे. मुला-मुलींची शिक्षणं आणि त्यांची लग्नकार्ये याच गोष्टीचा त्यांनी ध्यास घेतलेला असायचा. त्यांचा मित्रपरिवार भाई फुटाणे, कोठारी परिवार, एकनाथ आणि व्यापारी लोकांनी त्यांना वेळोवेळी मदतीचा हात पुढे केला.
काळ सरत गेला. बप्पांचं घर आम्हा नातवंडांनी भरून गेलं. बप्पांनी कधी त्यांच्या मुलांमध्ये आणि मुलींमध्ये भेदभाव केला नाही. एवढंच नाही, तर त्यांनी त्यांच्या जावयांना देखील मुलांसारखंच प्रेम दिलं. मध्यंतरी ते आजारी पडले आणि आयुष्याच्या शेवटी नको त्या आजारांनी त्यांना घेरलं. मधुमेह नंतर अँजिओग्राफी ऑपरेशन आणि दोन हृदयविकाराचे झटके! त्यातून ते सावरत नाहीत तोवर रिक्षाने दिलेल्या धडकेत त्यांच्या एका डोळ्याचे बुब्बुळ फुटले. पण बप्पा खरंच खूप सहनशील होते. त्यांच्यामध्ये जीवन जगण्याची प्रचंड इच्छाशक्ती होती. पण नियतीपुढे झुकावं लागतं.
गेल्या महिनाभरापासून बप्पा अंथरुणाला खिळून होते. हळूहळू त्यांची स्मृती पुसट होत चालली होती. मामाने त्यांचे कर्तव्य पार पाडताना कसली किळस नाही केली. त्यांच्या तिन्ही मुली दिवसरात्र उशापायथ्याला बसून होईल तशी सेवा करत होत्या. रोज बप्पांना भेटायला येणाऱ्या लोकांचा मोठा राबता होता. त्यादिवशी मी त्यांना भेटायला गेलो. “बप्पा… मला ओळखलं का?’ बप्पांचे डोळे खोल गेले होते. गेली चार दिवस डोळे बंद करून निपचित पडून राहिलेले बप्पा, त्यादिवशी डोळे भरून सगळ्यांकडे पाहत होते.
ते फक्त हसले आणि त्यांनी थरथरते हात माझ्या गालावरून फिरवले. आपसूक माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्यांना पाहून मी माघारी फिरलो. पण का कुणास ठाऊक मनातली अस्वस्थता कमी होत नव्हती आणि दोनच दिवसांनी रात्री 12.30 वाजता आईचा फोन आला. “आपले बप्पा गेले.’
हुंदक्यावर हुंदके देत सगळेजण रडत होते. मी बप्पांना शेवटचं कवटाळून घेतलं होतं. आता पुन्हा तो मायेचा हात गालावरून फिरणार नव्हता. पण त्यांच्या आठवणी आत एवढ्या खोल रुतून बसल्या आहेत की; त्यांचा आभास आमच्या मनाला सतत सुखावत राहील. उन्हातल्या शिराळासारखं..!
– अमोल भालेराव