रविवारची सुट्टी असली तरी मित्रमंडळी सकाळी लवकरच घराबाहेर पडले. आजचा प्लॅन जवळची टेकडी सर करण्याचा होता. त्यात त्यांनी दोन प्रकारची रेस लावली होती.
एक होती टेकडीच्या पायथ्यापर्यंत कोण लवकर पोचतो याची आणि दुसरी होती न थांबता टेकडीवर कोण आधी पोचणार याची. त्यामुळे गप्पा, दंगा, मस्ती याला फाटा देत प्रणव, मिहीर, सानवी, तन्वी, अनय इतर मित्रांसोबत थोडे पुढे मागे होते. पण पायथ्याशी मात्र तन्वी आधी पोहोचली. थोडा जरा दम घेऊन मंडळी टेकडी चढायला सज्ज झाली. टेकडी चढण्यात मात्र चपळ अनयने बाजी मारली. टेकडीवरून रमतगमत उतरताना मात्र आता गप्पा रंगात आल्या.
नेहमीप्रमाणे प्रणवच्या मनातील शंकासूर जागा झाला आणि मनात आलेली शंका विचारल्याशिवाय त्याला चैन पडेतच नसते.
“बोल शंकासूर बोल मनातले’, मिहीर चेष्टेने प्रणवला बोलला.
“चेष्टा करू नकोस. पण मगाचपासून एक प्रश्न मनात घोळतो आहे. घरून निघाल्यापासून तन्वीच्या पाठोपाठ मी होतोच, अगदी भरभर चालत होतो. वाटत होते आता तन्वीला गाठेन, आता तन्वीला गाठेन. पण दोघांमधील अंतर कमीच होत नव्हते. असे का बरं असेल?’ प्रणवने विचारले.
“त्याचे काय आहे प्रणव, तुझा बोलण्याचा वेग जास्त आहे चालण्याचा नाही.’ अनय अजूनही चेष्टेच्याच मूडमध्ये होता.
“ए गप रे अनय. हे काही प्रणवच्या प्रश्नाचे उत्तर नाही. खरंच आमचा दोघांचाही चालण्याचा वेग जवळपास सारखा आहे. तन्वीलाही खरंतर प्रणवने तिला कसे काय गाठले नाही, हा प्रश्नच पडला होता.’
त्यामुळे प्रणवच्या प्रश्नाचे उत्तर समजून घेण्यासाठी सगळीच मिहीरच्या घरी जमली.
“प्रणव खरंतर तुझे अभिनंदन. कारण तुला असा प्रश्न पडला आणि विचारण्याचे धाडस केलेस. आता तुझ्या शंकेचे समाधान करण्यापूर्वी एक सांग, तुम्ही चालायला सुरुवात करताना तन्वी तुझ्यासोबत होती का?’
“नाही काका. ती थोडी माझ्यापुढे होती.’
“आता बघ. तुम्हा दोघांचा वेग सारखाच आहे त्यामुळे तुमच्यातले अंतर सारखेच राहिले.’
“म्हणजे माझा वेग कमी झाला असता किंवा प्रणवचा वेग वाढला असता तर प्रणव माझ्या सोबत आला असता का?’
“पण मग काका माझा वेग अजून थोडासा जरी वाढला असता तरी मी तन्वीला गाठले असते का?’
“प्रणव, तुम्ही गणित, विज्ञानाचा अभ्यास करता ना? मग फक्त थोडा वेग म्हणजे किती वाढायला हवा याचा विचार करा बरं.’
“काका असा ताशी वेग थोडाच माहीत आहे आम्हाला?’ सानवीने शंका काढली.
“अरे, वेग किती का असेना; अगदी “क्ष’ “य’ काहीही असेल तरी काय करायला हवे समजायला हवे.’ मिहीरच्या बाबांनी समजावले.
“बाबा, तन्वी जर एकाच जागी थांबली असती, तर प्रणव त्याच्या आहे त्या वेगाने तिला गाठू शकला असता. परंतु तन्वी पण चालत होती.’ मिहीरचे वाक्य पूर्ण होण्याआधीच प्रणव एकदम मध्येच बोलला
“म्हणजे माझा वेग दुपटीने वाढायला हवा होता. जर मी तन्वीचा वेग अधिक माझा वेग एवढ्या वेगाने गेलो असतो तर तिला गाठले असते. बरोबर ना?’
“अरे खरंच की! गणितामध्ये आपण आगगाड्यांची सूत्रे नाहीत का शिकलो. एका दिशेने जाणाऱ्या “अ’ आणि “ब’ गाड्या आहेत, तर “अ’ ला ओलांडून जाण्यासाठी “ब’ चा वेग हा “अ’ अधिक “ब’ चा वेग एवढा असायला हवा.’ अनय एकदम टाळी वाजवून बोलला.
“हो आणि मला अजून एक लक्षात आले. सायकल चालवताना जर समोरून वारा येत असेल, तर सायकल चालवाचा वेग कमी असतो. पण हेच जर मागून वारा येत असेल तर सायकलचा वेग वाढतो आणि हा वेगवाऱ्याच्या वेगाएवढा कमी-जास्त होतो’, प्रणव परत एकदा मिहीरचे वाक्य पूर्ण होण्याआधीच मध्येच बोलला. मुलांच्या चेहऱ्यावर आता पुस्तकातून सोडवलेल्या गणिताचा अर्थ नीट समजल्याचा आनंद होता.
– विशाखा गंधे