टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक विजेत्या खेळाडूंना पुरस्कार दिले जात आहेत याचे महत्त्व आहेच; पण आता भारतीय क्रीडा क्षेत्रात एक नवा पायंडा पडत असल्याची चाहुल लागत आहे. ज्या खेळाडूंना पदकाने हुलकावणी दिली किंवा अल्पशा चुकीमुळे त्यांचे पदक हुकले त्यांनाही पुढील स्पर्धांसाठी प्रोत्साहन मिळावे या करता एका कंपनीने पुढाकार घेत अपयशाचे धनी बनलेल्या खेळाडूंनाही रोख रकमेची बक्षिसे देण्याचे निश्चित करत त्याचे वाटपही केले.
उगवत्या सूर्यालाच नमस्कार या धाटणीच्या विचारांवर आपल्या देशात क्रीडाक्षेत्राकडे पाहिले जाते. 2004 सालच्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये आपल्या राजवर्धन राठोड या नेमबाजाने पदक जिंकले व तेव्हापासून एखाद्या स्पर्धेचा अपवाद वगळता सातत्याने त्यानंतरच्या प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये आपण पदके मिळवली आहेत.
पदक विजेत्या खेळाडूूंना सरकारी पातळीवरच नव्हे तर खासगी प्रायोजकांकडूनही रोख रकमेचे पुरस्कार दिले जातात. यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने स्पर्धेच्या इतिहासात सर्वात जास्त पदकांची नोंद आपल्या खेळाडूंनी केली. पदकांची सप्तमी साध्य करताना या खेळाडूंनी मिळवलेल्या यशाला रोख रकमेच्या पुरस्कारांनीही नावाजले गेले.
यंदा सुवर्णपदक जिंकणाऱ्या भालाफेकपटू निरज चोप्रा याला तर विविध संस्था, संघटना तसेच विविध राज्यांच्या सरकारांनी कोट्यधीशही बनवले. निरज याच्यासह पी. व्ही. सिंधू, मीराबाई चानू, रवीकुमार दहिया, बजरंग पुनिया, लोवलिना बोर्गोहेन व भारताच्या पुरुष हॉकी संघांनी या स्पर्धेत पदके मिळवली. त्यानंतर आता त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव तर होतच आहे; पण प्रचंड रकमांचे पुरस्कार तसेच येत्या काळातील चमकदार कामगिरीसाठी विविध कंपन्यांची प्रायोजकताही मिळत आहे.
मात्र, ज्या खेळाडूंना पदकाने हुलकावणी दिली आहे अशा खेळाडूंच्याही कामगिरीची, मेहनतीची व त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांची दखल मॅनकाइंड फार्मा या औषध निर्मिती कंपनीने घेतली आहे याचे सर्वात जास्त कौतुक आहे. यंदाच्या स्पर्धेत अगदी थोडक्यात ज्या खेळाडूंच्या पदरी अपयश पडले आहे अशा तब्बल 20 खेळाडूंना प्रत्येकी 11 लाख रुपयांचे पारितोषिक या कंपनीने देण्याचे निश्चित केले आहे. इतकेच नव्हे तर टाटा कंपनीनेही पुढाकार घेत या खेळाडूंना प्रत्येकी एक अल्ट्रोज ही अलिशान चारचाकी गाडी भेट दिली जाणार आहे.
या स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या कठोर परिश्रमांची, त्यांच्या खेळाची तसेच संघर्षाची चर्चा आजही होत आहे. त्यातही पदकविजेत्यांसह अपयशाचे धनी बनलेल्या मात्र, ज्यांच्याकडे अफाट गुणवत्ता आहे व पुढील काळात होत असलेल्या स्पर्धांमध्ये ते चमकदार कामगिरी करतील असा विश्वास आहे अशा खेळाडूंना निराशेच्या मानसिकतेतून बाहेर काढून रोख पुरस्कार देऊन त्यांच्यातून नवे पदक विजेते घडवण्याचे हे प्रयत्न जर यशस्वी ठरले तर ही भारतीय क्रीडाक्षेत्राला कलाटणी देणारी घटना ठरेल यात शंका नाही.
या 20 खेळांडूंमध्ये भारताच्या महिला हॉकी संघाच्या सर्व 16 खेळाडूंसह मुष्टियोद्धा सतीश कुमार, कुस्तीपटू दीपक पुनिया, नेमबाज सौरभ चौधरी व महिला गोल्फपटू आदिती अशोक यांचा समावेश आहे. यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने दिमाखदार कामगिरी सिद्ध करताना 1 सुवर्ण, 2 रजत तर 4 ब्रॉंझ अशी एकूण सात पदके मिळवली.
आता येत्या काळात आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात विश्वकरंडक, राष्ट्रकुल, जागतिक विजेतेपद, दक्षिण आशियाई तसेच अन्य काही मानाच्या स्पर्धा होणार आहेत. टोकियोत जे यश मिळवता आले नाही ते यश या स्पर्धांमध्ये मिळवत 2024 साली पॅरिसमध्ये होत असलेल्या ऑलिम्पिकमध्ये पदकाचा विश्वास देण्यासाठी हेच खेळाडू सज्ज होतील असा विश्वास वाटतो.
टॉप्सची कक्षा वाढवा
केंद्र सरकारने केंद्रीय क्रीडामंत्रालयाच्या सहकार्याने टार्गेट ऑलिम्पिक पोडियम (टॉप्स) ही योजना तयार केली आहे. त्यात भारतीय क्रीडा प्राधिकरणाचाही (साई) सहभाग आहे. या योजनेत अशा खेळाडूंना सहभागी करून घेतले जाते की जे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश मिळवतील. या योजनेला कोणत्याही क्रीडा प्रकाराची ऍलर्जी नाही.
देश पातळीवर सातत्याने यश मिळवत असलेल्या खेळाडूंना सहभागी करून घेताना आता येत्या काळात या योजनेची व्याप्ती व कक्षा वाढवली गेली पाहिजे. राष्ट्रीय, विभागीय स्तरावर सरस कामगिरी केलेल्या खेळाडूंनाही जर या योजनेत सहभागी करून घेतले गेले तर त्यांच्यातूनच ऑलिम्पिक पदक विजेते तयार होतील. या खेळाडूंना परदेशात सातत्याने सामने व स्पर्धा खेळण्यासाठी पाठवले गेले पाहिजे.
अमित डोंगरे