-सत्येंद्र राठी
“स्त्री म्हणजे पायाची दासी’ अशी परिस्थिती आज नसली तरी एकदमच शून्य झाली आहे असेही नाही. स्त्रीला पाहिजे असलेल्या आधाराची काठीच्या (वडील, भाऊ, पती, पुत्र) गरजेतून काही सणांचा जन्म झाला असावा, त्याबाबत…
एका माणसाच्या पत्नीला अचानकच वेड लागले, तिला मनोचिकित्सकाकडे नेण्यात आले. तिच्या नवऱ्याला विचारले गेले की, हे अचानक कसे घडले? तिच्या अशा वागण्याचा काही पूर्वेतिहास आहे का? आधीही असं कधी घडलं होतं का? यावर त्या माणसाने सांगितले की वीस वर्षे झालीत आमचं लग्न होऊन मात्र असे पहिल्यांदाच घडलयं.
मीही चकित आहे; किंबहुना वीस वर्षांत ती स्वयंपाकघरातच गुरफटून होती. बाहेर पडलीच नाही. मनोचिकित्सक मध्येच त्याला थांबवत म्हणाला… हा हा कळालं मला सारं… आता माझं ऐका, वीस वर्षे ज्या स्त्रीला स्वयंपाकघरात अडकवून ठेवले होते, जिला बाहेर यायची मोकळीक नव्हती, ती वेडी नाही होणार तर काय होणार?
या प्रसंगातील, संवादातील गमतीचा भाग सोडला आणि लक्षात घेतलं, तर समजेल की भारतीय समाजात स्त्रीला नेहमी बंद करून ठेवले गेले, मग ते घरात असो की पडद्याआड, ती बंदिस्तच राहिली, बंधनातच राहिली.
बंधन कोणाचं तर पुरुष वर्गाचं, पुरुषी मानसिकतेचं. रक्षाबंधनही त्या बंधनापैकीच. वाचून थोडेसे चमकल्यासारखे होईल पण खरं आहे. लहानपणी वडील, तारुण्यात पती, तर उतारवयात पुत्र यांच्या कह्यात राहणे हे सूत्र तिला बंधनकारक असते.
तिच्याबद्दलचे सारे निर्णय कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पुरुषच घेत असतो. मागील काही वर्षे वगळता तिला तिचे स्वतंत्र असे अस्तित्व नव्हतेच. तिने कसे राहावे, कसे वागावे, किंबहुना काय खावे, काय नेसावे याचे निर्णयही पुरुषच घेत. तिने कुठे जावे, कोणाबरोबर जावे, कधी जावे यावरही पुरुषांचाच अंमल. ओशो सांगत की, समाजाची रचना पुरुषांनी केली आणि त्याने स्वतःला केंद्रस्थानी आणून ठेवले; आणि स्त्रीला मात्र जाणीवपूर्वक अंतरावर ठेवले. तिला निर्णय प्रक्रियेत येऊ दिले नाही. तिला वेळोवेळी मोठेपणा दिला; पण स्वतःवर आश्रित ठेवले. या अवलंबित्वाची रचना अशी केली की पुरुषांपासून बचाव व्हावा यासाठी तिने पुरुषांवरच अवलंबित राहावे.
तुम्ही बघा एकट्या स्त्रीची रस्त्यावर जर कोण्या पुरुषाने छेड काढली तर ती स्त्री घरी पोहोचल्यावर या गोष्टीची तक्रार घरातील पुरुषाकडे करते आणि पुढच्या वेळी बाहेर निघताना घरातील पुरुषाला घेऊन बाहेर निघते. म्हणजे, पुरुषांपासून बचावासाठी पुरुषांचाच आधार. हे आपण नित्यनेमाने बघत आलो असल्याने आपल्याला यात काही वावगं वाटत नाही, पण याचा अर्थ गहन आहे, नीट विचार केला तर अर्थ उमगेल. आधी स्त्रीला भयप्रद वातावरण देणे आणि मग स्वत:च तिचे संरक्षक बनणे अशी दुटप्पी भूमिका घेत पुरुषाने स्त्री जातीस कायम संभ्रमात ठेवले. त्याने स्वतःला तारक आणि मारक दोन्ही भूमिकेत समोर आणले.
रक्षाबंधनही अशाच मानसिकतेच्या गर्भातून उत्पन्न झालेला सण आहे. याला सणाचे नाव दिले असले तरी शेवटी तिथंही पुरुषी मानसिकताच क्रियाशील दिसते. दरवर्षी बहीण भावास राखी बांधते आणि त्याच्याकडून स्वतःच्या सुरक्षेचे वचन घेते. वरकरणी हे एकदम साधे, सरळ वाटत असले तरी खरी मेख इथंच आहे, ज्याचा आपण कधीही विचार केला नाही.
राखी बांधणारी बहीण भावाकडून स्वतःच्या रक्षणाचे वचन घेते, पण भावाने हे रक्षण कोणापासून करायचे असते? तर लौकिक अर्थाने एका पुरुषापासून आणि करणारा कोण असतो? तर तोही एक पुरुषच, म्हणजे पुरुषांपासूनच भय आणि सुरक्षाही पुरुषांकडूनच. खरं पाहता पुरुषसमाजाने आजपावेतो स्त्रीस सुरक्षित वातावरण दिले नाही, तसा प्रयत्नही केला नाही. हजारो वर्षांपासून चालत आलेल्या या रक्षाबंधनाकडे सम्यक् दृष्टीने पाहिलं तर रक्षाबंधन हा सण पुरुषांनी स्त्रीस सुरक्षित वातावरण न मिळू दिल्याचीच ग्वाही देतो. तिची रक्षा करावी लागते याचा अर्थ तिला मोकळे, निर्भीड, निर्धोक असे वातावरण उपलब्ध नाही, असाच होतो.
शतकानुशतके चालत आलेल्या किती तरी प्रथा आता मागे पडल्या. वर्षानुवर्षे मनावर बिंबवलेल्या संस्कारांच्या अनुषंगाने हे पचनी पडले असेलही; पण या मागील तर्कशास्त्र समजून घ्यायला हवे. चर्चा व्हायला हवी. समंजसपणे याचे संदर्भ तपासायला हवे. त्याच्या मागील मानसिकता जाणून घ्यायला हवी.
या एकूण मांडणीमागे सणाची मान्यता भंग व्हावी हा हेतू नक्कीच नाही; पण केवळ बहीण भावाचे निखळ प्रेम हेच या सणाचे अधिष्ठान असेल तर मग रक्षाबंधन नावाच्या या सणाला स्नेहबंधन अशी नवी ओळख द्यायला हवी.