बिहारचे मातब्बर नेते लालूप्रसाद यादव यांना 90 च्या दशकात गाजलेल्या चारा गैरव्यवहारप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. खेडवळ चालीने आणि बोलीने सामान्य जनमानसाला आपल्याकडे आकृष्ट करून घेण्याची कला आत्मसात केलेल्या लालूप्रसादांना बिहारमधील जाती-जमातींना कसे एकत्र आणायचे हे चांगलेच ठाऊक होते. पण त्यांनी सत्ता केवळ आपली गरिबी दूर करण्यासाठी वापरली आणि बेसुमार माया जमवली. पण याची फळे त्यांना अखेर भोगावी लागली. एका विधिनिषेधशून्य राजकारण्याला तुरुंगवास ही त्याच्या राजकारणाची तार्किक परिणतीच म्हणता येईल.
भारतीय राजकारणात लालूप्रसाद यादव नावाचे नाणे 2004 पर्यंत खणखणीत चालत होते. 2004 मध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांच्या राजद पक्षाने 24 जागा जिंकून आपला दबदबा सिद्ध केला आणि याच 24 जागांच्या बळावर डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये रेल्वेमंत्री झाले. रेल्वेमंत्री असताना त्यांनी व्यवस्थापनावर छाप पाडली आणि तोट्यात असलेल्या रेल्वेला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यामुळे त्यांना “मॅनेजमेंट गुरू’ म्हणून ओळखले जाऊ लागले. अनेक देशांनी तर त्यांना व्याख्यान देण्यासाठीदेखील बोलावले. परंतु लालूप्रसाद यादव यांच्या पांढऱ्या कुर्त्यावर 1997 पासून भ्रष्टाचाराचे डाग पडण्यास सुरुवात झाली. चारा गैरव्यवहारात आरोपपत्र दाखल करण्यात आले आणि त्यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागले. लालू यांना याप्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे.
बिहारच्या डोरंडा कोशागारातून 139.35 कोटी रुपये बेकायदा मार्गाने काढण्यात आले. 1990 ते 95 या काळात चाईबासा कोशागार, देवधर कोशागार, दुमका कोशागार आणि डोरंडा कोशागारातून पशुधन आणि पशुपालनाच्या नावावर एकूण 950 कोटी रुपये काढण्यात आले. लालू यांना चारा गैरव्यवहारप्रकरणी एकूण पाच खटल्यांत आरोपी करण्यात आले. आता पाचही खटल्यांचा निकाल आला असून या सर्व प्रकरणात ते दोषी आढळून आले आहेत.
आतापर्यंत त्यांना 27 वर्षांची शिक्षा निश्चित झाली आहे. त्यांना दोषी ठरवल्यानंतर बिहारचे राजकारण तापले आहे. त्यांचा पक्ष राजदने न्यायालयाच्या निकालानंतर लालू प्रसाद यांना अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला तर विरोधकांनी निर्णयाचे स्वागत केले आहे. न्यायालयाच्या निर्णयातून एक बाब स्पष्ट झाली आणि ती म्हणजे ते सामाजिक न्यायासाठी तुरुंगात गेले नाही, तर भ्रष्टाचाराच्या कारणावरून त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली आहे.
“जैसी करनी, वैसी भरनी’ अशी म्हण आहे. याचा अनुभव ते घेत आहेत. त्यांच्या काळात भ्रष्टाचाराने कळस गाठला होता. अजूनही त्यांच्याविरोधात आणि कुटुंबाविरोधात आयआरसीटीसी गैरव्यवहार प्रलंबित आहे. उतारवयात तुरुंगात जाणे ही बाब लालूंसाठी त्रासदायक आहे. परंतु न्यायालयाच्या निकालातून आणखी एक बाब स्पष्ट झाली आणि ती म्हणजे कायद्यासमोर कोणीही लहान-मोठे नाही. कायदा आपल्या पद्धतीनेच काम करेल.
बिहारच्या गोपालगंज येथे एका गरीब कुटुंबात जन्मलेले लालूप्रसाद यांच्या राजकारणाची सुरुवात जयप्रकाश आंदोलनातून झाली. तेव्हा ते विद्यार्थी होते. 1970 च्या दशकात आणीबाणीनंतर लोकसभा निवडणूक जिंकून ते पहिल्यांदा लोकसभेत पोचले आणि तेव्हा त्यांचे वय केवळ 29 होते. 1980 ते 1989 पर्यंत ते दोनदा विधानसभेचे सदस्य राहिले आणि विरोधी पक्ष नेतेदेखील होते. त्यांनी सामाजिक न्याय आणि सामाजिकदृष्ट्या पिछाडीवर असलेल्या गटांसाठी आवाज बुलंद केला आणि ते 1990 मध्ये बिहारचे मुख्यमंत्री झाले.
1990 च्या दशकात बिहारच्या राजकारणात ते अजिंक्य होते. मुलायमसिंगांनी 1990 मध्ये विश्व हिंदू परिषदेच्या अयोध्येतील कारसेवेला विरोध केला होता, तर लालूप्रसाद यादवांनी त्याच वेळी लालकृष्ण अडवाणींची रथयात्रा बिहारमध्ये अडवून आडवाणींना कैदेत टाकले. डाव्या पक्षांच्या आणि धर्मनिरपेक्ष विचारवंतांच्या दृष्टीने लालूप्रसाद तेव्हापासून हिरोच ठरले. 1997 पर्यंत ते सलग मुख्यमंत्री राहिले.
खरे तर लालूप्रसादांची कारकीर्द कॉंग्रेस विरोधाच्या विचारसरणीमुळे आकाराला आली. नवनिर्माण आंदोलनात सहभागी होते तेव्हापासून ते कॉंग्रेसविरोधी लढ्यातील बिनीचे शिलेदार बनले. अन्य समाजवाद्यांप्रमाणे लालूंनीही एकेकाळी गांधी घराणे आणि कॉंग्रेस यांची यथेच्छ टिंगल केली. गांधी घराणे आणि कॉंग्रेसला प्रखर विरोध हेच लालूप्रसादांचे राजकारणाचे सूत्र होते. याच लालूप्रसादांनी नव्वदीच्या दशकात कॉंग्रेसची पाठराखण सुरू केली. असे करताना त्यांना आपली विचारधारा गुंडाळून ठेवल्याबद्दल अपराधी किंवा शरमिंदेपणा कधीच आला नाही. बिहारमध्ये समाजवादी चळवळीने त्यागी आणि चारित्र्यवान कार्यकर्त्यांची मोठी फळी देशाला दिली.
बिहारवासियांची समाजवादावर प्रगाढ श्रद्धा होती. त्यामुळेच मधू लिमये, जॉर्ज फर्नांडिस यांसारखी महाराष्ट्रीय मंडळी बिहारमधून लोकसभेवर निवडून येऊ शकली. कर्पुरी ठाकूर यांच्यासारखा स्वच्छ चारित्र्याचा आणि मागासलेल्या वर्गाला विकासाच्या धारेत आणण्यासाठी आपले जीवन खर्च करणारा नेता बिहारमधलाच. लालूप्रसादांमुळे बिहारचे आणि तेथील गौरवशाली समाजवादी परंपरेचे नाव पुरते बदनाम झाले. समाजवादाचा धोषा लावणाऱ्या लालूप्रसादांनी मुख्यमंत्री झाल्यावर समाजवाद आपल्या धोतराच्या कासोट्यात गुंडाळून ठेवला. एक रांगडा राजकारणी अशी ओळख असलेल्या लालूप्रसादांमध्ये एक बनेल आणि धूर्त राजकारणी दडला आहे, हे चारा घोटाळ्यामुळेच देशाला लक्षात आले.
1997 मध्ये चारा गैरव्यवहारप्रकरणी त्यांच्यावर आरोपपत्र दाखल झाले आणि अधोगतीला सुरुवात झाली. त्यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागले. त्यांनी सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी एक नवीन फंडा शोधला आणि त्यांनी पत्नीच्या हाती सत्तेची कमान सोपवली. ते स्वत: राजदचे अध्यक्ष राहिले. या मार्गाने त्यांनी सत्तेचा रिमोट कंट्रोल आपल्याकडेच ठेवला.
लालू प्रसाद यादव यांच्या काळात बिहारला “जंगलराज’ची उपाधी देण्यात आली. बिहारची कायदा आणि सुव्यवस्था नीचांकी पातळीवर घसरली होती. खंडणी वसुली, मुलींचे अपहरण या गोष्टी नित्याच्याच झाल्या होत्या. लालू यांच्या राजवटीत गुंडांचे साम्राज्य वाढत गेले आणि त्यास सत्तेचे पूर्ण संरक्षण मिळत गेले. 2004 नंतर लालू यांचा प्रभाव ओसरत गेला. राजकारणात लालूप्रसाद यादव यांची बोलण्याची, हजरजबाबीपणाची खास शैली होती.
लोकसभा असो किंवा मुलाखत असो किंवा सभा असो, ते आपल्या शैलीने लोकांवर छाप पाडत. उत्तर भारतात त्यांची लोकप्रियता कमालीची वाढली होती. त्यांचा हजरजबाबीपणा हा विरोधकांना निष्प्रभ करणारा असायचा. ते विरोधकांना गप्प बसवण्यात माहीर असायचे. लालूप्रसाद जेव्हा संसदेत बोलत तेव्हा आरोप प्रत्यारोपाचा गदारोळ व्हायचा. त्यांच्या बोलण्याच्या अनोख्या शैलीने संसदेत हास्याचे फवारेही उडायचे. पण त्यांनी सत्ता केवळ आपली गरिबी दूर करण्यासाठी वापरली आणि बेसुमार माया जमवली.
राजकीय बळावर त्यांनी मालमत्ता मिळवण्यासाठी अनेक प्रयोग केले आणि ही बाब कोणापासूनही लपून राहिलेली नाही. लालूप्रसाद हे स्वत: अडकलेच आणि त्याचबरोबर पत्नी राबडी देवी, मुलगी मीसा भारतीदेखील आरोपांच्या फैरीत अडकल्या. आरोग्याच्या कारणावरून लालूप्रसाद जामिनावर बाहेर आले, परंतु त्यांना पुन्हा तुरुंगातच जावे लागले.
मुलगा तेजस्वी यादवदेखील राजदला वैभव मिळवून देऊ शकला नाही. राजकारणात मर्यादा शोधण्याचा जमाना आता इतिहासजमा झाला आहे. कोणत्याही काळात राजकारण हे स्वच्छ आणि चारित्र्यवान राहिलेले नाही. म्हणूनच लालूप्रसाद यादव यांना होणारी शिक्षा सर्वांसाठी धडा ठरावा.
– संगीता चौधरी