पिंपरी – सद्यस्थितीत पीएमपीएमएलच्या संचलनात बहुतांशी बस नवीन आहेत. या बसचे दरवाजे हे स्वयंचलित आहेत. गर्दीच्या वेळी चालकाला मागील बाजूच्या दरवाज्यामध्ये किती गर्दी आहे, किती प्रवासी बसमध्ये चढत आहे. याचा अंदाज येत नाही. अशा वेळी बटण दाबले की दरवाजा लागतो आणि दरवाज्यामध्ये प्रवासी अडकतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. चालकांनी वाहकाच्या सूचनेनंतर दरवाजे बंद करण्याची आवश्यकता आहे.
पीएमपी बसमधील प्रवासी संख्या वाढली असून साधारण दिवसाला दीड हजार बसेस रस्त्यावर धावतात. दिवसाला सुमारे सहा ते सात लाख प्रवाशी बसमधून प्रवास करतात. पीएमपीएमएल बस सिग्नलला किंवा चालू असताना अचानक काही प्रवाशी धावत बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात. तर परिणामी, अपघात होऊ शकतो. त्यामुळे चालकांनी दरवाजे लावूनच बस चालवावी, अशा सूचना पीएमपी प्रशासनाने दिल्या. मात्र, गर्दीच्या वेळी जेव्हा चालक दरवाजा लावतो. तेव्हा काही प्रवाशांची बॅग तर कोणाचा हात किंवा पाय त्या दरवाज्यामध्ये अडकत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे चालकांची अति घाई अपघाताला निमंत्रण देणारी ठरू शकते.
प्रवाशांकडून सिग्नलला उतरण्याचा हट्ट
सिग्नलला बस थांबली की दरवाजे उघडू नये, अशा सूचना पीएमपी प्रशासनाने वाहक आणि चालकांना दिल्या आहेत. त्यामुळे सिग्नलला बस थांबली की काही प्रवासी तेथे उतरण्याचा हट्ट करतात. चालकाकडे तशी मागणी करतात. परंतु स्टॉपला उतरा सिग्नलला उतरू नका. आम्हाला दंड होईल, तसेच उतरताना एखादे वाहन आले. तर अपघात होईल, असे चालक सांगत असतात. त्यानंतरही तरीही काही प्रवासी वेळ वाचण्यासाठी सिग्नलला उतरण्याचा हट्ट करतात. मात्र, अपघात होऊ नये, म्हणून प्रवाशांनी आणि चालक, वाहकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
काही वेळ वाचविण्याच्या नादात अपघात होऊ शकतो. त्यामुळे प्रवाशांनी देखील घाई करून सिग्नलवर उतरण्याचा हट्ट करु नये. अपघात होऊ नये, म्हणून दरवाजा लावून बस चालवावी. तसेच बसमध्ये चढताना प्रवाशांची लवकर चढणे गरजेचे आहे. त्यानंतरही प्रवाशांचे हात, पाय दरवाज्यात अडकू नये, यासाठी चालकांनी काळजी घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत. गर्दीच्या वेळी काही प्रमाणात अशा घटना घडतात. अपघात होऊ नये, तसेच दरवाजा लावताना प्रवाशांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. अशा सूचना चालक आणि वाहकांना देण्यात आल्या आहेत.
– दत्तात्रय झेंडे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल