रेल्वे अपघात शून्यावर आणण्यासाठी मंत्रालयाने “कवच’ तंत्रज्ञानाच्या रूपातून ऐतिहासिक योजना तयार केली आहे. या आधारे दोन हजार किलोमीटरचे रेल्वेचे जाळे तयार केले जाणार आहे. प्रवाशांची सुविधा आणि सुरक्षेच्या दृष्टीने कवच तंत्रज्ञान खूपच उपयुक्त ठरणार आहे. विशेष म्हणजे कवच हे स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित केलेली सुरक्षा यंत्रणा आहे.
भारतीय रेल्वेच्या इतिहासात 5 मार्च 2022 हा दिवस मैलाचा दगड ठरला. भारतात बनलेल्या “कवच’ नामक तंत्रज्ञानामुळे दोन रेल्वेची समोरासमोर टक्कर टाळली गेलीे. सुसाट वेगाने एकमेकांविरोधात धावणाऱ्या या दोन्ही रेल्वे स्वयंचलित ब्रेकच्या सिस्टिममुळे काही अंतरावर थांबल्या. या इतिहासाचे साक्षीदार स्वत: रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव बनले. कवच तंत्रज्ञानाने समोरून येणाऱ्या रेल्वेची संभाव्य टक्कर टाळण्यासाठी रेल्वेमंत्र्यांच्या रेल्वेला 380 मीटर अंतरावरच रोखले.
तेलंगणच्या सिंकदराबाद येथे दोन रेल्वेचं कवचची चाचणी घेण्यात आली. एका रेल्वेत स्वत: रेल्वेमंत्री होते तर दुसऱ्या रेल्वेत रेल्वे मंडळाचे अध्यक्ष आणि अन्य अधिकारी होते. ही चाचणी सनतननगर-शंकरपल्ली यादरम्यान करण्यात आली. कवच तंत्रज्ञानामुळे दोन रेल्वेतील टक्कर, समोरासमारची धडक वाचणार आहे. जगातील सर्वात स्वस्त रेल्वे सुरक्षा तंत्रज्ञान म्हणून कवचकडे पाहिले जात आहे. झीरो रेल्वे अपघाताचे लक्ष्य गाठण्यासाठी सुरक्षा कवचचा विकास करण्यात आला आहे. ही स्वदेशात विकसित झालेली स्वयंचलित रेल्वे सुरक्षा (एटीपी) प्रणाली आहे.
“कवच’ला एका रेल्वेला स्वत: थांबवण्यासाठी तयार करण्यात आले आहे. एखाद्यावेळी डिजिटल सिस्टीमला रेड सिग्नल किंवा अन्य बिघाड जसे की मानवी चूक दिसत असेल तर या तंत्रज्ञानाच्या मदतीने संबंधित मार्गावरून धावणारी रेल्वे आपोआप थांबते. कवच तंत्रज्ञान लागू केल्यानंतर त्याच्या वापरासाठी 50 लाख रुपये प्रति किलोमीटर खर्च येणार आहे. अन्य देशांच्या तुलनेत हा खर्च खूपच कमी आहे. जगभरात अशा तंत्रज्ञानावर सुमारे दोन कोटी रुपये खर्च येतो. परवानगी नसलेल्या मार्गावरून रेल्वे जात असेल तर त्याला धोक्याचा इशारा या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दिला जातो.
लोको पायलट हा रेल्वे रोखण्यास अपयशी ठरत असेल तर कवच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या रेल्वेचे ब्रेक आपोआपच लागतात आणि अपघात टाळला जातो. हे तंत्रज्ञान लागू करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली होती. आत्मनिर्भर अभियानातंर्गत दोन हजार किलोमीटर रेल्वे नेटवर्कला कवच तंत्रज्ञानाच्या अखत्यारित आणले जाणार आहे. आतापर्यंत दक्षिण मध्य रेल्वेने आपल्या विविध योजनांत 1098 पेक्षा अधिक किलोमीटरच्या रेल्वेमार्गावर आणि 65 इंजिनमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे.
ही योजना दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-हावडा कॉरिडॉरवर लागू करण्याची योजना आहे. या मार्गाची लांबी सुमारे 3 हजार किलोमीटर इतकी आहे. केंद्र सरकारने 2017 मध्ये एम-कवच ऍप लॉंच केले होते. यामुळे प्रवाशांना बऱ्याच प्रमाणात सुरक्षा मिळणार आहे. अर्थसंकल्पात रेल्वे मंत्रालयाला 14,03,67.13 कोटी रुपये दिले असून ते गेल्या आर्थिक वर्षापेक्षा 20,311 कोटी रुपयांनी अधिक आहे. रेल्वेच्या दाव्यानुसार या “कवच’ची यंत्रणा कार्यान्वित केल्यानंतर दोन रेल्वेतील टक्करचे प्रमाण जवळपास शून्य होईल.
– मेघना ठक्कर