जीवनात पेचप्रसंगांना सामोरं जावं लागलं नाही, अशी व्यक्ती मिळणं केवळ अशक्य. अशी व्यक्ती असलीच तर ती साधुसंतांपैकी किंवा हिमालयात एकाकी जीवन कंठणारी संन्यस्त व्यक्ती असली पाहिजे. “इकडे आड-तिकडे विहीर’ ही म्हण किंवा एका हिंदी चित्रपटातील गाणं “मैं इधर जाऊँ या उधर जाऊँ’ पेचप्रसंगच दर्शवतात.
माणसाला सर्वात जास्त छळणारा पेचप्रसंग आर्थिक कारणांचा असावा. जेव्हा पैशांची कमतरता असते तेव्हा भागवायचं कसं असा पेच असतो, तर जेव्हा तो खुळखुळत असतो तेव्हा नुकसान न होता जास्तीत जास्त कमाई होईल अशी गुंतवणूक कुठे करावी, असा पेच असतो. ज्याला व्यवसायात “रिस्क’ किंवा जोखीम असं संबोधतात ती पत्करण्याच्या क्षमतेवर पेच किती गंभीर आहे ते अवलंबून असतं. अर्थात हा रिस्क फॅक्टर फक्त आर्थिक व्यवहारातच असतो असं नाही, तर सामान्य जीवनपटामध्येही असू शकतो.
भावनिक स्तरावरचा पेचप्रसंग हा क्वचित प्रसंगी जीवनमरणाच्या सीमारेषेवर झोके घेताना आढळून येतो. “टु बी ऑर नॉट टु बी’ म्हणजे “असावं की नसावं’ किंवा स्पष्ट शब्दात सांगायचं तर “जगावं की मरावं’ असा पेचप्रसंग काही व्यक्तींच्या आयुष्यात येतो की जो शेक्सपिअरच्या नाटकातील हॅम्लेटच्या समोर ठाकला होता.
परंतु मरणाला जवळ करून पेचप्रसंगातून सुटका करून घेण्याचा मार्ग म्हणजे पळपुटेपणा आहे आणि पेचप्रसंगाला धैर्यानं सामोरं जाणं हेच योग्य आहे, असं सांगणारी व्यक्ती त्या वेळी जवळपास हवी ना? आणि जरी अशी व्यक्ती तिथं असली तरी संकटग्रस्त माणसानं ते ऐकलं पाहिजे ना? परीक्षेत अपेक्षित यश न मिळणं, प्रियकर/प्रेयसीनं जोडीदार होण्यास नकार देणं, संसाराचा गाडा हाकण्यात असमर्थ ठरणं अशी अनेक कारणं टोकाची भूमिका घेण्यासाठी कारण ठरतात. प्रेमप्रकरणात नैराश्य आलेल्या व्यक्तीची मजल कधी कधी हिंसक होण्यापर्यंतही जाते.
काही काळापूर्वी यशस्वी कॅफेची शृंखला चालवणाऱ्या एका व्यावसायिकानं धंद्यात तात्पुरती आलेली खोट सहन न होऊन नदीत उडी टाकून आत्महत्या केली होती. त्यानं थोडा संयम बाळगला असता तर मार्ग निघू शकला असता, असं तज्ज्ञांचं मत आहे. चिकट आणि असाध्य वाटणाऱ्या रोगाला कंटाळणारे पण अनेक दुर्दैवी लोक आहेत.
तिथंही चिकट रोगाला तितक्याच चिकाटीनं तोंड देणं हेच आवश्यक आहे. संयम बाळगून थंड डोक्यानं विचार केल्यास पेचप्रसंगांतून नक्कीच मार्ग निघू शकतो. मात्र आततायीपणानं कृती केल्यास कायमचं नुकसान होऊ शकतं. पेचप्रसंगातून मार्ग काढण्यापेक्षा पेचप्रसंग टाळणंच अधिक श्रेयस्कर नाही का? रिस्क घ्यावी पण ती कॅल्क्युलेटेड रिस्क असावी.
जलदगती गोलंदाजाचा सामना करताना फलंदाज अशीच कॅल्क्युलेटेड रिस्क घेताना दिसून येतात. चेंडू बॅटला स्पर्श करून गेला तरी चौकार मिळू शकतो, पण तोच जर अचानकपणे उसळला तर? मग मागे उभे असलेले क्षेत्ररक्षक झेल टिपायला तयारच असतात. लेखकांनाही पेचप्रसंगाचा सामना करावा लागतो.
नाटक/सिनेमाची संहिता किंवा कादंबरी लिहिताना अचानक पुढे काय लिहावं ते समजेनासं होतं. याला “रायटर्स ब्लॉक’ असं म्हणतात. अशा प्रसंगी काही काळ लेखनापासून दूर होऊन मुक्त व्हावं लागतं. मग एका क्षणी साक्षात्कारासारखा पुढे लिहावयाचा प्रसंग समोर दिसू लागतो.
-श्रीनिवास शारंगपाणी