– विजय शेंडगे
पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदचे कार्यवाह असलेले उद्धव कानडे हे साहित्य क्षेत्रात मैलाचा दगड ठरलेलं नाव आहे. कविता, कथा, कादंबरी, ललित, नाटक असा सर्व साहित्य प्रकारांना त्यांनी कवेत घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. अशा हरहुन्नरी साहित्यिकाच्या साहित्याचा धांडोळा कोणाला घ्यावासा वाटणार नाही.
इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी उद्धव कानडे यांच्या कवितेचा धांडोळा घेण्याचा यशस्वी प्रयत्न “समतेचा ध्वज’ या ग्रंथात केला आहे. मानवदरा, आम्ही घामाचे धनी, अस्वस्थायन आणि केशरमाती या उद्धव कानडे यांच्या चार कवितासंग्रहातील निवडक कविता “समतेचा ध्वज’ या संपादित ग्रंथात आहेत.
उद्धव कानडे यांची कविता, डॉ. संभाजी मलघे यांचं संपादन आणि विश्वास वसेकर यांची प्रस्तावना असा त्रिवेणी संगम या संपादित ग्रंथात अनुभवता येणार आहे. या ग्रंथाच्या प्रत्येक पानावरील कविता दाखले द्यावी अशीच आहे.
“रखरखीत उन्हाळा पिऊन आभाळाला ओलाव्याच्या गोष्टी सांगणारा माळ’ ही कल्पना निव्वळ आभाळच आणि माळाचं प्रतिनिधित्व करत नाही तर समाजातील सोशिक आणि शोषक वर्गाचंदेखील प्रतिनिधित्व करते.
तर त्याच कवितेतील माळावरचं हिरवं झाड दीनदुबळ्यांच्या मदतीला धावून येणाऱ्या सहृदयी व्यक्तिमत्त्वाचं प्रतिनिधित्व करते.उद्धव कानडे यांची कविता स्त्रीपुरुष प्रेमाच्या जंजाळात कधीच रमली नाही. तिने कायम माणुसकीच्या परिघावर प्रेम केले.
दीनदुबळ्यांच्या, शोषितांच्या व्यथांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. समतेच्या, बंधुतेच्या वाटेवर भटकंती करण्यात धन्यता मानली. जीवनावर भाष्य करण्यात आनंद मानला. दगडांनो, उगाच सोंग घेऊ नका या जगात दुसरे जग निर्मु नका या ओळी दगडामधल्या देवांना उद्देशून नसाव्यात तर दगडाचे सोंग घेऊन माणुसकी पायदळी तुडविणाऱ्या माणसांना उद्देशून असाव्यात असे वाटते.
“आता बंधुतेच झाड मिळवून वाढवायचं’ या ओळीही अशाच माणसातल्या माणुसकीला साद घालताना दिसतात. या ग्रंथातील सगळ्याच कविता माणसांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळेच हा ग्रंथ समाजासाठी दिशादर्शक ठरावा असाच आहे.
उद्धव कानडे यांची कविता ही वेदनेचा आक्रोश आहे. जे सोसले त्याचा हुंकार आहे; परंतु सोसण्याचे भांडवल करण्याचा अभिनिवेश त्यांच्या कवितेत नाही.त्यांची कविता दुःखातून सुखाकडे जाण्याची वाट निर्माण करण्याचा प्रयत्न करते.
साहित्यकृतीचा विषय, तिचा बंध हे कोणत्याही साहित्यकृतीच्या मूल्यमापनाचे निष्कर्ष असू नयेत. साहित्यकृतीचे बंध, विषय बाजूला ठेवून कोणत्याही साहित्यकृतीचे ग्रंथाचे मूल्यमापन व्हायला हवे. आशयाच्या अंगाने विचार केला तर “समतेचा ध्वज’ हा उद्धव कानडे यांच्या कवितेवर आधारित ग्रंथ परिपूर्ण आहे असेच म्हणावे लागेल.