बरेचदा काय होते की, आपण अशा अनेक अनपेक्षित गोष्टी करून जातो ज्या कधीच केलेल्या नसतात आणि अचानक कराव्या लागल्यावर मिळणारा अनुभवसुद्धा तेवढाच भन्नाट असतो. आयुष्याचे गणित जर सहज सुटणारे असते, तर खरंच आपण अनेक अनुभवांना मुकलो असतो आणि कोणतेच कसलेच गुंते निर्माण झाले नसते. यात आपुलकी, आस्था, माया, स्नेह यांचे झरे वाहतात म्हणून हे निरस, कोरडे आयुष्य ओलाव्याने ओथंबू शकते.
दिवसेंदिवस कोरडी होत चाललेली मने या अशा प्रकारच्या मायेच्या ओलाव्यासाठी आजही धडपडतात त्यामागे हीच ममतेची ओढ असावी. उन्हावरचे सावलीचे ठसे जसे ऊन जपत राहते तसेच असतात हे मायेचे ऋतू. पानगळ असो व वसंत प्रत्येक ऋतूला बहर देतात. सावलीची फुले माळल्यावर कवडसेसुद्धा देखणे दिसतातच की, तसेच असते या मायेचे. समोरची व्यक्ती जर अशी मायेला उसासली असेल तर मग त्याला मायाही तशीच भरभरून मिळते.
नुकताच पाऊस सुरू झाला आणि मुंग्यांपासून चिमण्यांपर्यंत सगळ्यांची पावसाळ्याची बेगमी करण्याची धावपळ सुरू झाली. अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे नवे घर सजवण्याची गडबड. त्यात सुद्धा प्रत्येकाची तयारी वेगळी. कोणी झाडाची लांब पानेच पाहून ठेवेल तर कोणी फांद्यांचे त्रिकोण. कोकीळ किंवा बुलबुल गुलमोहराचे रंगतदार शहर जवळ करेल आणि धोबी, शिंपी, हळद्या, ठिपकेवाली मुनिया, आपली चिऊताई असे सारे आपापल्या जागा आरक्षित करतील.
आपणही पावसाळ्यापूर्वी घराची डागडुजी, लिकेज काढणे असे सगळे करतोच की! या सगळ्या घाईमध्ये पारवे आणि कावळे मात्र जरा चुझी असतात बरं का! कावळे मे महिन्याच्या मध्यालाच त्यांचे वन बीएचके बांधून पावसाची वाट बघत राहतात. पारवे मात्र वळचणी शोधतात. तर झाले असे की, माझ्या रायटींग टेबल जवळच्या खिडकीतून गेला पूर्ण आठवडा नाजुक चिवचिवाट ऐकू येत होता.
मी सहज एक दिवस डोकावून पहिले तर दोन चिटुकले पाहुणे खिडकीच्या ग्रीलवर बसून काहीतरी महत्त्वाचा विषय डिसकस करत होते. मला शंका आलीच आणि मग मीही त्यांच्यावर माझे कॅमेरे लावले. दोनच दिवसांनी दोघेही येऊन प्लॉटची पाहणी करून जाऊ लागले. इकडे माझी उत्सुकता हळूहळू हायपर व्हायला लागली.
तुळशीच्या दोन कुंड्यांमधील जागा त्यांना आवडली. मग रीतसर भूमिपूजन करून बांधकामाचे सारे मटेरियल येऊन पडू लागले. काय नव्हतं त्यात? आढीसाठी आणलेलं पाचट, पारव्यांची पिसे, कागद, कडुलिंबाच्या काड्या, मऊ पालवीची पाने सारंच होतं.
पारव्यांच्या बाळंतपणाचा आधीचा अनुभव गाठीशी असल्याने मला पुढचे सारे सोहळे लगेच समजले आणि या चिटुकल्यांसाठी मऊ कापूस ठेवायचा मोहही मला झाला. पण मी तो आवरला. आधीच आपण निसर्गात करतोय ती ढवळाढवळ काय कमी आहे? कशाला या बिचाऱ्यांच्या चिमण्या संसारात नाक खुपसायचे? या विचाराने मी वाट बघायचे ठरवले.
हळूहळू घरटे तयार होऊ लागले. मालकीणबाई ग्रीलवर बसून जातीने बांधकामावर लक्ष ठेवत होत्या. कुठली काडी कुठे लावायची किंवा कोणती पिसे जास्त मऊ आहेत हे चारदा तपासून पाहत होत्या. मी आपली येताजाता हळूच डोकावत होते. मला माझ्या तुळशीची काळजी लागली होती. आता या बाईसाहेबांचे बाळंतपण होईपर्यंत मला तुळशीला लांबून आणि जपून पाणी घालावे लागणार होते.
मला उगाचच हळवे झाल्यासारखे वाटत होते आणि मग आईची आठवण आली. ती गेली आणि जणू माहेरपणच संपले. पण या नव्या लेकीचे माहेरपण करायचे मी ठरवले.
सारखे खिडकीत वाकून बघायचे नाही. त्या चिटुकल्यांना त्रास देणाऱ्या पारव्यांना खिडकीत येऊ द्यायचे नाही. अशा एक ना दोन हजार सूचना मी माझ्या मुलांना आणि नवऱ्यालाही दिल्या असतील.
मग एक दिवस लेकीने खिडकीत चढून पहिले तर दोन नवे पाहुणे येऊ घातलेले दिसले. आता माझी खरी कसोटी लागणार आहे. ती स्वत:ला सतत त्यांच्यापासून लांब ठेवण्यात. आता पावसाळा सुरू झाला आहे. त्या चिटुकल्यांची पिलुकली छोटी. त्यांना पाऊस लागेल, ती भिजतील, त्यांना थंडी लागेल, त्यांना त्यांचा खाऊ कसा मिळेल? एक न दोन हजार शंका.
जणू ती माझ्यासाठी जागतिक समस्याच झालीय. मी ठरवले आहे, तुळशीशेजारी एक वाटी तांदळासाठी आणि एक वाटी पाण्यासाठी ठेवायची. तुळशीच्या कडेला प्लॅस्टिकची पिशवी लावून शाकारणी करायची. कित्ती आणि काय काय कामे आहेत आता.
जशी लेकच आलीय माहेरपणाला… रोजची माझी सकाळ त्यांच्या चिवचिवीने होतेय आणि राहून राहून इंदिराबाईंची कविता आठवतेय आणि डोळ्यात पाणी आणतेय. आली माहेरपणाला!
मानसी चिटणीस