मधुरा आणि स्नेहल या माझ्या दोन लहान मैत्रिणींनी खूपच आग्रह धरला की, मी मुक्तांगणच्या वाढदिवसाला आलेच पाहिजे. म्हणून शेवटी मी नागपूरहून निघाले. विमान आकाशातून जात होते; पण मन मात्र जमिनीवर होते. ढगांच्या प्रदेशात फिरताना त्यात मला विविध आकार भासत होते. तसे आकाश बघताना नेहमीच जाणवतात. माझी मुंबईतील लेक, तिचं त्या अकरा मजली इमारतीतील सातव्या माळ्यावरच घर. माझी दोन्ही गोजिरी नातवंडे आणि तिच्यामुळे मला मिळालेली ही संधी.
त्याचं असं झाले की, फेब्रुवारी 20 मध्ये अनन्याच्या सासूबाई, म्हणजे विहीणबाई बाथरूममध्ये पडल्या. सासरे आधी आजारी होतेच. पण त्या त्यांचे सगळं करत असत. तीन महिने तरी झोपून राहायचे होते. त्यात त्यांची लेक अमेरिकेत. यामधे भर म्हणून माझ्या जावयांची तब्येत अचानक बिघडली आणि पोटाचे ऑपरेशन करायला लागले. या परिस्थितीत अनन्या एकटी किती तोंड देणार. त्यात मुलांच्या परीक्षा जवळ आलेल्या. मग तिचा फोन आला आणि माझी रवानगी मुंबईला झाली. आशुतोष सोडायला आला.
घरी सुकन्या असल्याने मला तशी काळजी नव्हती. हे तिकडेच थांबले. मला सोडून दोन-तीन दिवस हॉस्पिटलमध्ये मदत करून आशुतोषही परतला. मग आम्ही दोघींनी कंबर कसली. घरात मी बघत होते. बाकी दवाखान्यात जाणे वगैरे अनन्या. यात महिना दीड महिना कसा गेला ते कळलेच नाही.
अचानक तो आला…आणि लॉकडाऊन सुरू झाले आणि मी मुंबईत अडकले. काही अंदाज येत नव्हता. दिवस नुसते जात होते. मला येऊन आता सहा महिने होत आले होते. पण प्रवास करता येत नव्हता. सहा-सात महिने झाल्यावर मीही कंटाळून गेले. घर दिसत होते. मुलांच्या शाळा नव्हत्या म्हणून अभ्यास घेत होते. परीक्षाही झालीच नाही.
कंटाळून एके दिवशी मी खाली गेले. तेव्हा यांच्या सोसायटीत खाली छान जागा होती, छोटा हॉल होता. पण, सारे बंद. मी तिथेच थोड्या फेऱ्या मारल्या. रोज जाऊन थोडी ओळख झाली. माझ्या वयाच्या एक दोघी येत होत्या. पलीकडे दोघी-तिघी मध्यमवयीन तर एक दोन तरुण मुली. मी ओळख करून घेतली. घरून काम करून दमलेल्या थोडा वेळ येत. तर तरुण मुली बोअर झाले म्हणून.
आमच्यापैकी लिमये काकू खूप सुगरण होत्या. कुलकर्णी वहिनी भरतकाम विणकाम यात प्रविण, तर विभावरीचं वाचन दांडगं आणि सांगण्याची हातोटीही चांगली, उल्का खूप फिरलेली त्यामुळे माहितीचा खजिनाच होता तिच्याकडे. आमची छोटी मैत्रीण टेक्नोसॅव्ही तर स्नेहल व्यायाम करणारी. प्रत्येकाच काहीतरी वैशिष्ट्य होते. मग ठरवलं त्यांचीच देवाणघेवाण करायची. मग आठवड्याचे वेळापत्रकच तयार केलं.
रोज नवीन काही शिकत राहिलो, ऐकत राहिलो. थोडी बंधनंही कमी होऊ लागल्यावर मुलांना बोलावले. घराच्या बाहेर पडण्याच्या कल्पनेनेच हरखली बिचारी. हॉलमध्ये थोड्यांसाठी खेळ, काहींसाठी अभ्यास, काही गप्पा गोष्टी, चित्र काढणे, असे गटच केले. सोयीच्या वेळा ठरविल्या. सगळे नियम काटेकोरपणे पाळत राहिलो आणि एक छान उपक्रम सोसायटीतच सुरू झाला. बाहेर कुठेही न जाता शिकण्याची संधी मिळाली. सगळे खुशीने करत होते.
पुढे पुढे त्यात खूपसे बदल होत तिथं एक मुक्तांगणच सुरू झाले. पण नवीन नवीन कल्पना सुरू करत या मुलामुलींनी मुक्तांगण चालूच ठेवले. आमची बिना खडू फळ्याची शाळा रोज भरते. सगळ्या इयत्ता एकत्रितपणे भरतात. मोठी मुले लहान मुलांना मदत करतात. एखादी कॉलेजमध्ये जाणारी ताई किंवा काका काकू फक्त लक्ष ठेवतात. यामध्ये आम्ही मोठेही खूप नवीन काही शिकलो. स्मार्ट फोन, लॅपटॉप,सजहजतेने लहान, तरुण लोकांकडून शिकलो.
नवीन पदार्थ, भरतकाम, वाचन केले. मुले तर अभ्यास आणि खेळ मजेत करीत असत. आजी आजोबामधून येऊन गोष्टी सांगत, काही छान अनुभवाचे वर्णन करीत.काका मंडळी कधी अभ्यासात मदत करत तर कधी क्रिकेट चालू असे. मी नागपूरला गेल्यानंतर या उपक्रमाला दोन वर्षे झाली म्हणून मोठा कार्यक्रम ठरवला होता. मला आग्रहाने बोलावले होते. मी खरंतर पाहुणी होते; पण सहज बोलता बोलता कल्पना मनात आली आणि सर्वांना एकत्र आणून राबवता आली याचा आनंद मिळाला. अडचणी येतात पण त्यातून मार्ग काढता येतो हे नक्की.
विमान आणि माझे मनातील विचार दोन्ही थांबले. मी बाहेर आले तर सोसायटीतील किती तरी जण माझ्या स्वागतासाठी आले होते. यापेक्षा आणखी काय हवे असते हो!
– आरती मोने