उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसकडून 40 टक्के महिला उमेदवार रिंगणात उतरविले जाणार आहेत. परंतु महिला मतपेढी तयार करण्याच्या या व्यूहनीतीमुळे नेमके काय होईल? प्रियंका गांधींनी नुकतीच अशी घोषणा केली की, पक्षाच्या पहिल्या 100 उमेदवारांच्या यादीत 60 महिला आहेत. परंतु या निर्णयाचा कॉंग्रेसला फायदा होईल का?
उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय कॉंग्रेस पक्षाने घेतला आहे आणि पक्षाकडून सर्वच्या सर्व 403 विधानसभा मतदारसंघांत उमेदवार दिले जाणार आहेत. प्रियंका गांधी यांनी नुकतेच लखनौमध्ये सांगितले की, कॉंग्रेसकडून 40 टक्के महिला उमेदवार रिंगणात उतरविले जातील. परंतु महिला मतपेढी तयार करण्याच्या या व्यूहनीतीमुळे नेमके काय होईल? सीतापूरमध्ये कॉंग्रेस नेत्या शमीना शफीक या रहीमाबाद गावातील एका बैठकीत उपस्थित असलेल्या महिलांना उद्देशून म्हणतात, “लडकी हूँ…’ त्यावर उत्तर येते “लड सकती हूँ…’ कॉंग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकांपूर्वीच महिला सशक्तीकरण अभियान धूमधडाक्यात सुरू केले आहे.
शमीना शफीक विधानसभा निवडणुकीत गावोगावी जाऊन पक्षाच्या महिला सशक्तीकरण मोहिमेला बळ देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये महिला सशक्तीकरणासाठी ज्या घोषणा केल्या आहेत, ते 15 पानी आहेत.
पक्षाकडून आगामी निवडणुकीत 40 टक्के महिलांना उमेदवारी दिली जाईल, याची चर्चा आधीपासूनच राज्यात सुरू होती. प्रियंका गांधींच्या घोषणेनुसार, पक्षाच्या पहिल्या 100 उमेदवारांच्या यादीत 60 महिला आहेत. पक्षाची उमेदवारी मिळवू इच्छिणाऱ्या शेकडो महिलांमध्ये शमीना शफीक यांचाही समावेश आहे. या निर्णयामुळे पक्षात आणि पक्षाबाहेरील पुरुषांमध्ये खळबळ उडाली आहे, असे त्या म्हणतात.
कॉंग्रेससाठी चिंतेचा विषय असा की, राजकीय निरीक्षकांनी कॉंग्रेसला स्पर्धेत गृहित धरलेलेच नाही आणि भाजपचा थेट मुकाबला समाजवादी पक्षाशी होईल, असे म्हटले आहे. उत्तर प्रदेशात कॉंग्रेस गेली 32 वर्षे सत्तेबाहेर आहे आणि राज्यात पक्षाला जनाधार उरलेला नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. एका जाणकाराने असे सांगितले की, मुस्लीम आणि यादव ही समाजवादी पक्षाची मतपेढी मानली जाते तर दलित ही बहुजन समाज पक्षाची मतपेढी मानली जाते. परंतु कॉंग्रेसला स्वतःची मतपेढीच उरलेली नाही. म्हणूनच कॉंग्रेस महिलांमध्ये जनाधार शोधत असावी का? हा निरीक्षकांना पडलेला प्रश्न आहे.एवढे करूनही गेल्या वेळेपेक्षा फार चांगली प्रगती कॉंग्रेस करू शकेल, असे निरीक्षकांना वाटत नाही.
2017 च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला केवळ 7 जागा जिंकता आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने उचललेले पाऊल योग्य आहे का? रतन मणी या राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, पक्षाचे म्हणणे लोकांपर्यंत पोहोचवू शकेल, असा नेहरू-गांधी कुटुंबीयांव्यतिरिक्त कोणताही चेहरा कॉंग्रेसकडे नाही.
संपूर्ण राज्यभरात प्रचारासाठी फिरू शकेल आणि सर्व ठिकाणच्या मतदारांवर प्रभाव पाडू शकेल, मोठी गर्दी जमवू शकेल, असा सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्याव्यतिरिक्त कोणताही चेहरा कॉंग्रेसकडे नाही. परंतु कॉंग्रेस एकीकडे महिला सशक्तीकरणाचा नारा देत असताना आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना आरक्षण देण्याचा विचार व्यक्त करीत असताना दुसरीकडे अनेक महिला कॉंग्रेसला रामराम ठोकत आहेत.
ऑगस्ट महिन्यात कॉंग्रेसच्या महिला अध्यक्ष सुष्मिता देव पक्ष सोडून तृणमूल कॉंग्रेसमध्ये गेल्या आणि रायबरेली सदर मतदारसंघाच्या आमदार आदिती सिंह या गेल्या महिन्यात भाजपमध्ये सामील झाल्या. ज्या मतदारसंघाच्या खासदार सोनिया गांधी आहेत, अशा मतदारसंघातील त्या आमदार आहेत. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेचा मुकाबला करून जे सात आमदार निवडून आले, त्यापैकी आदिती सिंह या एक होत.
महिलांना मोठ्या संख्येने उमेदवारी देणे हे ऐतिहासिक पाऊल असल्याचे कॉंग्रेसचे नेते मानत असले तरी राजकीय विश्लेषकांना हे फार मोठे क्रांतिकारक पाऊल वाटत नाही. कॉंग्रेसमधील महिलांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत; परंतु अधिक जागा जिंकण्याची शक्ती कदाचित पक्षात राहिलेली नाही. या निर्णयाचा विधानसभा निवडणुकीत फारसा फायदा झाला नाही तरी सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीत निश्चित लाभ होईल, असाही एक मतप्रवाह पक्षात दिसून येत आहे.
– जगदीश काळे