मुंबई – भारतीय संघाच्या कर्णधारपदी रोहित शर्मा याची नियुक्ती झाल्यावर सातत्याने यश मिळत आहे. मात्र, नेतृत्वात हीट आणि वैयक्तिक कामगिरीत मात्र, अपयशी हेच माजी कर्णधार विराट कोहलीचेच चित्र रोहितसाठीही दिसत आहे. नेतृत्वात झालेला बदल संघासाठी लाभदायक ठरत असताना या दोन फलंदाजांच्या कामगिरीवर मात्र, प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कोहलीच्या जागी रोहितकडे संघाची धुरा सोपवली गेल्यावर संघाच्या कामगिरीत बदल झाला मात्र, त्याच नेतृत्वाचे दडपण कोहलीप्रमाणे आता रोहितवरही जाणवत आहे.
रोहितने श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तीन डावात मिळून केवळ 90 धावा केल्या. या उलट रवींद्र जडेजाने 201, श्रेयस अय्यरने 186, रिषभ पंतने 185 व हनुमा विहारीने 124 धावा केल्या. यांच्यासह तळात फलंदाजी करत असेलल्या रविचंद्रन अश्विनने 87 धावा केल्या आहेत. याच मालिकेत माजी कर्णधार कोहलीलाही अवघ्या 81 धावा करता आल्या आहेत.
शतक कधी..?
कोहलीने 2019 साली 22 नोव्हेंबरला कोलकाताच्या इडन गार्डन्स मैदानात प्रकाशझोतात झालेल्या कसोटी सामन्यात बांगलादेश विरुद्ध 136 धावांची खेळी केली होती. त्यानंतर कोहलीला शतकी खेळी करता आलेली नाही. रोहितने गेल्या वर्षी 2 सप्टेंबरला ओव्हल मैदानावर इंग्लंड विरुद्ध 127 धावांची खेळी केली होती. त्यानंतर त्यालाही शतकी खेळी करता आलेली नाही.
यंदाच्या वर्षातील कोहली आणि रोहितच्या फलंदाजीतील कामगिरीचा विचार केला तर रोहितने क्रिकेटच्या तिनही प्रकारात मिळून 11 सामने खेळले आहेत. यातील 12 डावात त्याने 23.66 च्या सरासरीने केवळ 284 धावा केल्या आहेत. 60 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. यावर्षी आतापर्यंत झालेल्या सामन्यात त्याने एकमेव अर्धशतक फटकावले आहे. कोहलीनेही रोहित एवढेच सामने खेळले आहेत. कोहलीने रोहितपेक्षा एक डाव जास्त खेळला असून 11 सामन्यातील 13 डावात त्याने 30.76 च्या सरासरीने 400 धावा केल्या आहेत. त्याने चार अर्धशतके नोंदवली असून 79 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.