लंडन – नियमित कर्णधार रोहित शर्मा याची रविवारी करण्यात आलेली करोना चाचणी निगेटिव्ह आली असल्याने भारतीय संघाला दिलासा मिळाला आहे. आता इंग्लंडविरुद्ध येत्या गुरुवारपासून सुरू होत असलेल्या टी-20 सामन्यांच्या मालिकेतही तो खेळणार असल्याचे सांगितले गेले आहे.
इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यापूर्वी रोहितची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती व त्याला लगेचच विलगीकरणात पाठवले गेले होते. त्याला याचमुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत खेळता आले नाही. मात्र, आता त्याची चाचणी निगेटिव्ह आली असून, त्याचा विलगीकरण कालावधीही संपला आहे. रोहित खेळू शकणार नसल्याने कसोटी सामन्यासाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्याकडे नेतृत्व सोपवण्यात आले होते. बीसीसीआयने नुकतीच टी-20 आणि एकदिवसीय संघांची घोषणा केली होती व त्यात आता रोहितही खेळणार असल्याने संघाला दिलासा मिळाला आहे.
लेस्टरशायरविरुद्धच्या सराव सामन्याच्या पहिल्या डावात रोहित फलंदाजीला आला होता. मात्र, त्यानंतर करण्यात आलेल्या करोना चाचणीत तो पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले व त्याला या सामन्यातून माघार घ्यावी लागली होती. रोहित फिट व निगेटिव्ह ठरल्यामुळे केवळ इंग्लंडविरुद्धच नव्हे तर त्यानंतर वेस्ट इंडीजविरुद्ध होत असलेल्या मालिकेतही तो खेळेल, असे बीसीसीआयने सांगितले आहे.
खेळाडूंची सातत्याने चाचणी होणार
रोहित शर्मा, विराट कोहली व रवीचंद्रन अश्विन यांच्या अनुभवावरून आता बीसीसीआयने संघातील खेळाडूंसह सपोर्ट स्टाफ सदस्यांचीही सातत्याने करोना चाचणी करण्याचे निश्चित केले आहे. कसोटी सामना संपल्यावर मर्यादित षटकांच्या सामन्यांच्या मालिकेत कोणत्याही खेळाडूबाबत दुर्लक्ष होणार नाही, असेही बीसीसीआयने म्हटले आहे.