मुंबई : सध्या राज्यातील कांद्याच्या दरात घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांना कावडीमोल भावात कांदा विकावा लागत आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. याच सर्व परिस्थितीला कंटाळून नाशिकमधील नैताळे (ता. निफाड) येथील कांदा उत्पादक शेतकऱ्याने आपल्या शेतातील कांद्यात ट्रॅक्टर फिरवून जनावरे सोडली. ट्रॅक्टर फिरवतानाचा व्हिडियो सोशल मीडियावरमोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर आता या शेतकऱ्याची कर्जतचे जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भेट घेऊन चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
नाशिक जिल्ह्यात कसमादे परिसरात सर्वात जास्त कांदा उत्पादन घेतले जाते. मात्र, मागील 8 वर्षांपासून केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे उत्पादकांना खर्च वजा करुन नफा मिळत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नाशिकमधील शेतकऱ्यांची भेट घेतली. याविषयी त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी ,”निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांना मातीमोल भावात कांदा विकावा लागल्याने शेतकरी अडचणीत आलाय. त्यामुळं नाशिकमध्ये नैताळे (ता. निफाड) येथील कांदा उत्पादक शेतकऱ्याने तर आपल्या शेतातील कांद्यात ट्रॅक्टर फिरवला आणि जनावरं सोडून दिली. या शेतकऱ्याची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. कृष्णा डोंगरे हे शेतकरी तर कांद्याचा अग्निडाग हे प्रतिकात्मक आंदोलन करणार आहेत. त्यांनीही आपली व्यथा मांडली. द्राक्ष व कापसाचीही हीच अवस्था आहे. एक पीक गेलं तर शेतकऱ्याचं किती नुकसान होतं, याची कल्पना सरकारला नाही. पण त्यांनी शेतकऱ्याचं दुःख समजून घेऊन त्वरित निर्यात बंदी उठवावी,” अशी मागणी केली आहे.
दरम्यान, कांद्याचे दर कोसळल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. काही शेतकरी आपल्या शेतातील कांद्याचे पीकच काढून टाकत आहेत. कारण कांद्याला मिळणाऱ्या दरात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघणं शक्य होत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांना फटका बसत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नागापुर येथील शेतकरी सुभाष निंबोरे यांनी देखील एक एकर कांद्यावर रोटाव्हेटर फिरवला आहे. तसेच जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पिंपरने येथील शेतकरी धनंजय थोरात यांनी आपल्या चार एकर क्षेत्रात लागवड केलेल्या कांदा पिकावर ट्रॅक्टर फिरवल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
धनंजय थोरात यांनी या कांदा पिकासाठी आतापर्यंत जवळपास दोन लाख रुपये खर्च केला होता. मात्र, कांदा काढणीला आला असतानाच अचानक कांद्याचे भाव कोसळले. खर्चही निघणार नसल्याने हवालदिल झालेल्या थोरात यांनी आपल्या चार एकर क्षेत्रात काढणीला आलेल्या कांदा पिकावर ट्रॅक्टर फिरवला आहे. तसेच कोणीही या, मोफत कांदा उपटून घेऊन जा आणि रान मोकळे करून द्या अशी म्हणण्याची नामुष्की या शेतकऱ्यावर ओढवली आहे.