पाटणा – बिहार निवडणुकासाठी राष्ट्रीय जनता दलाचा निवडणूक जाहीरनामा आज प्रकाशित करण्यात आला.त्यात युवकांसाठीच्या कार्यक्रमांवर विशेष भर देण्यात आला असून राज्यातील युवकांना दहा लाख सरकारी नोकऱ्यांचे आश्वासन देण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षानेही 19 लाख लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले आहे त्यावर टीका करताना ते म्हणाले की भाजपचा रोजगार म्हणजे भजी तळणे आणि गटरातून गॅस काढून चहा करणे असले व्यवसाय असतात.
रोजगार आणि सरकारी नोकऱ्या यांच्यात फरक आहे. आम्ही बिहारी युवकांना पाच वर्षात दहा लाख सरकारी नोकऱ्या देणार आहोत असे या पक्षाचे नेते तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे. आमचे सरकार सत्तेवर आल्यास मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत याविषयी निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले. भाजप सारखे 50लाख नोकऱ्यांचे खोटे आश्वासनही आम्ही देऊ शकलो असतो पण राज्य सरकारकडून जे करता येणे शक्य आहे तेवढेच आश्वासन आम्ही देत आहोत असे त्यांनी म्हटले आहे.
नितीशकुमार यांना बिहार आता सांभाळता येईनासा झाला आहे, ते आता थकले आहेत अशी टिपण्णीही त्यांनी यावेळी केली. उपमुख्यमंत्री व भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की बिहारच्या लक्षावधी स्थलांतरित मजुरांची जेव्हा पायपीट सुरू होती त्यावेळी त्यांच्या मदतीसाठी सुशीलकुमार मोदी घराच्या बाहेरच पडले नव्हते.