भारतात मुंबईतील केईएम रुग्णालयात 1968 मध्ये पहिल्यांदा हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. ती यशस्वी ठरली नाही.
दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये 3 ऑगस्ट 1994 रोजी करण्यात आलेले हृदय प्रत्यारोपण यशस्वी ठरले. डॉ. पी. वेणुगोपाल यांच्या नेतृत्वाखालील 20 डॉक्टरांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया केली.
हृदय प्रत्यारोपण करण्यात आलेल्या बहुतेक व्यक्ती नंतर सर्वसाधारणणे चांगले आयुष्य जगतात.
अनेक कामे ते पुन्हा नव्याने करू शकतात. व्यायाम, खेळ, कष्टाची कामे करू शकतात. अर्थात सातत्याने कष्टाचे काम असेल तर त्याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते.
हृदयप्रत्यारोपणानंतरच्या काळात अनेक स्त्रियांना गर्भधारणा होऊन त्यांनी अपत्याला जन्म दिल्याच्या घटना आहेत. मात्र अशा घटनांमध्ये डॉक्टर त्या स्त्रीच्या गर्भारपणावर बारकाईने लक्ष ठेवून होते.
हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर एक वर्ष रुग्ण जगण्याचा दर जगभरात 85 टक्के आहे आणि पाच वर्षे किंवा त्याहून अधिक जगण्याचा दर 69 टक्के एवढा आहे.
हृदय प्रत्यारोपणातील जोखीम
प्रत्यारोपण केलेला अवयव शरीराने नाकारू नये यासाठी दिल्या जाणाऱ्या औषधांमुळे आरोग्यविषयी गुंतागुंत किंवा मूत्रपिंडावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते.
दात्याने दिलेले हृदय शरीराकडून नाकारले जाण्याची काही प्रमाणात शक्यता असते. ही एक मोठी जोखीम असते.सुमारे दहा टक्के रुग्णांमध्ये प्रत्यारोपणानंतर हृदय शरीराकडून नाकारले जाण्याची लक्षणे दिसतात.
हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतरच्या पहिल्याच वर्षात ही लक्षणे दिसतात.
हृदयाशी संबंधित पेशींची बायोप्सी करून त्यावरून हृदय शरीराने स्वीकारले आहे किंवा कसे याबाबतच्या लक्षणांची माहिती घेतली जाते.
प्रत्यारोपण केलेला अवयव शरीराने नाकारू नये यासाठी दिल्या जाणाऱ्या औषधांमुळे विषाणूंचा प्रतिकार करण्याची शक्ती कमी होते.