जाधववाडी – वाढत्या उन्हात उसाच्या रस, ताक, लस्सी कैरी पन्हे दुकाने जागोजागी थाटली आहेत. काही जण दुकान टाकून, काही जण हातगाडीवर तर काहीजण जागा मिळेल तिथे महामार्गावर, अंतर्गत रस्त्यांच्या कडेला आपले रसवंतीगृह, ताक, लस्सीवर आपली उपजीविका चालवत विक्री करत आहेत. तरी आरोग्य विभागाचे याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
बहुतेक ठिकाणी, काही दुकानदार प्लॅस्टिकचे ग्लास वापर व टाका या तत्वावर वापर करीत आहेत. तर काहीजण काचेचे ग्लास वापरीत आहेत. ग्राहकाने ग्लास वापरल्यानंतर अगदी कमी वेळेत कसेबसे ग्लास धुवून पुन्हा दुसऱ्या ग्राहकांसाठी वापरतात. यामध्ये ग्लासचा संपर्क व्यक्तीच्या थेट लाळेशी येत असून, एखादा बाधित रुग्ण संपर्कात आल्यास करोनाच्या संसर्गाचा प्रसार अधिक धोकदायक ठरू शकतो, असेही दैनिक प्रभात “ऑन द स्पॉट’ पाहणीत दिसून आले.
सर्व काही लॉकडाऊनमधून वगळण्यात आल्याने सर्व पुन्हा पूर्वीप्रमाणे सुरू झाले आहे. परिणामी नागरिकही मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत. वाढत्या उन्हात तोंडावरील मास्कही अनेकजण नाका तोंडाऐवजी हनुवटीवर वापरतात. पोलीस दिसताच मास्क घाईघाईने नाका तोंडावर घेतात. मास्क नसल्याने अनेकांनी दंडही भरला असून, मास्क आपण स्वतःच्या सुरक्षेसाठीच घालत आहोत. याचे गांभीर्य नागरिकात अद्याप नाहीच.
अनेक चहाच्या टपऱ्यांवर कागदी कप वापरित असल्याने धोका कमी आहे; परंतु आजही काही हॉटेल्समध्ये काचेचे व चिनी मातीचे कप ग्राहकांना दिले जात आहेत. त्यामुळे धोका आजही कायम आहे.सुपर स्प्रेडर करोनच्या नव्या स्ट्रेनमुळे या छुप्या पद्धतीने प्रसार अधिक प्रमाणात होऊ शकतो. पिंपरी-चिंचवड शहरात करोनाला आळा घालणे आव्हान आरोग्य विभागापुढे ठाकले आहे.