मुंढवा – कोरेगाव पार्क येथील पोलीस चौकाजवळील कचरा रॅम्प केंद्राच्या दगडी भिंतीला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. सुमारे 10 फूट उंच व सुमारे 300 फूट लांबीच्या भिंतीला तडे गेल्याने, ती कधीही रस्त्यावर कोसळून मोठा अपघात होण्याचा धोका आहे. क्षेत्रिय कार्यालयाचे या भिंतीच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष आहे.
कोरेगाव पार्क येथील रस्त्याच्या बाजुला असलेली भलीमोठी भिंती झुकलेली आहे. या कचरा केंद्रात कामगार काम करतात तसेच भिंतींलगत दुकाने, पोलीस चौकी व नॉर्थ मुख्य रस्ता आहे. या रॅम्पच्या भिंतीला जागोजागी मोठे-मोठे तडे गेले आहेत. ही भिंत पडून मोठा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे. तत्पूर्वी पालिकेने या भिंतीची दुरूस्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रवी कवडे यांनी केली आहे.
नागरिक म्हणतात…
अभिजित वाघचौरे : सीमाभिंतीला तडे गेल्यामुळे त्यातील दगड सैल झाले आहेत. त्यामुळे ही भिंत कधीही कोसळून नागरिक गंभीर जखमी होऊ शकतात. दुर्दैवी घटना टाळण्यासाठी भिंतीची लवकर दुरुस्ती करणे आवश्यक आहे.
तुषार जाधव : कचरा रॅंपलगतच्या सीमाभिंतीजवळ नॉर्थ मुख्य रस्त्यावर सतत वाहतूक असते. दुर्घटना घडल्यावर पालिकेचे अधिकारी येथे येऊन पाहणी करणार का? दुर्घटना घडण्यापूर्वी पालिकेने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
“सिमा भिंतीला तडे गेल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, याबाबतची दुरूस्तीचा विषय हा घनकचरा विभागाचा आहे, त्यांनी हे काम केले पाहिजे. याबाबत मी त्यांना तातीडने कळवितो.” -अशोक झुळूक, सहआयुक्त, ढोले पाटील क्षेत्रिय कार्यालय