पुणे – महापालिकेकडून लष्कर ते कोरेगाव पार्कला जोडणार्या साधू वासवाणी पुलाचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी २६ फेब्रुवारीपासून कोरेगाव पार्ककडून या पुलाकडे जाणारा रस्ता बंद केला जाणार असल्याने शनिवारपासून या भागातील वाहतूक वळविण्यात आली.
मात्र, या वाहतूक बदलाचा पहिल्याच दिवशी बट्ट्याबोळ उडाला. वाडीया महाविद्यालय तसेच बंडगार्डन हा अवघा ५०० मीटरचा रस्ता पार करण्यासाठी वाहनांसाठी तब्बल १ ते दिड तासांचा प्रवास करावा लागत आहे. हा बदल अचानक करण्यात आल्याने वाहन चालकांचा गोंधळ उडाल्याने कोंडीत आणखीच भर पडली. ही कोंडी जवळपास दिवसभर होती. मार्ग बदलाच्या पहिल्याच दिवशी ही स्थिती झाली. पुलाचे काम किमान पुढील दोन वर्षे चालणार आहे.
वाहतूक बदलाचा फज्जा…
महापालिकेकडून २६ फेब्रुवारीपासून पुलाचे काम सुरू होणार आहे. दि. २२ फेब्रुवारीला या वाहतूक बदलाचे आदेश काढत शनिवारपासून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. येरवड्यातून या पुलावरून वाहने हडपसर, वानवडी तसेच स्वारगेटकडे जाण्यासाठी येतात. या वाहनांना आता ब्लू डायमंड हाॅटेल चौकातून डावीकडे वळून मंगलदास चौकीकडून वाडीया महाविद्यालय, विधानभवन आणि पुढे जावे लागते.
तर येणारा रस्ताही विधानभवन, वाडीया महाविद्यालय आणि पुणे बंडगार्डन मार्गे नगररस्ता असा आहे. मात्र, हा रस्ता अरूंद आहे त्यातच वाडीया महाविद्याल ते बंडगार्डन पर्यंत मेट्रोचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी बॅरीकेडींग आहेत. त्यामुळे सर्वच बाजूंनी एकाच रस्त्यावर वाहने आल्याने दिवसभर या भागात कोंडी होणार आहे.
नियोजनाचा अभाव…
प्रत्यक्षात या चार ते पाच रस्त्यांची वाहने या एकाच रस्त्यावर येणार् असल्याने जादा वाहतूक पोलीस, वाॅर्डन, सूचना फलक, रस्त्यांची माहिती फलक, रस्त्यावरील अनधिकृत पार्किंग, तसेच हाॅल्टींग याबाबत कोणतेही नियोजन करण्यात आलेले नव्हते. त्यातच, शहरात राजकीय पक्षांचे नेते असल्याने पोलीस त्यांच्या बंदोबस्तात अडकून पडले होते. परिणामी, बदलाबाबत काहीच समजत नसल्याने अनेक वाहन चालकांचा गोंधळ उडाला.