येरवडा -संगमवाडी येथील रस्त्यावर उभ्या असलेल्या खासगी ट्रॅव्हल्स अपघाताच्या कारण ठरत आहेत. अशा बसेसमुळे वाहतूक कोंडी होत आहे. इतर वाहनांवर कारवाई होत असताना वाहतूक कोंडीचे मुख्य कारण ठरत असलेल्या खासगी ट्रॅव्हल्स बसेसवर कारवाईची मागणी करूनही येरवडा वाहतूक विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
गणेशोत्सव, दसरा, दिवाळी अशा सुट्टीच्या काळात या रस्त्यावरुन प्रवास करणे जिकरीचे होत असून येथे कायम स्वरूपी वाहतूक पोलीस कर्मचारी नेमण्याची मागणी वाहतूक विभागाकडे करण्यात आली आहे. संगमवाडी येथे खासगी ट्रॅव्हल्सचे पार्किंग असून अनेक ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या गाड्या येथुन मुंबई, नगर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, जळगाव,परभणी याठिकाणी जातात.
राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेसच्या वेळा तसेच सणोत्सवात होणारी गर्दी लक्षात घेता अशा खासगी बसेसने अनेक जण प्रवास करतात. या रस्त्यावर अनेक खासगी ट्रॅव्हल्सच्या बसेस उभ्या असतात. या बसेसनी रस्त्याचा अर्धापेक्षा जास्त भाग व्यापलेला असतो. रिक्षा, कॅब अशी वाहनेही उभी असल्याने रस्ता अरुंद होतो. येरवडा वाहतूक विभागाकडून दुर्लक्ष तसेच वाहतूक पोलिसांची नेमणूक होत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
“रस्त्यावर थांबून प्रवासी घेणाऱ्या तसेच रस्त्यामध्ये थांबून रस्त्यावर प्रवासी उतरविणाऱ्या बसेसवर कारवाई करण्यात येईल. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात येईल.”- शैलेश संखे, पोलीस निरीक्षक, येरवडा वाहतूक विभाग