नवी दिल्ली – लोकसभेच्या निवडणुकीतील रालोआच्या देशभरातील उमेदवारांच्या पाठिशी रिपाई भक्कमपणे उभी राहणार असल्याची घोषणा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज नवी दिल्ली येथे केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली रालोआ यावेळी इतिहास घडविणार असल्याचा दावा सुध्दा त्यांनी केला. तसेच शिर्डीसह लोकसभेच्या दोन जागा लढविण्याची रिपाईची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.
रिपब्लिकन पार्टी आफ इंडियाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, गेल्या 10 वर्षांत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारने सर्व घटकांना न्याय देण्याचे काम केले आहे.
अन्न योजनेच्या माध्यमातून सर्व लोकांना अन्नधान्याचा पुरवठा सातत्याने करीत आहे. प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेच्या माध्यमातून तरुण व्यावसायिकांना नवीन आणि जुन्या चालणाऱ्या व्यवसायांचा विस्तार किंवा प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज आणि आर्थिक सहाय्य देण्यात आले.
आठवले यांनी यावेळी इंडिया आघाडीवर लोकांची दिशाभूल करण्याचा आरोप केला. इंडिया महाआघाडीसह सर्व विरोधी पक्ष एनडीएवर राज्यघटना बदलणार असल्याचा खोटा आरोप करीत आहे.
नरेंद्र मोदी बाबासाहेबांच्या राज्यघटनेला प्रेरणास्त्रोत मानून बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत घडविण्याचे काम करत आहेत. यामुळे मतदारांनी इंडिया आघाडीला चांगला धडा शिकवावा. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ४० जागा सुध्दा मिळणार नाही, असेही आठवले यावेळी म्हणाले.
केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांचा परिणाम म्हणजे संपूर्ण देशाची स्थिती चांगली आहे. शेतकरी, मजूर, दलित, अनुसूचित जाती-जमाती यांच्या प्रगतीसाठी सुरू केलेल्या योजनांचा व्यापक परिणाम झाला आहे.
यामुळे मोदी यांच्या खांद्याला खांदा लावून रालोआ आघाडी 400 जागा जिंकून नवीन इतिहास बनविणार आहे असा दावा आठवले यांनी यावेळी केला. शिर्डीसह लोकसभेच्या दोन जागा लढविण्याची रिपाईची इच्छा व्यक्त केली आहे.
याबाबत गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना प्रस्ताव देण्यात आला आहे. राहुल गांधी जी भारत जोडो यात्रेचे काम करतात पण त्यांच्या यात्रेचा खरा उद्देश भारताचे तुकडे करणे हा आहे आणि काँग्रेस न्याय देण्याऐवजी अन्याय करण्याचे काम करत आहे. यापूर्वी, गरिबी हटावचा नारा देणाऱ्या काँग्रेस सरकारने गरिबीऐवजी गरिबांना हटविण्याचे काम केले.