नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात अरुणाचल प्रदेशला दिलेल्या भेटीवरून चीनने थयथयाट करायला सुरुवात केला आहे. अरुणाचल प्रदेशला चीन आपला भूभाग मानत आहे. या भागात मोदींनी भेट दिल्यामुळे सीमावाद आणखीनच चिघळण्याची शक्यता निर्माण झाल्याचे चीनने भारताच्या उच्चाधिकाऱ्यांकडे आपला निषेध नोंदवला आहे.
पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी अरुणाचल प्रदेशमध्ये समुद्रसपाटीपासून १३ हजार फूट उंचीवर नव्याने बांधलेल्या सेला बोगद्याचे लोकार्पण केले. तब्बल ८२५ कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या या बोगद्यामुळे आसाममधील तेजपूर आणि अरुणाचल प्रदेशमधील कामेंग जिल्हे जोडले गेले आहेत.
चीनच्यावतीने अरुणाचल प्रदेशला दक्षिण तिबेट म्हणून संबोधले जाते. चिनी भाषेमध्ये चीनने अरुणाचल प्रदेशला झांगनान असे नाव देखील दिले आहे. भारतीय नेत्यांनी अरुणाचल प्रदेशला भेट देण्यावर चीनकडून नेहमीच आक्षेप घेतला जातो.