पुणे – आरपीआय (आठवले गट)चा रुसवा संपला असून, आता ते आठही विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचाराचे काम करणार असल्याचे शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
भाजप आणि आरपीआय यांनी संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषद घेतली. त्यात मिसाळ आणि आरपीआयचे शहराध्यक्ष अशोक शिरोळे यांनी ही माहिती दिली. यावेळी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, भाजपचे उज्ज्वल केसकर, “आरपीआय’चे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, संपर्कप्रमुख अशोक कांबळे, राष्ट्रीय निमंत्रक ऍड. मंदार जोशी, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, शहर युवक अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, कार्याध्यक्ष संजय सोनावणे, बसवराज गायकवाड, सचिव महिपाल वाघमारे, बाबुराव घाडगे, संघटक मोहन जगताप, वरिष्ठ उपाध्यक्ष वसंतराव बनसोडे, महिला आघाडीच्या अध्यक्षा शशिकला वाघमारे, अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष वसीम शेख आदी उपस्थित होते.
कॅन्टोन्मेंट मतदार संघाच्या जागेची मागणी आरपीआयने केली होती. मात्र, त्यांना ती दिली नाही तसेच आरपीआय कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप करत प्रचाराचे काम करणार नाही, असा निर्णय आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला होता. मात्र, खासदार गिरीश बापट आणि मिसाळ यांनी आरपीआय नेत्यांबरोबर शिष्टाई केली. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्याचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर प्रचारात सहभागी होण्याचा निर्णय आरपीआय नेत्यांनी घेतला.
आरपीआयने केलेल्या मागण्यांवर विचारमंथन झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर एकत्र बैठक घेऊन त्यावर सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन बापट आणि मिसाळ यांनी दिले. त्यामुळे या निवडणुकीच्या काळात रिपब्लिकन पक्षासह प्रत्येक मतदारसंघात समिती स्थापन करून रिपब्लिकन पक्षाला विश्वासात घेऊन एकत्र काम करण्याचे ठरल्याचे शिरोळे यांनी सांगितले.