सातारा – नीरा-देवघर आणि धोम-बलकवडी या धरणांच्या पाण्यापासून खंडाळा तालुक्यातील 14 गावे वंचित राहिल्याचे निदर्शनास आणून देताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दोन महिन्यांपूर्वी सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले.
या गावांचा पाणी प्रश्न लवकरच सुटेल, असा विश्वास शिवसेना-भाजप महायुतीचे वाई विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मदन भोसले यांनी व्यक्त केला. खंडाळा तालुक्यातील वाण्याचीवाडी, पवारवाडी, अंबारवाडी, वहिगाव, असवली, अजनूज, कण्हेरी, लोहोम, झगलवाडी, लिंबाचीवाडी, घाडगेवाडी, कर्नवडी, अतीट, मिरजेवाडी, मिरजे आदी गावातील दौऱ्यात ते बोलत होते.
शिवसेना नेते पुरूषोत्तम जाधव, ज्येष्ठ नेते शंकरराव गाढवे, बकाजीराव पाटील, शेतकरी संघटनेचे प्रमोद जाधव, भाजप तालुकाध्यक्ष राहुल हाडके, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अजित यादव, तालुकाध्यक्ष आदेश जमदाडे, खंडाळ्याचे नगरसेवक साजिद मुल्ला, अभिजित खंडागळे व ग्रामस्थ उपस्थित होते. मदन भोसले म्हणाले, खंडाळा तालुक्यात केसुर्डीतील एसईझेड प्रकल्पासाठी भूमिपुत्रांनी जमिनी दिल्या; पण त्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला नाही. खंडाळा तालुक्याचे सहकारी साखर कारखान्याचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मला मिळाली. या कारखान्यात भूमिपुत्रांना रोजगार दिला.
खंडाळा तालुक्यात आजही अनेक समस्या आहेत. त्या सोडविण्याचे नियोजन विद्यमान लोकप्रतिनिधींनी केले नाही. गेल्या पाच वर्षांत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने विकास गतिमान केला आहे. राज्यात पुन्हा भाजप-शिवसेना महायुतीचेच सरकार येणार आहे.
पुरुषोत्तम जाधव म्हणाले, माझ्या उमेदवारीचा तोटा मदन भोसले यांना झाला असता. याचा विचार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने मी उमेदवारी मागे घेतली. खंडाळा तालुक्याचा विकास मदन भोसले करतील, असा विश्वास वाटतो.