पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने 139 जागांपैकी 39 जागा रिपब्लिकन पक्षाला द्याव्यात. तसेच स्थायी समितीमध्येदेखील प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या भाषणादरम्यान भाजप पदाधिकाऱ्यांकडे केली. तसेच पुणे महापालिकेच्या धर्तीवर भाजपचा महापौर असेल तर रिपब्लिकन पक्षाला उपमहापौर पद देण्याची मागणी करत महापालिका निवडणुकीत भाजप-रिपाइं युतीचा नारा बुलंद केला. आठवलेंच्या या मागणीमुळे रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या अपेक्षा दुणावल्या आहेत.
पिंपरी प्रभाग क्रमांक 21 मधील मिलिंदनगर येथील सुभेदार रामजी आंबेडकर वसाहत या कमानीचा लोकार्पण सोहळा रामदास आठवले यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला महापौर माई ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेवक संदीप वाघेरे, माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, रिपाइं शहराध्यक्ष स्वप्नील कांबळे, युवक आघाडी शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, सुरेश निकाळजे, बाळासाहेब भागवत, खाजाभाई शेख, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आदी उपस्थित होते.
रामदास आठवले म्हणाले, इथे भारतीय जनता पक्षाचे नेते नामदेव ढाके बसलेले आहेत. आमच्या पक्षाला चांगली तिकिटे मिळाली पाहिजेत. पिंपरी चिंचवड शहरात 139 नगरसेवक आहेत. त्यातील 39 तिकिटे आरपीआय पक्षाला मिळाली पाहिजेत. ज्या ज्या ठिकाणी आमचा कार्यकर्ता चांगला आहे, तिथे तिकिटे द्या, असे आठवले म्हणाले. नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ता पुन्हा मिळवायची आहे. त्यामुळे पुण्यात ज्याप्रमाणे महापौर तुमचा आणि उपमहापौर आमचा आहे, त्याच प्रमाणे इथे सत्ता आल्यानंतर तुमचा महापौर झाला तर आमचा उपमहापौर करा. स्थायी समिती अध्यक्ष, सदस्य पद आम्हाला द्या. निवडणूक एप्रिल किंवा मे महिन्यात होईल. अथवा पुढे दोन तीन महिन्यात होईल. निवडणूक जेंव्हा होईल तेव्हा तयारीत रहा आणि त्या निवडणुकीला सामोरे जा, असेही आठवले यावेळी म्हणाले.
महापौर माई ढोरे म्हणाल्या, हा कार्यक्रम महापालिका आधीच घेणार होती मात्र करोनामुळे दोन वर्षे कार्यक्रम घेता आले नाहीत. आपल्या रूपाने एक उर्जा या शहराला मिळाली असल्याचे त्या म्हणाल्या. सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या स्मारकाची जागा देण्याची घोषणा महापालिकेने केली असून स्मारकाची उभारणी लवकरच होणार असल्याचे सांगितले. तसेच शहरातील विविध विकासकामांचा लेखाजोखा सादर केला. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सहा हजार पाचशे घरे येत्या वर्षभरात उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. नगरसेवक संदीप वाघेरे व माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रफुल्ल पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले.
राज्यपालांच्या वक्तव्याचे आठवलेंकडून समर्थन
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याबाबत प्रसारमाध्यमांनी विचारले असता, आठवले म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. समर्थ रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु होते. त्यांना त्यांचे मार्गदर्शन, प्रेरणा होती, ही गोष्ट खरी आहे. म्हणून राज्यपालांनी माफी मागण्याची गरज नाही, असे सांगत आठवले यांनी राज्यपाल कोश्यारी यांची बाजू घेतली.