बहुतांश लोकप्रतिनिधींचा फेसबुक आणि ट्विटरवरून करोनाशी लढा
पुणे – लॉकडाऊनला जनता वैतागली असताना शहरात सत्ताधारी आणि विरोधक असा राजकीय कलगीतुरा रंगला आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या शहराध्यक्षांनी बुधवारी एकत्र पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी टीका केली. करोनाच्या साथीमुळे जनता हवालदील झाली असताना सत्ताधारी आणि विरोधक असा राजकिय कलगीतुरा रंगला आहे. महापालिकेमध्ये भाजपची सत्ता असताना डॉक्टर्स, नर्सेस, सफाई सेवकांना आवश्यक साधने पुरवली जात नाहीत. बहुतांश लोकप्रतिनिधी गायब झाले असून, केवळ फेसबुक आणि ट्विटरवरून करोनाचा लढा सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहेत.
दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी शहरात करोना वाढण्याचे पातक राज्य सरकारवर फोडले आहे. ही परिस्थिती पाहता सत्ताधारी आणि विरोधकांनी पुणेकरांना वाऱ्यावर सोडले असून, आता सर्वसामान्य नागरिकांनाच हा लढा एकांगी द्यावा लागणार, असे चित्र दिसून येत आहे. फेसबुक, ट्विटरवर टीवटीव केली म्हणजे करोनाविरोधात लढा देतो असे होत नाही, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी भाजपेयींवर केली.
महापालिकेत भाजपची सत्ता आहे. परंतु, भाजपचे मोजके लोकप्रतिनिधी सोडले तर बाकीचे फिल्डवरून गायब झाले आहेत. भाजप नेत्यांचे अंतर्गत “इगो प्रॉब्लेम्स’ असल्यामुळे एकमेकांचे आदेश खोडून काढण्याकडेच जास्त लक्ष दिले जात आहे. 34 दिवसांत परिस्थिती हाताबाहेर गेली तरी प्रशासनाकडून डॉक्टर्स, नर्सेस आणि सफाई कर्मचाऱ्यांसाठी तसेच बाधित क्षेत्रातील नागरिकांसाठी मास्कची खरेदी केली गेली नाही. 6 हजार कोटी रुपयांच्या महापालिकेला ही पद्धत शोभत नाही, अशी टीकाही तुपे यांनी केली.
सर्व पुणेकर या लढ्यात उतरले आहे, परंतु काहींना राजकारणाची खुमखुमी आली आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार नागरिकांना जेवण द्यायच्या योजना आम्ही आमच्या मतदारसंघात राबवल्या, परंतु भाजप आमदारांनी त्या केल्या नाहीत. राज्य सरकारच्या योजनांचे पालन करण्यात महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना कमीपणा वाटतोय का, असा सवालही तुपे यांनी उपस्थित केला.
पुणे शहरात करोना तपासणी कीटची कमतरता आहे. परंतु, खासदार आणि पुण्यातील केंद्रीय मंत्र्यांना केंद्राकडे त्याची मागणी करायला वेळ नाही, असा टोला तुपे यांनी खासदार गिरीश बापट आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना लगावला. महापालिका आयुक्त काम करतात, परंतु त्यांना “डायर्व्हट’ करण्याचा एकमेव कार्यक्रम सुरू आहे. केवळ फेसबुक आणि ट्विटरवर माहिती टाकून करोना विरोधातला लढा लढतोय असे वाटत असेल तर भानावर या, अशी बोचरी टीका महापौर मुरलीधर मोहोळ यांचे नाव न घेता तुपे यांनी केली.
झोपडपट्टीवासियांकडे पालिकेचे लक्ष नाही, अशी टीका कॉंग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी केली. झोपडपट्टी परिसरात सर्वाधिक रुग्ण सापडत असताना त्यावर मात करण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून पावले उचलली गेली नाहीत. राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि स्वयंसेवी संस्थांनी आपल्या क्षमतेप्रमाणे मदत केली. परंतु, स्थायी समितीने अन्नधान्य खरेदीसाठी प्रस्ताव मंजूर करूनही सत्ताधाऱ्यांकडून त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न झाले नाहीत.
दाट लोकवस्त्यांमध्ये टेस्टिंग वेगाने होत नाही. छोट्या घरांमुळे झोपडपट्ट्यांमध्ये शारिरिक अंतर राखले जात नाही. यासाठी या नागरिकांची व्यवस्था करण्याची घोषणा केली जाते; मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. या कष्टकरी नागरिकांना एक महिना पुरेल एवढे अन्नधान्य, भाजीपाला आणि दूध नियमितपणे उपलब्ध करून दिल्यास ते किमान घरातच राहातील. परंतु 38 दिवस उलटूनही त्याची अंमलबजावणी केली जात नाही. केंद्र सरकार परप्रांतीय मजूरांबाबत सापत्नपणाची भूमिका घेत आहे.
कॉंग्रेसने मजूरांच्या प्रवासाचा खर्च देण्याची तयारी दर्शविली आहे. परंतु, केवळ अंतर्गत वादामुळे आणि श्रेयाच्या लढाईसाठी भाजप काम करत आहे. भाजपचे खासदार, 6 आमदार आणि 100 नगरसेवकांपैकी बहुतांश लोक गायब झाले आहेत, त्यांना पुणेकरांशी घेणे देणे नाही, असा आरोपही बागवे यांनी केला.
बहुतांश लोकप्रतिनिधी फार्म हाऊसवर…
क्षमतेनुसार टेस्ट केल्या जात नाहीत, असा आरोप शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी केला आहे. लॉकडाऊन 40 दिवसांपुढे गेला आहे. परंतु, असे असताना शहरातील साथ आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून फारसे प्रयत्न झाले नाहीत. बहुतांश लोकप्रतिनिधी मात्र फार्म हाऊसवर मोबाइल बंद करून बसले आहेत, अशी टीकाही मोरे यांनी केली. सर्वांनी एकत्र येऊन रस्त्यावर उतरून काम करण्याची गरज असताना, महापालिकेतील सत्ताधारी मात्र केवळ घोषणाबाजी करून या लढ्यापासून पळ काढत असल्याचा आरोपही मोरे यांनी केला.