राहुल गोखले
निवडणुकीचे निकाल लागून इतके दिवस झाल्यानंतर देखील सरकार स्थापनेची अंधुकशी शक्यताही दिसत नाही हेच मुळात अनपेक्षित असे आहे. कारण युतीला बहुमत मतदारांनीच दिले आहे. त्या निर्णयाचे स्वागत आणि सन्मान करण्याऐवजी भाजप आणि शिवसेना कुरघोड्यांचे राजकारण खेळत आहेत. हे चित्र दोन्ही पक्षांसाठी हितावह नाही.
पाच वर्षांपूर्वी 31 ऑक्टोबर रोजी भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार महाराष्ट्रात सत्तेत आले होते. त्यावेळीही भाजपकडे स्वबळावर बहुमत नव्हते आणि शिवसेना त्यावेळीही साथीला नव्हती. राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपने न मागता फडणवीस सरकारला बाहेरून पाठिंबा दिला होता आणि विधानसभेत विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने मंजूर झाल्याने फडणवीस सरकार तरले होते. कालांतराने शिवसेना सरकारमध्ये सामील झाली. आता परिस्थिती निराळी आहे. शिवसेना आणि भाजपची युती आहे. युतीला बहुमतही आहे. तरीही सरकार सत्तेत येऊ शकलेले नाही नि याचे एकच एक कारण सांगता येणार नाही.
शिवसेना आडमुठेपणा करीत आहे, असा एक मतप्रवाह आहे; तर दुसरीकडे भाजपने गतकाळात शिवसेनेला जी दुय्यम वागणूक दिली तिचा वचपा आता शिवसेना काढत आहे, असेही मानणारे आहेत. हे दोन्ही मतप्रवाह अयोग्य आहेत असे नाही. दोन्हीकडून ताणले जात आहे आणि परिणामतः सरकार अस्तित्वात आलेले नाही. “सत्तेची दिवाळी’ युती दिवाळीपूर्वीच साजरी करेल अशा वल्गना युतीच्या नेत्यांनी निवडणुकीपूर्वी केल्या होत्या. त्या फलद्रुप झालेल्या नाहीत. मात्र या सगळ्या सत्तासंघर्षात जनतेच्या समस्यांवर तोडगा काढणे हे आपले आद्यकर्तव्य आहे याचे विस्मरण सर्वांनाच झाले आहे.
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने सुरुवातीलाच आपण विरोधी पक्षांच्या बाकांवर बसू असे जाहीर केले आहे. तेव्हा सरकार स्थापन न होण्यास युतीचे नेते निदान विरोधी पक्षांच्या डावपेचांवर तरी खापर फोडू शकणार नाहीत. वास्तविक निवडणुकीपूर्वी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून मोठ्या प्रमाणावर गळती झाली आणि ते सगळेजण भाजप किंवा शिवसेनेला जाऊन मिळाले. त्यातील अनेकजण पराभूत झाले हेही खोटे नाही. परंतु तरीही निदान सकृतदर्शनी या दोन्ही पक्षांनी संयतपणाची भूमिका घेतली आहे. पण जो संयम युतीने दाखविणे आवश्यक होते ते युतीचे नेते मात्र कमी पडले आहेत.
वस्तुतः भाजप आणि शिवसेना युती ही निवडणूकपूर्व युती आहे आणि दोन्ही पक्षांना अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत. तेव्हा कोणताही एक पक्ष दुसऱ्या पक्षाला वाकुल्या दाखवू शकत नाही. तरीही या दोन्ही पक्षांत जुंपली आहे. यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले नाही हे. जर भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले असते तर शिवसेनेच्या नाकदुऱ्या काढण्याची वेळ भाजपवर आलीच नसती. तथापि, मेख नेमकी तेथेच आहे. लोकसभा निवडणुकांच्या अगोदर शिवसेनेशी युती व्हावी म्हणून भाजप प्रयत्नशील होता. कारण मोदींना अनुकूल सुप्त लाट आहे याचा अंदाज भाजपला देखील त्यावेळी नव्हता. त्यावेळी युती झाली ती काही शर्तींवर आणि त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची शर्त विधानसभेत शिवसेनेला समसमान वाटा सत्तेत मिळेल ही होती असा शिवसेनेचा दावा आहे.
केंद्रात मोदींना स्वबळावर बहुमत मिळाल्यावर शिवसेनेची नगण्य खात्यावर कशी बोळवण भाजपने केली हे शिवसेना विसरणे शक्य नाही. आताही राज्यात त्याची पुनरावृत्ती होऊ शकली असती. पण भाजपचे दावे सपशेल चुकीचे ठरले आणि गेल्या वेळेपेक्षा देखील जागा घटल्या. अशावेळी शिवसेनेला आपली किंमत वधारली आहे याची जाणीव झाल्याखेरीज राहणार नाही. ती किंमत वसूल करण्याची तयारी शिवसेनेने चालविली आहे.
दुसरीकडे भाजपदेखील आपल्या ताठर भूमिकेवर ठाम आहे आणि मुख्यमंत्रिपद भाजपकडे एवढेच नव्हे तर पाचही वर्षे भाजपकडे यावर भाजप आग्रही आहे. शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद हवे आहे. निदान तशी मागणी तरी शिवसेना करीत आहे. ही मागणी मान्य होण्याचा संभव कमी. पण त्या आडून अधिक पदरात पाडून घेण्याची शिवसेनेची इच्छा लपलेली नाही. गेल्या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मूक पाठिंब्यावर फडणवीस सरकार काही काळ तरले. ती शक्यता आता नाही.
कॉंग्रेस भाजपला समर्थन देण्याचा प्रश्नच नाही. तेव्हा शिवसेनेवाचून पर्याय नाही आणि तरीही शिवसेनेच्या झोळीत अधिक टाकण्याची भाजपची तयारी नाही अशा त्रांगड्यात राज्याचे राजकारण अडकले आहे. हे त्रांगडे तरच सुटेल आणि विनाविलंब सुटेल जर युतीतील नेत्यांनी संयतपणा दाखविला. तूर्तास तो दिसत नाही. दिसतो आहे तो परस्परांवर कुरघोड्या करण्याचा अगोचरपणा आणि वादग्रस्त विधाने करून एकमेकांना घायाळ करण्याचा पोरकटपणा. हे दोन्ही युतीच्या हिताचे नाहीच पण राज्याच्या राजकारणाच्या हिताचेही नाही.
निवडणूकपूर्व युतीला मतदार मतदान यासाठी करतात की निवडणुकीनंतर सरकार स्थापना सुरळीत व्हावी. परंतु येथे चित्र नेमके विपरीत आहे. शिवसेना नेते राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत आणि भाजपवर दबाव वाढवत आहेत; तर अपक्षांना आपल्याकडे खेचून दोन्ही पक्ष आपापले बलाबल वाढवत आहेत.
अर्थात तरीही ना भाजप ना शिवसेना 145च्या आकड्यापर्यंत स्वबळावर पोहोचू शकेल. हे माहीत असूनही आणि एकमेकांशिवाय सरकार स्थापन होणार नाही या वास्तवाची पूर्ण कल्पना असूनही दोन्ही पक्ष एवढे ताणत का आहेत, असा प्रश्न सामान्यांना पडला तर नवल नाही. सरकार स्थापनेपूर्वी हे पक्ष इतके भांडत आहेत तर सरकार सत्तेत आल्यावर ही भांडणे विकोपाला जातील अशी भीती सामान्यांना वाटली तर नवल नाही. लोकसभा निवडणुकीपर्यंत दोन्ही पक्ष परस्परांवर स्तुतिसुमने उधळत होते; पण नंतर चित्र पालटले आणि पुन्हा धाकटा भाऊ आणि थोरला भाऊ कोण यावरून भांडणे सुरू झाली. भाजप आणि शिवसेनेने सत्तेचा असाच खेळखंडोबा सुरू ठेवला तर विरोधी पक्षांचे फावेल यात शंका नाही. मतदारांनी वस्तुतः युतीला इशारा दिला आहे आणि तो आहे एकत्र नांदण्याचा पण तरीही परस्परांवर विसंबण्याचा. त्या इशाऱ्याकडे कानाडोळा करणे युतीला महागात पडेल.