अवकाळी पावसामुळे 325 तालुक्यांत 54 लाख 22 हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त
मुख्यमंत्र्यांची माहिती ; मंत्रिमंडळ उपसमितीची आज होणार बैठक
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसाचा सुमारे 325 तालुक्यांना फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे या तालुक्यांतील 54 लाख 22 हजार हेक्टरवरील फळपिके, भात, ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, कापूस आदी पिके उद्वस्त झाली आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली.
आस्मानी संकटामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारी यंत्रणांनी संवेदनशीलनतने कार्यवाही करावी, तसेच प्रभावित भागाचे तात्काळ ड्रोन सर्वेक्षण करावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि शासनाच्यावतीने करण्यात आलेल्या उपाययोजना यांचा सविस्तर आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेतला. शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची उद्या (शनिवारी) बैठक बोलविण्यात आल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
त्यावेळी सरकारी यंत्रणेने शेतकऱ्यांपर्यंत पोहचून त्यांना जास्तीत जास्त दिलासा द्यावा. क्षेत्रीय स्तरावरील सर्व यंत्रणांनी अत्यंत संवेदनशीलतेने कार्यवाही करावी. नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी योग्य समन्वय ठेवावा, अशी सूचना फडणवीस यांनी केली. यावेळी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून अत्यंत तपशीलवाररित्या पीक परिस्थितीची माहिती घेतातना नुकसानीचे स्थानिक शेतकऱ्यांनी काढलेली छायाचित्रे सुद्धा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
शेतीचे विभागनिहाय नुकसान
विभाग तालुके बाधित क्षेत्र
कोकण 46 97 हजार हेक्टर
नाशिक 52 16 लाख हेक्टर
पुणे 51 1.36 लाख हेक्टर
औरंगाबाद 72 22 लाख हेक्टर
अमरावती 56 12 लाख हेक्टर
नागपूर 48 40 हजार हेक्टर
मुख्यमंत्री म्हणाले, यावर्षी प्रचंड पाऊस झाला आहे. अरबी समुद्रातील सुपरसायक्लॉनसह चार वादळांचा फटका बसला, या पावसाची तीव्रता ऑक्टोबरच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात अधिक होती. त्यामुळे प्रशासनाने ही संपूर्ण स्थिती अत्यंत संवेदनशीलतेने आणि सर्वोच्च प्राधान्य देत हाताळावी, प्रत्येक शेतकऱ्याची समस्या ऐकून घ्यावी. यासाठी दुष्काळाच्या काळात उभारली, तशी यंत्रणा उभारावी, व्हॉटसअऐॅप क्रमांक सुद्धा संपर्कासाठी उपलब्ध करून देण्यात यावेत. शासनाचे या स्थितीवर संपूर्णपणे लक्ष असून, पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन स्थितीचे अवलोकन करावे. तसेच प्रभावित भागाचे तात्काळ ड्रोन सर्वेक्षण करण्याचे आदेशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
साधारणत: 53 हजार हेक्टरवर फळपिके, 1 लाख 44 हजार हेक्टरवर भात, 2 लाख हेक्टरवर ज्वारी, 2 लाख हेक्टरवर बाजरी, 5 लाख हेक्टरवर मका, 19 लाख हेक्टरवर सोयाबीन आणि सुमारे तितक्याच हेक्टरवरील कापूस पीकाचे नुकसान झाले आहे.