अवकाळी पाऊस तसेच हवामानाचा पिकाला फटका
वेल्हे – भाताचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेल्हे तालुक्यात अवकाळी पावसाने काही दिवस थैमान घातले आणि हाता तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला. उन्हातान्हांत पोटाची खळगी भरण्यासाठी जीवाची परवा न करता काळ्या मातीत सोनं उगवले. सुरूवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला होता.
यावर्षी काळ्या मातीने भरभरून दिले मात्र काळ्या आभाळाने हिरावून नेले. काढायला आलेल्या पिकांची नासधूस करूनच पाऊस परत गेला. यामुळे शेतकरी राजा पार खचला ओह. मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने काढणीला उशीर झाला. त्यामुळे भाताच्या तुरंब्या पोसल्या नसल्याने भातपीक पलंजावर जाऊन उत्पन्नात मागील वर्षीच्या प्रमाणात सरासरीपेक्षा घट होणार असल्याने अतिदुर्गम वेल्ह्यातला बळीराजा मोठ्या चिंतेत पडला आहे.
वेल्हे तालुक्यातील काही भागात रांजणे, खामगांव, ओसाडे, रूळे, कादवे, पानशेत परिसरात भात काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. अतिवृष्टी तसेच परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने खरिपातील पिकांचे, शेतीचे नुकसान झाले होते. परतीच्या पावसातून वाचलेले भातपीक जोमात येवून उत्पन्नात वाढ होईल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र, भाताच्या तुरंब्यातील पुरेपुर न भरल्याने भात उत्पन्नात घट झाल्याचे चित्र समोर आले आहे.
वेल्हे मागील काही वर्षांत पाऊस कमी होती असल्याने पिकांच्या उत्पन्नात घट होत होती. यावर्षी याउलट झाले अतिवृष्टी व परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने खरिपातील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे जगणे अवघड झाले, अशा परिस्थित तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीला आलेल्या शेतकयांनी जगायचे कसे? असा सवाल बळीराजा करीत आहे.
चांगल्या प्रकारे बहरलेल्या फुलोऱ्यात आलेल्या भात पीकाला परतीच्या पावसाने झोडपल्याने उत्पन्नात 50 टक्के घट झाली आहे. बहूतांशी तालुक्यातील शेतऱ्यांच्या खाचरांत पाणी साचल्याने पीक भुईसपाट झाले होते. तर फुलोरा झडल्याने परागीभवन झाले नाही. यामुळे भात अपरिपक्व झाले; त्यामुळे भाताचे आगार असलेल्या वेल्ह्यात भाताचे उत्पन्नात घट झाली असून, शेतकरी निराश झाला आहे.