मुंबई : देशभरात पाऊस उशिरापर्यंत मुक्काम ठोकून होता. त्यामुळे यंदा थंडीचा जोर वाढेल असाच अंदाज व्यक्त करण्यात आला होता. परंतू, अजूनही म्हणावी तशी थंडी राज्यात पडलेली नाही. त्यातच आता राज्यातील किमान तापमानात घट होत असली तरी अजून कमाल तापमानाचे आकडे चढेच आहेत. त्याचवेळी अरबी समुद्रात तयार झालेल्या प्रभावी अशा कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात काही ठिकाणी गडगडाटसह किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
अरबी समुद्रात दक्षिण पश्चिमेस तयार झालेल्या प्रभावी अशा कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर पुढील 72 तासात चक्रीवादळात होण्याची शक्यता असून ते सोमालियाचे दिशेने सरकू शकते. या बदलामुळे पुढील दोन दिवसात रत्नागिरी, सिधुदुर्ग, औरंगाबाद, परभणी, बीड आणि जालना जिल्ह्यत गडगडाटसह किरकोळ पाऊस पडू शकतो.
कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यत सोसाटयाच्या वाऱ्यासह मध्यम सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईचा पारा वाढलेलाच दरम्यान सोमवारी मुंबईच्या कमाल तापमनात वाढ झाली. सोमवारी मुंबईचे कमाल तापमान 35.1 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. तर किमान तापमान 23.4 अंश होते. राज्यात अजूनही कमाल तापमानात घट झालेली नाही. सोमवारी सकाळी सर्वाधिक किमान तापमान अहमदनगर येथे 10 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.