उत्तरप्रदेशात हिंसक आंदोलनात 15 जणांचा मृत्यू तर दिल्लीत शांतता
नवी दिल्ली : सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन सुरु झालेले आंदोलन उत्तर प्रदेशसह बिहारमध्येही पसरल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेशमधील रामपूर येथे जमावाने पोलिसांवर मोठ्या प्रमाणावर दगडफेक केली. सात वाहने पेटवून दिली. चकमकीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. कानपूरमध्येही मोठा गोंधळ झाला. राज्यात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये राजदने बंद पुकारला. यादरम्यान राज्यात विविध ठिकाणी तोडफोड झाली. रेल्वे आणि रास्ता रोको करण्यात आला. दरम्यान, दिल्ली शांत राहिली. विद्यार्थ्यांनी जामिया मिलिया विद्यापीठाबाहेर आंदोलन केले.
कानपूरमध्ये हिंसक जमावाने तुफान दगडफेक केली आणि पोलिस चौकी पेटवून दिली. याप्रकरणी समाजवादी पक्षाच्या आमदाराला ताब्यात घेण्यात आले. अमरोहात पोलिस कर्मचाऱ्याची बाईक पेटवून दिली. कासंगजमध्ये अफवा रोखण्यासाठी इंटरनेट बंद करण्यात आले. हिंसेप्रकरणी शेकडो लोकांना अटक करण्यात आली आहे.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शांततेचे अपील केले आहे. उपद्रव आणि हिंसाचार करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नसल्याचे योगी आदित्यनाथ स्पष्ट केले.
राजदच्या बंददरम्यान आंदोलन करत असलेल्या लोकांनी गांधी सेतू ठप्प केला. पाटणा-हाजीपूरमध्ये अने वाहनांची तोडफोड केली. सीवानमध्ये हिंसाचार झाली. वैशाली येथे महामार्ग रोखण्यात आला होता. राजधानी शनिवारी शांत होती. जामियाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरात शांततापूर्ण आंदोलन केले. पोलिसांनी सीलमपूरमध्ये हिंसाचार केल्याप्रकरणी पाच आणि दिल्ली गेटजवळ जुन्या दिल्लीतून जणांना अटक केली आहे. सीलमपूर परिसरात पोलिसांना मार्च काढला. दिल्ली वक्फ बोर्डने शनिवारी हिंसाचारादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना साडेपाच लाखांची आर्थिक मदत जाहीर केली. बोर्डचे अध्यक्ष आणि आमदार अमानतुल्ला खान यांनी फेसबुक पोस्ट करुन ही माहिती दिली.