पुणे – यंदा पाऊस कमी झाल्याने धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करून आतापासून पाणी बचत करणे आवश्यक बनले असतानाच; शहरातील बांधकामांना पुन्हा पिण्याचे पाणी वापरले जात असल्याने उन्हाळ्यात पाण्याची समस्या तीव्र होण्याची भिती निर्माण झाली आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मार्च महिन्यात आदेश काढत शहरातील सुरू असलेल्या बांधकामांना तसेच विकासकामांना महापालिकेच्या सांडपाणी प्रकल्पात शुद्ध केलेले पाणी वापरणे बंधनकारक केले होते.
मात्र, हा आदेश केवळ उन्हाळ्यातच पाळला गेल्याचे चित्र असून उन्हाळ्यात दिवसाला तब्बल 75 टॅंकरच्या फेऱ्या होत होत्या. ही संख्या आता 15 ते 20 टॅंकर प्रतीदिन झाली आहे. विशेष म्हणजे, शहराच्या चारही दिशांना मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू असताना; शुद्ध केलेल्या सांडपाण्याची मागणी अचानक कमी झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान, आतापर्यंत या 5 कोटी 61 लाख लीटर शुद्ध केलेले सांडपाणी बांधकामांना देण्यात आले असल्याचे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. महापालिकेने सात सांडपाणी शुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी हे पाण्याचे पॉईंट सुरू केलेले असून यासाठी खासगी ठेकेदारांच्या माध्यमातून 146 टॅंकर उपलब्ध करून दिलेले आहेत.
तपासणीचा पडला विसर
महापालिकेने 1 मेपासून शहरात बांधकामांसाठी पिण्याचे पाणी वापरणे बंद करण्याचे आदेश काढत सांडपाणी वापरणे बंधनकारक केले. त्यानंतर, ऐन मे महिन्यात हे आदेश काढल्याने या टॅंकरच्या पाण्याची मागणी वाढली. नंतर जूनपासून ती पुन्हा कमी होत गेली आहे. विशेष म्हणजे बांधकामासाठी शुद्ध सांडपाणी वापरणे बंधनकारक करण्यात आल्यानंतर महापालिकेच्या पाणी पुरवठा विभाग तसेच बांधकाम विभागाकडून याबाबत तपासणी करणे आवश्यक होते.
मात्र, या दोन्ही विभागांनी गेल्या सहा महिन्यात एकदाही ही तपासणी केली नसल्याचे समोर आले आहे.
याबाबत पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरूद्ध पावसकर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी ही बांधकाम विभागाची जबाबदारी असल्याचे सांगत हात वर केले आहेत. तर बांधकाम विभागाकडेही अशी तपासणी केल्याची कोणतीही माहिती नाही. त्यामुळे, एका बाजूला शुद्ध केलेल्या सांडपाण्याची मागणी अचानक मोठ्या प्रमाणात कमी झालेली असताना हे दोन्ही विभागांना साधी शंकाही आलेली नाही.
बांधकामांना पिण्याचे पाणी वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने महापालिकेकडून कार्यवाही सुरू आहे. मात्र, बांधकामांना पिण्याचे पाणी वापरले जाते किंवा नाही हे पाहणे पाणी बांधकाम विभागाची जबाबदारी आहे. त्यांच्याकडूनच याबाबत कारवाई होणे अपेक्षित आहे.”- अनिरूद्ध पावसकर, पाणी पुरवठा विभाग प्रमुख