नवी दिल्ली – ग्राहकांच्या मनावरील करोनाचा प्रभाव कमी झाला असून रिटेल विक्री करोना पूर्वीच्या पातळीपेक्षा नऊ टक्क्यांनी वाढली असल्याचा दावा रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेने केला आहे.
ही संघटना दर महिन्याच्या विक्रीचा तुलनात्मक आढावा घेते. नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेली विक्री गेल्या वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यापेक्षा 16 टक्क्यांनी जास्त असल्याचे सांगण्यात आले. पश्चिम भारतामधील विक्री 11 टक्क्यांनी, पूर्व आणि दक्षिण भारतातील विक्री 9 टक्क्यांनी तर उत्तर भारतातील विक्री 6 टक्क्यांनी वाढली असल्याचे या संघटनेने जारी केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे.
या घटनाक्रमाबाबत असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार राजगोपालन म्हणाले की, सर्व उद्योग व्यवसाय उत्पादक होत आहेत. त्यामुळे ग्राहकांकडून खरेदी वाढली आहे. खरेदी वाढल्यानंतर विविध उद्योग आपला विस्तार करतील आणि अर्थव्यवस्था वाढेला असे एकूण चित्र निर्माण झाले आहे.
सर्वजण याबाबत आशावादी असले तरी ओमायक्रॉनसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते याचा अंदाज ग्राहकांना व व्यापाऱ्यांना आहे. मात्र आता पूर्वी इतकी भीती ग्राहकांच्या मनात राहिलेले नाही.
ग्राहक वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची विक्री नोव्हेंबर महिन्यात 32 टक्क्यांनी वाढली. खेळांच्या साहित्याची विक्री 18 टक्क्यांनी वाढली. अन्नधान्य आणि किराणा मालाची विक्रीही वाढत असल्याचे या संघटनेने म्हटले आहे.