जामखेड -मराठ्यांना आरक्षण घेतल्याशिवाय तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आपण सरकारला सुटी देणार नाही. मराठा व कुणबी एकच आहेत. सरकारला पाच हजार पुरावे दिले आहेत. त्यामुळे आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
जामखेड शहरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले होते. यासाठी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता. मनोज जरांगे पाटील हे भूम येथून खर्डा येथे आले. या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. खर्डा येथून चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी आमदार प्रा. राम शिंदे व प्रा. सचिन गायवळ यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते यांनी स्वागत केले.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सरकारने एक महिन्याची मुदत मागितली होती. आपण दहा दिवस जास्त दिले आहेत. आता सरकारकडून मराठा समाजाला आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला सुट्टी नाही. आमचे आंदोलन चिरडण्याचा सरकारने खूप वेळा प्रयत्न केला पण त्यांचे डाव त्यांच्यावरच उलटवले. मराठा व कुणबी एकच आहेत, असेही सांगितले.
दि. 14ला आंतरवलीला या पुढे दहा दिवस आहेत.आपली ताकद आपण सरकारला दाखवू. कोणीही आत्महत्या करू नका. शांततेत या आणि जा, असे आवाहन केले. तसेच आरक्षण मिळाल्यावर एक दिवस जामखेडमध्ये जाहीर सभा घेऊ, असेही सांगितले. तीन वाजता असणारी सभा साडेआठ वाजता सुरू झाली, तरीही श्रोते हजर होते. शहरासह तालुक्यात जरांगे पाटील यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत झाले. आयोजक प्रदीप सोळुंके यांनी आंतरवली सराटी येथील सभेसाठी जामखेडकरांना आमंत्रण दिले. नीलेश दिवटे यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. आमदार प्रा. राम शिंदे यांना सभेच्या ठिकाणी मराठा समाजाचे आरक्षण तसेच विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.