असे म्हणतात, दर बारा कोसाला बोलीभाषा बदलते. याचा अर्थ असा की भाषा बोलण्याची रीत व उच्चाराची शैली बदलत जाते. मराठी भाषेत तर आपणास हा अनुभव नक्कीच येतो. मनुष्य हा समूहात राहणारा प्राणी आहे. यामुळे जी व्यवस्था तयार होते त्यास आपण समाज म्हणतो.
लोकांचा समूह म्हणजे समाज नव्हे तर समूह- समूहात मानवाप्रती हितार्थ संबंध निर्माण करण्यासाठी जी व्यवस्था तयार होते त्यास आपण सर्जनशील समाज म्हणूया.
त्यासाठी हवी आहे मानवा प्रती आदर आणि आपुलकी; ती निर्माण करण्यासाठी मानवास हवा असतो तो फक्त संवाद. मग संवादासाठी आवश्यक असते ती बोलीभाषा.
खरंच मग भाषेची ही जादू वेगळीच असते. 1970 सालात मला लहानपणी कानावर पडलेले पावसाविषयीचे शब्द आठवतात, ते साधारणपणे कोणत्याही मराठी भाषेतील वाङ्मयात व संग्रहात सापडत नाही. लिखित स्वरूपात त्याचे जतन कुठेही केलेले मला दिसत नाही. पण पारंपरिक पद्धतीने बोलीभाषेतून आजही ते पुढील पिढीकडे संस्कारीत होत गेलेले दिसतात. जसं जसे पिढीत बदल होत चाललेला आहे तसं तसे हे शब्दही बोलीभाषेतून लुप्त होऊ लागले आहेत.
पावसाविषयी बोलीभाषेत असेच काही शब्द आहेत. जसे की पर्जन्यमान मोजण्यासाठी त्या काळी कोणतीही सुधारित यंत्रणा ग्रामीण भागापर्यंत विस्तारित झालेली नसेल? मग बोलीभाषेतील शब्दावरून व नावावरून पर्जन्यमान किती झाले? यानुसार ग्रामीण भागातील पावसाविषयीचे हे शब्द मला आजही आठवतात. जसे की पेंडणी- चांदणभऱ्या -वाव्हनी, ठोकाण्या हे पावसाचे प्रकार मानले जायचे. आणि यातून झालेल्या पावसाचा अंदाज मांडला जायचा. या पावसानुसार शेतकरी आपली पीक पद्धती व पिकांचे प्रकार कोणते घ्यायचे हे ठरवायचे.
ठराविक कालावधीमध्ये किंवा पावसाच्या महिन्यामध्ये कोणता पाऊस होतो हे त्या काळातील पीकपद्धतीला पोषक अशीच पिके त्याकाळी घेतली जायची; तेही ठोक अंदाजाने.
पेंडणी म्हणजे पायाला चिखल लागण्यासारखा पाऊस. चांदनभऱ्या म्हणजे चांदण्यासारखे छोटे छोटे पाणी रानामध्ये साचले जायचे असा पाऊस. अर्थातच वाव्हनी पाऊस म्हणजे नदी नाल्यातून पाणी वाहणारा आणि त्याकाळी ठोकाण्या म्हणजे मुसळधार पाऊस. भीज पाऊस हा पाणी न वाहणारा पण जमिनीत ओल करणारा असा असे. नागडा पाऊस हा तर मजेशीर असे. जेव्हा उन्हात पाऊस पडायचा त्यास नागडा पाऊस संबोधले जायचे. त्यावेळेस लहान मुले आनंदाने पावसामध्ये नाचून हे गीत म्हणायचे.
उन्हात पाऊस पडतो
डोंगरात कोल्होबा रडतो
आपला देश कृषीप्रधान असल्याने पाऊस हाच मुख्यआधार. संपूर्ण अर्थव्यवस्था यावर अवलंबून असते. बाजारपेठातील तेजी-मंदी पावसावरच निश्चित केली जाते.
देशाचा विकास हा पर्जन्यमानानुसार ठरवला जातो. पावसाच्या अंदाजानुसार व आगामी भाकितानुसार बऱ्याचशा आर्थिक उलाढाली केल्या जातात.
त्याकाळी लहान मुले पावसात आनंद घेत उड्या मारताना; पाऊस जोरात पडावा असे त्यांना वाटायचे आणि ते पावसात गाणे म्हणायचे-
येरे येरे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाऊस आला मोठा
किती समर्पक आणि अर्थपूर्ण बालगीत जे की पर्जन्यमान आणि पैसे, आर्थिक सुबत्ता यांचा संबंध निर्देशित करणारे आहे. होय… पावसावरच संपूर्ण जीवसृष्टीचे जीवनमान आणि जागतिकीकरणा नंतर आर्थिक विकास अवलंबून आहे.
पावसाने पैसा तयार होतो हे निश्चित; पण करोडो रुपये खर्च करूनही पाऊस पडेलच असे नाही. जगभरात अनेक देशांनी कृत्रिम पावसाचे प्रयोग केलेले आहेत. पण ते निष्फळ झाले असून आजही आखाती देशांमध्ये पावसाचा थेंबही पडत नाही. तसेच कृत्रिम पाऊस पाडण्यासं ते अयशस्वी झाले आहेत. म्हणजेच पैसा देऊन पाऊस पडेल असे नाही; पण उलट पावसापासून पैसा निर्माण होतो हे निश्चित झालेले आहे. पावसामुळे अन्नधान्याचे उत्पन्न त्याचबरोबर सजीवास पिण्यास पाणी, वनस्पती वाढीसाठी पाणी उपलब्ध होते, म्हणजेच जीवदान मिळून सजीव हा विकासाकडे वाटचाल करतो. सध्या तरी मुबलक अर्थप्राप्ती हाच विकासाचा केंद्रबिंदू जगभर जाणवलं आहे.
वातावरणातील बदल, पर्यावरणातील असंतुलन त्याचबरोबर निसर्ग ओरबाडत साधलेला विकास, यामुळे दिवसेंदिवस पर्जन्यमान कमी होत गेल्याने आपला देश दुष्काळाच्या खाईत लोटला जात आहे. एखाद्या कार्यक्रमांमध्ये बेफान व बेहिशोबी खर्च केला तर “पाण्यासारखा पैसा खर्च केला’ अशी म्हण होती. पण आता दिवस बदललेले आहेत. पैसे कितीही खर्च केले; तरी पाणी मिळणे जिकरीचे होऊन बसलेले आहेत. निसर्गाची हानी न करता पर्यावरण संतुलन राखून मानवी जीवन जगणे हे कृतार्थपणे योग्य आहे. नाहीतर पाण्यासारखा पैसा खर्च करून काहीही उपयोग होणार नाही. बोलीभाषेप्रमाणे ही म्हण हळूहळू लुप्त होईल.
– डॉ. डी. एस. काटे