पारनेर – तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील 39 वर्षीय व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाला होता. हे त्याच्या मृत्यूनंतर आलेल्या करोना चाचणीच्या अहवालाने निष्पन्न झाले. त्यानंतर स्थानिक प्रशासन खडबडून जागे झाले व त्याच्या कुटुंबातील व संपर्कात आलेल्यापैकी 11 जणांचे अहवाल पुणे येथे पाठवण्यात आले होते.त्यापैकी मृत व्यक्तीच्या पत्नीसह सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. त्यामुळे तालुक्याला दिलासा मिळाला आहे.
पारनेर तालुक्यामध्ये मुंबईहून आलेल्या त्या व्यक्तीचा दि. 12 रोजी मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर ती व्यक्ती करोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर प्रशासनाने त्या व्यक्तीच्या कुटुंबाला तसेच संपर्कात आलेल्या अशा 33 जणांना नगर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले त्यापैकी 11 जणांची करोनाचाचणी घेण्यात आली. त्यापैकी मृत व्यक्तीच्या पत्नीसह सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
पिंपरी जलसेन मधील व्यक्ती करोनामुळे मृत पावल्याने प्रशासनाने परिसरातील चार गावांच्या सीमा बंद केल्या असून सर्व नागरिकांना पुढील आदेश येईपर्यंत घराबाहेर पडू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित गावातील नागरिकांची आरोग्य विभागातर्फे चाचपणी करण्यात येत आहे. या तरुणाचा करोनामुळे मृत्यू झाल्याने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली.
तालुक्यातील सर्व गावांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र संपर्कात आलेल्या दहा जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे सर्वांना काहीसा दिलासा मिळाला आहे.प्रशासनाच्या वतीने तहसीलदार ज्योती देवरे यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन हलगर्जीपणा करणाऱ्याबाबत ठोस भूमिका घेतलेली आहे. यापुढे बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. जे येतील त्यांना त्याच ठिकाणी क्वारंटाईन करण्यात येणार आहे.