सोलापूर – भारताचे संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी मोदी सरकारला हटविणे गरजेचे आहे, तरच देश वाचणार आहे. यासाठी देशभरातील सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माकपचे महासचिव सीताराम येचुरी यांनी केले.
सोलापुर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी येचुरी यांनी देशातील विविध समस्या मांडत मोदी सरकारवरच्या अपयशावर बोट ठेवत टीकास्र सोडले.
सीताराम येचुरी म्हणाले, देशभरातील शेतकऱ्यांचे आज मोठे प्रश्न आहेत. महागाई वाढली आहे. बेरोजगारीने तर नवीन उच्चांकच गाठला आहे. याला केवळ मोदी सरकार जबाबदार आहेत. देशभरामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचे कटकारस्थान रचले जात आहे. धार्मिक आणि सांप्रदायिक धृवीकरणाच्या दिशेने देश नेण्याचा कुटील डाव भाजपकडून सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
ईडीच्या नावाखाली विरोधकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोणताही अपराध नसताना विरोधी नेत्यांना नाहक त्रास दिला जात आहे. आतापर्यंत 5,700 जणांची चौकशी करण्यात आली असून त्यापैकी फक्त 23 जण दोषी सापडले आहेत. यावरूनच भाजपची रणनीती दिसून येते, असेही येचुरी यावेळी म्हणाले.
देशात आज संविधानावर आणि लोकशाहीवर हल्ला होत आहे. या संपूर्ण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी राज्या-राज्यांतील सर्वांनी एकत्र येऊन या प्रवृत्तीला विरोध दर्शवणे गरजेचे आहे. तसेच भाजप विरहीत व्होट बॅंक तयार करण्याची गरज असल्याचेही येचुरी यांनी यावेळी बोलताना सांगितले.
संसदेचे केवळ 4 दिवस काम
नवीन संसद इमारतीचे उद्घाटन म्हणजे एक राज्याभिषेक सोहळाच होता. कोणालाही विश्वासात न घेता संसदेची नवीन इमारत बांधण्यात आली आहे. मोदी सरकारने यासाठी स्वतःच निर्णय घेतलेले आहेत. मागील 20 वर्षातील संसद वर्षभरात 212 दिवस चालायची त्यावेळी कायदे कानून ठरविले जात होते. पार्लमेंटरी कमिटी सुद्धा कामकाज पाहायची. परंतु 2022 सालामध्ये वर्षभरात संसद 56 दिवस चालली. ज्यामध्ये 52 दिवस कोणत्याही प्रकारचे काम झाले नाही, ही देशासाठी शोकांतिका असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.