पुणे-“ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे पालन करावे लागते. त्याचा अवमान होता कामा नये. याबाबत काम सुरू आहे. एवढ्या मोठ्या ओबीसी समाजाच्या बाबतीत निर्णय घ्यावा लागेल. राज्य निवडणूक आयोग कधी निवडणूक लावते हे पहावे लागेल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे दिली.
पवार शुक्रवारी पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी विधानभवन येथे विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी राज ठाकरे, त्यांच्या पक्षाची आंदोलने, हनुमान चालिसा आणि राणा दाम्पत्य विषयावर मत व्यक्त केले. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत राज्य शासनाने केलेला कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवला. शिवाय, निवडणुकीचे अधिकार हे राज्य निवडणूक आयोगाकडे असल्याचे आदेशित केले. त्यावर पवार यांनी शुक्रवारी भूमिका मांडली.
दरम्यान पवार म्हणाले, “राणा दाम्पत्यावर लावण्यात आलेल्या राजद्रोहाच्या गुन्हाबाबत सत्र न्यायालयाने मत व्यक्त केले होते. त्यावर आमचे ऍडव्होकेट जनरल आणि वकील अभ्यास करून निर्णय घेतील. तर हनुमान चालिसा म्हणायची असेल घरी म्हणा, दुसऱ्याच्या
घरात जाऊन कशाला म्हणता हम करेसो कायदा चालणार नाही आणि अल्टिमेटम तर अजिबात चालणार नाही.’ एकूणच निवडणूक आणि ओबीसी आरक्षण विषयावरील न्यायालयाच्या निकालानंतर शासनाची पहिल्यांदाच प्रतिक्रिया आली आहे. त्यामुळे या प्रश्नी राज्य सरकार काय भूमिका मांडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.