बीड – मराठवाड्यात कोरड्या दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होत आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकरी संकटात सापडला असून त्यांना अंतरीम दिलासा मिळवून देण्यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व मंडळांमध्ये कृषी, महसूल विभागामार्फत पीकविमा कंपनीला सोबत घेऊन तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.
त्यानुसार जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी अधिसूचना काढली आहे. जिल्ह्यातील 87 मंडळात 25 टक्के अग्रीम पीकविमा मंजूर झाला असून लवकरच शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून मदत मिळणार आहे. बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यांमधील 87 मंडळामध्ये कमी पावसामुळे संभाव्य नुकसान हे सरासरी उत्पन्नाच्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचा निकष काढण्यात आला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांची आढावा बैठक घेण्यात आली. मराठवाड्यात नांदेड व हिंगोली हे दोन जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा खंड असल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. यामुळे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनास दिले होते. संपूर्ण मराठवाड्यात निर्माण झालेल्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा कृषीमंत्र्यांनी आढावा घेतला.